शेतकऱ्यांनी पिकाच्या नुकसानीची तक्रार 72 तासाच्या आत विमा कंपनीकडे नोंदवावी

36

🔹जिल्हाधिकारी विपीन इटनकर यांचे आवाहन

✒️माधव शिंदे(नांदेड,जिल्हा प्रतिनिधी)मो:-7757073260

नांदेड(दि.19सप्टेंबर):- प्रधानमंत्री पिक विमा योजनेंतर्गत लाभ घेण्यासाठी जिल्ह्यात शेतकऱ्यांनी अतिवृष्टी व पूर परस्थितीमुळे झालेल्या पिकांच्या नुकसानीची तक्रार विमा कंपनीला 72 तासाच्या आत करणे बंधनकारक आहे. त्यासाठी शेतकऱ्यांची पिकांच्या नुकसानीची माहिती तात्काळ विमा कंपनीकडे नोंदवावी असे आवाहन जिल्हाधिकारी नांदेड यांनी केले आहे.

जिल्ह्यात 15 ते 19 सप्टेंबर दरम्याान काही मंडळात अतिवृष्टी झाली असून काही ठिकाणी पावसामुळे पिकांचे नुकसान झाले आहे. शासन निर्णय 29 जून 2020 नुसार ज्यात शेतकऱ्यांनी पिकाचा विमा भरलेला आहे त्या शेतकऱ्यांनी अतिवृष्टी किंवा पूर परिस्थितीमुळे झालेल्या पिकाच्या नुकसानीची तक्रार विमा कंपनीला 72 तासाच्या आत कळविणे बंधनकारक आहे.

बऱ्याच शेतकऱ्यांना विमा कंपनीस सूचना देण्याची पद्धत माहिती नसल्यामुळे शेतकरी या नुकसानीची तक्रार विमा कंपनीस करत नाहीत. त्यामुळे नुकसान भरपाई मिळण्यापासून शेतकरी वंचित राहतात. जिल्ह्यातील सर्व शेतकऱ्यांनी अशाप्रकारे अतिवृष्टी किंवा पूर परिस्थतीमुळे पिकांचे नुकसान होत असेल तर पुढीलप्रमाणे विमा कंपनीला तक्रार नोंदवावी. यासाठी शेतकऱ्यांना 18001035490 या टोल फ्री नंबरवर तक्रार नोंदवता येईल.

कंपनीच्याा ई-मेल आयडी :-suportagri@iffcotokio.co.in वर तक्रार नोंदवता येईल. क्रॉप इन्शोरन्स अॅपद्वारे ही तक्रार नोंदवता येईल. तसेच संबंधित तालुका कृषी अधिकारी कार्यालयाच्या ठिकाणी अर्ज देऊन तक्रार नोंदवता येईल. याबाबत जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी नोंद घ्यावी, असे आवाहन जिल्हाधिकारी नांदेड यांनी केले आहे.