लॉक डाऊन मध्ये काय कमवले व काय गमवले ?

40

लाॅकडाऊन मध्ये काय कमवले म्हणाल तर चार भिंतींच्या आत माणूस राहायला शिकला घरातील मनोरंजनाच्या वस्तू वापरणे, एकमेकांना वेळ देणे, समजून घेणे, सहभोजन करणे, स्वच्छता टापटीप शिकला, काहींनी स्वतःचे छंद जोपासले.
लाॅकडाऊन मध्ये काय गमवले म्हणाल तर पैसा मागे धावणे,अवास्तव अपेक्षा, बाहेरच खाण,एक दुःखद घटना म्हणजे आपली माणस महामारीत जाणं. दवाखान्यात मध्ये दाखल होताना शेवटचे दर्शन..

इतकी वाईट अवस्था झाली आहे की माणूस माणसाकडे शासंक नजरेतून बघतो. एकमेकांकडे जाणे दूर झाले.
निसर्गाने माणसाची बोलती बंद केली.
लाॅकडाऊन जर आधीच झाले असते तर फार बरे झाले असते असे मला वाटते. काय दचकलात? अहो तस नाही मला म्हणायचे आहे की जेव्हा सरकारला करोना विषयी माहिती मिळाली तेव्हाच जर विमान उड्डाण रद्द केली असती व जे परदेशातून आले आहेत त्यांना काँरंटाईन केले असते तर आज एवढी वाईट वेळ महानगरात आली नसती. भारतभर करोनाचा संसर्ग झालाच नसता.

अचानकपणे सरकारने लाॅकडाऊन केले.लोकांना सुरवातीला आनंद झाला. प्रदीर्घ काळा नंतर एवढी मोठी सुट्टी मिळाली. घरातील प्रत्येक सदस्य अपराध्या प्रमाणे घरात बंदिस्त झाला.
लाॅकडाऊन मध्ये बाहेर पडताच मिळे खाकी वर्दी चा प्रसाद घरात बसा उपाय नाही लाॅकडाऊन मध्ये बाहेर चे खाणे बंद झाले लोक घरातले अन्न खाऊ लागले. अवास्तव खर्च चैनीच्या वस्तू यांना आळा बसला. घरात एकत्र सहभोजनाचा आनंद मिळाला.सुट्टी म्हणून घरात नाना प्रकार चे पदार्थ केले.रहदारी नसल्याने निसर्ग बहरुन आला त्याच्या सौंदर्यात वाढ झाली. प्रदुषणाचा त्रास कमी झाला व ओझोनला गती मिळाली. मुख्य म्हणजे माणूस स्वच्छतेचे धडे गिरवू लागला.

मोदीजीनी स्वच्छता अभियान राबविले पण ते आता खऱ्या अर्थाने सार्थकी लागले.पण सुट्टी असून कुठे बाहेर जाता येत नाही ह्याची खंत जाणवू लागली. हळूहळू दिवस लाॅकडाऊन चे वाढत चालेत हे पाहून लोकांच्या तोंडचे पाणी पळाले. मोठ मोठे व्यावसायिक चिंतातूर झाले. हातावरचे पोट असलेली माणसे उपाशी राहू लागली. सरकार सर्वतोपरी जनतेचे प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्न करु लागले. लाॅकडाऊन मध्ये लोकांचे आर्थिक नुकसान बरेच झाले आहे. लोक घरात बंदिस्त होऊन कंटाळलेत. लोकांच मनोधैर्य खचले. गावातील लोक कामानिमित्त शहरात होती त्यांना गावची ओढ वाटू लागली. प्रवास साधन नसल्याने लोक पायपीट करीत गावी जाऊ लागली व रस्त्यावर अनेक प्रकारच्या संकटाला सामोरी गेलीत. काहींचे प्राण देखील गेले.

लोक मागणी नुसार लाॅकडाऊन शिथील केले. पण तरुण वर्ग उधळलाच. गरज नसताना बाहेर फिरणे वाढले. लोक चोरुन पार्ट्या करु लागली आणि संसर्गजन्य रोग पसरु लागला.तोंडाला मास्क न बांधणे, सोशल डिस्टेंस चे पालन न करणे, या सर्वांचा बोजवारा वाजला. लोकांनी बाजारात एकच गर्दी केली.
सरकार मग करोनाला कसा आळा घालणार? लोकांच हे वागण चुकीचे आहे. आपणच आपल्या आरोग्याची काळजी घेतली पाहिजे.आपण सूज्ञ आहोत समजदार आहोत निरीक्षण करण्याची कला फारच कमी लोकांना अवगत असते त्यातून ते बोध घेतात. “पुढच्यास ठेच मागचा शहाणा” * अशी म्हण आहे त्या प्रमाणे आपण सर्वांनी वागावे. पण काही लोक ह्या गोष्टी कडे दुर्लक्ष करतात मला नेटवर खुप माहिती मिळाली आहे करोना म्हणजे निव्वळ ताप व लोकांना फसवणून पैसे उकळण्याचे धंदे असे मेसेज पसरु लागले.

अती शहाणा त्याचा बैल रिकामा अशी गत होऊन बराच तरुण वर्ग ह्या आजाराला बळी ठरला. अहो! (WHO) वल्र्ड हेल्थ आॅर्गनाइजेशन संस्था अभ्यास पुरक माहीती जनतेला देते. सरकार त्याप्रमाणे जनतेच्या आरोग्याची काळजी घेते. आपण सरकारी नियम पाळून जर सुशिक्षित पणे वागलो तर हा आजार केव्हाच नष्ट झाला असता. एक खेदाची बाब आहे मास्क न वापरल्यास दंड, सोशल डिस्टेंनसिंग न ठेवल्यास दंड, असे नियम काढावे लागले म्हणजे आपल्या देशात मुर्खांची कमी नाही हे लक्षात येते. स्वतः स्वतःची काळजी घ्या घरात तुमच्या माणसे आहेत त्यांना तुमच्यामुळे संसर्ग होण्याची शक्यता असते. मग आपल्या प्रियजनांना आपणच संकटात टाकायचे का?

विचारी मना निरखूनी पाही .
बघा मी तुम्हाला माझ्या बुद्धी आकलन प्रमाणे सांगते की गरज असेल तरच बाहेर पडा. सूचना…………
🔸सगळी काम साठवून व आठवून वहीत नोंद करा.
🔹 किराणा माल आॅन लाईन मागवा.
🔸बाहेर पडताना मास्क सोशल डिस्टेंस सॅनिटायझर ह्यांचा वापर कटाक्षाने करा.
🔹 भाजी आठवडय़ातून एकदाच आणा त्याच वेळी बॅकेतील काही कामे असतील ती करा
🔸बाहेरील खाद्यपदार्थ टाळा.
🔹आजारपणात डाँ.ना फोन करुन औषध दुकानातून औषध मागवा वेलनेस मेडिकल घरपोच सेवा देते.
🔸घराबाहेर पडणारी एकच व्यक्ती व त्याचा एकच ड्रेस कायम बाजूला स्वच्छ धुवून डेटाॅल मध्ये भिजवून सुकवा.
🔹वयस्कर व्यक्ति च्या मदतीस COVID 19 योद्धा हजर आहेत . त्यांच्या महान कार्याला सलाम करुन त्यांची मदत घ्या.
बाहेरून आल्यावर प्रथम सॅनिटायझर फवारणी करून मग बाथरूम मध्ये साबणाच्या पाण्यात कपडे लगेच बुडवा स्वच्छ आंघोळ करुन मीठाच्या पाण्याच्या गुळण्या करा. वारंवार गरम पाणी पिणे व गरम पाण्याची वाफ घेणे आरोग्यास हितकारक आहे. अशी काळजी जर सर्वांनी घेतली तर भारत लवकरात लवकर संसर्ग मुक्त देश होईल ते सुध्दा विना लस व औषध अस मला वाटतं.

मी एक सुजाण नागरीक आहे माझ्या भारत देशाची. भारत मातेची शान राखण्यासाठी मी सर्वतोपरी प्रयत्न करते की, माझा भारत देश कसा आपल्या सर्वांच्या सहकार्याने रोगमुक्त होईल?
मी सरकारी नियम काटेकोरपणे पाळले व अजूनही पाळत आहे वरील सूचना मी व माझे पती दोघांनी नीट पाळले आहेत. आम्ही फोटोग्राफर आहोत लाॅकडाऊन शिथिल झाल्यावर घरी ग्राहक येऊ लागले. प्रथम आम्ही मास्क लावून दरवाजा उघडतो. काहीजण सुचना पाळत नव्हते पण कोणास न दुखवता समजावून तर कधी शेजारी करोना पेशंट आहे अशी भिती घालून नियम पाळण्यास लावले. ते गेल्यावर घरात सॅनिटायझर फवारणी केली. डेटाॅलच्या पाण्याने लादी पुसली. हात साबणाने स्वच्छ धुतले. अशी आम्ही आमची काळजी घेतली. तुमचा काय विचार आहे?

लाॅकडाऊन शिथील झाले ह्याचा अर्थ संसर्गजन्य रोग गेला अस वाटत का? अहो तुम्ही तस समजू नका. अजुन ही आणीबाणी ची वेळ गेलेली नाही. अजून काळजी घेणे आवश्यक आहे. आपण आपली व आपल्या कुटुंबाची काळजी घेऊन,आशावादी रहा. लवकरच करोना आपल्या देशातुन हद्दपार होईल असा आशावाद आपण सर्व बाळगू या.

✒️लेखिका:-सौ. रोहिणी अमोल पराडकर
कोल्हापूर,मो:-8208890678

▪️संकलन:-अंगद दराडे(बीड,जिल्हा प्रतिनिधी)मो:-8668682620