हातरसची घटना लोकशाहीला घातक व काळीमा फासणारी – नवनाथआबा वाघमारे

30

🔺नराधमांना तात्काळ फाशीची शिक्षा द्यावी – समता परिषदेची मागणी

✒️अतुल उनवणे(जालना,जिल्हा प्रतिनिधी) मो:-9881292081

जालना(दि.3ऑक्टोबर):-उत्तर प्रदेशातील हाथरस येथील मुलीवर सामूहिक बलात्कार करून जिवे मारून टाकण्यात आल्याची अमानुष घटना घडली. या घटनेनंतर मुलीच्या कुटुंबातील सदस्यांना तिचे अंतिम दर्शन सुद्धा घेऊ न देताच पोलिसांनी रातोरात परस्पर अंत्यसंस्कार केले. त्या कुटुंबियांच्या भेटीसाठी राष्ट्रीय कॉंग्रेसचे नेते खा. राहुलजी गांधी व प्रियंका गांधी भेटण्यासाठी गेले असताना त्यांना धक्काबुक्की करण्याचा निंदनीय प्रकार घडला. या दोन्ही घटना लोकशाही व्यवस्थेला काळीमा फासणाऱ्या व धोक्याची असून त्या मुलीवर अत्याचार करणाऱ्या नराधमांना तात्काळ फाशीची शिक्षा देण्यात यावी व खा. राहुल गांधी यांना धक्काबुक्की करणाऱ्या संबंधित पोलीस अधिकाऱ्यावर निलंबनाची कारवाई करून कठोरात कठोर शासन करावे अशी मागणी अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेचे जालना जिल्हाध्यक्ष नवनाथ आबा वाघमारे यांनी केली आहे.

उत्तर प्रदेशातील हाथरस येथील पीडित मुलीच्या कुटुंबीयांना भेटण्यासाठी गेलेले काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांना पोलिसाकडून धक्काबुक्की करण्यात आली तसेच कार्यकर्त्यावर लाठीचार्ज करण्यात आला.उत्तर प्रदेशातील एका मुलीवर सामूहिक बलात्कार करून तिला जीवे मारून टाकण्याची अमानुष घटना घडली. ही मुलगी मृत्युमुखी पडल्यावर घरी आणून तिच्या कुटुंबियांच्या पद्धतीने अंत्यविधी करण्याची गरज असताना पोलिसांनी कुटुंबियांना डांबून ठेवून रातोरात परस्पर अंत्यविधी केला. म्हणून ही माणुसकीला काळीमा फासणारी व लोकशाहीला घातक अशी घटना असून यामध्ये उत्तर प्रदेश सरकारचा ही हात असण्याला वाव मिळत आहे. त्यामुळे अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेच्या वतीने उत्तर प्रदेश सरकारचा जाहीर निषेध करण्यात येत आहे.

संबंधित कुटुंबीयांची भेट घेण्यासाठी कॉंग्रेस पक्षाचे नेते खासदार राहुल गांधी आणि प्रियांका गांधी गेली असताना पोलिसांनी त्यांना धक्काबुक्की करण्याची गरजच नव्हती. देशातील एका राष्ट्रीय पक्षाच्या प्रमुख नेत्याला अशी वागणूक मिळते तर सामान्य कार्यकर्त्यांचे काय ?
ही बाब अत्यंत निषेधार्थ व लोकशाहीला घातक आहे. कुठल्याही पीडितेचे अश्रू पुसण्यासाठी शांततेने भेटायला जाणाऱ्या लोकांना अशी वागणूक दिली जाते हे अत्यंत घृणास्पद आहे.

गरिबावर अत्याचार होत असताना त्यांचे अश्रू पुसण्यापेक्षा त्यांना बंदिस्त करून ठेवणं हे सुद्धा चुकीचंच आहे. हा देश महात्मा गांधी व गौतम बुद्धांचा हा देश आहे. त्यांनी आपल्याला शांततेची व संयमाची शिकवण दिलेली आहे. म्हणूनच दोन्ही घटना लोकशाहीला काळीमा फासणार्या व घातक आहेत. त्यामुळे उत्तर प्रदेश सरकार आणि उत्तर प्रदेश पोलिसांचा अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेच्या वतीने निषेध करण्यात येत असून त्या मुलीवर अत्याचार करणाऱ्या नराधमांना तात्काळ फाशीची शिक्षा द्यावी व खा. गांधी यांना धक्काबुक्की करणाऱ्या संबंधित पोलीस अधिकाऱ्यांना निलंबित करून कठोरात कठोर शासन करावे अशी मागणी नवनाथ आबा वाघमारे यांनी केली आहे.