मुकादम व पोलिसांचा मारहाणीनंतर एरंडगावात ऊसतोड मजूराची आत्महत्या

33

✒️नवनाथ आडे(गेवराई,तालुका प्रतिनिधी)मो:-9075913114

गेवराई(दि.26सप्टेंबर):-ऊसतोडणीसाठी जात नसल्याने मुकादम आणि पोलिसांनी मारहाण केल्याने गेवराई तालुक्यातील एरंडगाव येथील एकाने आत्महत्या केल्याचा आरोप करत नातेवाईक आणि गावकऱ्यांनी शुक्रवारी पोलिस अधीक्षक कार्यालयात ठिय्या मांडला.

मुकादम व पोलिसांवर गुन्हा नोंद केला तरच मृतदेह ताब्यात घेण्याची भूमीका त्यांनी घेतली होती. रात्री उशीरापर्यंत हा ठिय्या सुरु होता. गेवराई तालुक्यातील एरंडगाव येथील आसाराम सखाराम कवठेकर यांनी शुक्रवारी गळफास घेत आत्महत्या केली. दरम्यान, आसाराम यांना ऊसतोड मुकादम गणेश गिरी, विकास गिरी, सचिन गिरी (रा. आहेर चिंचोली) व बीड ग्रामीण पोलिस ठाण्यातील कर्मचारी जरे व दुधाने यांनी ऊसतोडणीसाठी का येत नाही म्हणून गावात येऊन मारहाण केली होती. मारहाणीचा अपमान सहन न झाल्याने आसाराम यांनी आत्महत्या केली आहे.

त्यामुळे या सर्वांवर आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा नोंदवण्याची मागणी त्यांचे भाऊ किसन कवठेकर यांनी व गावकऱ्यांी केली. मात्र, गेवराई पोलिसांनी गुन्हा नांेदवण्यास नकार दिल्याने त्यांनी थेट पोलिस अधीक्षक कार्यालय गाठून ठिय्या मांडला होता. रात्री उशीरापर्यंत हा ठिय्या सुरु होता.