दलाई लामा विश्वशांतीचे देवदूत

34

🔸अरूणाचल प्रदेशचे मुख्यमंत्री पेमा खांडू यांचे मत

🔹सहाव्या वर्ल्ड पार्लमेंटेमध्ये एमआयटी डब्ल्यूपीयूमध्ये ‘दलाई लामा अध्यासनाचा’ शुभारंभ

✒️पुणे(पुरोगामी संदेश नेटवर्क)

पुणे(दि.5ऑक्टोबर):-“ 21 व्या शतकात प्रत्येकाला मानवता आणि प्रेमाची गरज आहे. राष्ट्रपिता महात्मा गांधी यांनी अहिंसा आणि शांतीचे जे सूत्र दिले आहे. त्याच सूत्राचा आधार घेऊन दलाई लामा हे जगात शांतीचा संदेश देणारे देवदूत आहेत. अशा वेळेस त्यांच्या नावाने अध्यासन केंद्र सुरू करणे हे शांतीचे द्वार उघडण्यासारखे आहे.” असे मत अरूणाचल प्रदेशचे मुख्यमंत्री पेमा खांडू यांनी मांडले.

एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटी, पुणेतर्फे ऑनलाइन जागतिक विज्ञान, धर्म आणि तत्त्वज्ञानावर आधारित सहाव्या वर्ल्ड पार्लमेंटच्या 10 व्या सत्रात ‘दलाई लामा अध्यासनाचा’ शुभारंभ करण्यात आला. या प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते.

नवी दिल्ली येथील परमपूज्य दलाई लामा सार्वभौमिक जवाबदारी फाउंडेशनचे विश्वस्त व सचिव राजीव मेहरोत्रा, दिल्ली विद्यापीठाच्या बुध्दिस्ट स्टडीजचे विभाग प्रमुख डॉ. करम तेज सिंग सराव, जगप्रसिद्ध संगणक तज्ज्ञ पद्मभूषण डॉ.विजय भटकर, यूएसए मधील मानोआ येथील हवाई विद्यापीठाच्या धर्म विभागाचे प्राध्यापक रामदास लांब व स्वामी आत्मप्रियानंदजी हे सन्माननीय अतिथी म्हणून उपस्थित होते.

तसेच, एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीचे संस्थापक अध्यक्ष प्रा.डॉ. विश्वनाथ दा. कराड, कार्याध्यक्ष राहुल विश्वनाथ कराड, कुलगुरू डॉ.एन.टी.राव, प्र कुलगुरू प्रा.डॉ. मिलिंद पांडे, प्रा.डी.पी. आपटे, प्रा.डॉ. आर.एम. चिटणीस व वर्ल्ड पीस डोमचे संचालक दर्शन मुंदडा हे उपस्थित होते.

पेमा खांडू म्हणाले,“ आधुनिक शिक्षण प्रणालीमध्ये दलाई लामा यांच्या विचारांचा समावेश करून ज्ञान देणे हे मानव कल्याणासाठी चांगले आहे. सध्या संपूर्ण सृष्टीवरील त्रस्त मानवाला शांतीची गरज आहे. ती अध्यात्माच्या आधारे मिळेल, पण त्यासाठी युवकांना असे ज्ञान देणे आवश्यक आहे. तसेच, सर्वांच्या भौतिक प्रगतीसाठी मानवता आणि शांतीची गरज आहे.”

राजीव मलहोत्रा म्हणाले, “भारत हा विश्व गुरू म्हणून उदयास येणार आहे. यावेळी आमची जवाबदारी आहे की येणार्‍या पिढीसाठी या देशात भारतीय परंपरेनुसार शिक्षणाची धारा वाहिली पाहिजे. सत्यता आणि प्राकृतिक पद्धतीने शिक्षण हे सर्वांना मिळावे. त्यासाठी एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीने दलाई लामा अध्ययसनाची सुरूवात केली हे अत्यंत महत्वाचे आहे.”

प्रा.डॉ. विश्वनाथ दा. कराड म्हणाले,“ अध्यात्मिक गुरू दलाई लामा यांनी संपूर्ण मानवजातीला धैर्य, शांती, अहिंसा आणि मानव रक्षणाचे कार्य केले आहे. त्यांचे कार्य तरूण पिढीमध्ये रूजविण्याच्या उद्देशाने त्यांच्या नावने हे अध्यासन सुरू करण्यात आले आहे.”

राहुल विश्वनाथ कराड म्हणाले,“ एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीच्या माध्यमातून चालविल्या जाणारे सर्व पाठ्यक्रम हे विद्यार्थ्यांचे शारीरिक व मानसिक प्रगतीसाठी महत्वाचे आहे. विज्ञान आणि अध्यात्माच्या समन्वयातून शिक्षण दिले जाते, जे मानवाच्या सर्वांगिण विकासासाठी आवश्यक आहे.”

डॉ. एन.टी.राव यांनी सर्वांचे स्वागत केले. दर्शन मुंदडा यांनी वर्ल्ड पार्लमेंटची पार्श्वभूमी समझावून सांगितली.
प्रा.डी.पी. आपटे यांनी स्वागतपर भाषण केले.
प्रा.गौतम बापट यांनी सूत्रसंचालन केले.