कांदा निर्यात बंदीचा निर्णय तातडीने मागे घ्या – छगन भुजबळ

35

🔸कांदा निर्यात बंदीचा निर्णय मागे घेण्याबाबत छगन भुजबळ यांची पक्षप्रमुख खासदार शरद पवार यांच्याशी चर्चा

 ✒️शांताराम दुनबळे(नाशिक,जिल्हा प्रतिनिधी)मो:-9960227439

नाशिक(दि.16सप्टेंबर):-केंद्र सरकारने अचानक कांदा निर्यातबंदी लागू केल्याने कांदा उत्पादक शेतकरी अडचणीत सापडला असून शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे. त्याचबरोबर हजारो क्विंटल कांदा मुंबई बंदरात अडकला असून त्याची निर्यात प्रक्रिया पूर्ण करण्यात यावी यासंदर्भात पक्षप्रमुख खासदार शरदचंद्र पवार यांच्याशी चर्चा करण्यात आली असून कांदा निर्यात बंदी तातडीने हटवावी यासाठी केंद्र सरकारकडे ते स्वतः प्रयत्न करणार असल्याची माहिती राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी दिली आहे.

देशात आणि राज्यात कोरोनाचे संकट ओढवल्यानंतर आता कुठेतरी बाजार सुरळीत होत होते. त्यातून अत्यंत कष्टाने पिकविलेल्या कांद्याला चांगला भाव मिळत असतांना केंद्र शासनाने अचानकपणे कांदा निर्यात बंदीचा निर्णय घेतल्याने कांदा उत्पादक शेतकरी अडचणीत सापडला आहे. एकीकडे चाळीमध्ये साठविलेला कांदा खराब होत आहे. त्याचा शेतकऱ्यांना मोठा तोटा होत असतांना कांदा निर्यात बंदीच्या निर्णयाने कांदा उत्पादक शेतकऱ्यांना अधिक फटका बसत आहे. याबाबत छगन भुजबळ यांनी पक्षप्रमुख खासदार शरदचंद्र पवार यांच्याशी सविस्तर चर्चा केली असून केंद्र सरकारकडे बाजू मांडली जाणार आहे.

त्यानुसार केंद्र सरकारबरोबर स्वतः शरद पवार साहेब हे शेतकऱ्यांच्या हिताच्या दृष्टीने स्वतः मध्यस्ती करत असून तातडीने कांदा निर्यात बंदी मागे घेण्याबाबत केंद्र सरकारसोबत चर्चा करणार आहे. त्यामुळे शेतकरी बांधवांनी संयम ठेवावा असे आवाहन राज्याचे अन्न, नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी केले आहे.