राजुरा व विरूर(चांदा वनक्षेत्र) परिसरातील नरभक्षक वाघाला जेरबंद करण्यात यावे

27

🔹राजुरा तालुका आम आदमी पार्टीची मागणी

✒️राजुरा(पुरोगामी संदेश नेटवर्क)

राजुरा(दि.9ऑक्टोबर):-आतापर्यंत दहा जणांचा बळी वाघाने घेतलेला आहे.यात शेतकरी व मजुर वर्ग यांचाच बळी जात आहे. लोकांचे जीव जात असतांना सरकार मदत देऊन आपली जवाबदारी झटकू पहाते आहे.राज्य सरकारने घटनेचे गांभीर्य ओळखून वाघाला पकडण्याचे आदेश तर दिलेले आहे.परंतु राज्य सरकारच्या आदेशाची अंमलबजावणी ही गांभीर्याने होत नसल्याने गरीब लोकांचा जीव जातो आहे.

चंद्रपुर क्षेत्रात वाघांच्या संख्येत वाढ झाल्याने आज कुठलेही जंगल हे सुरक्षित राहीललेले नाही.जंगलातील वन्य जीवांचे प्रमाण कमी झाल्याने वाघाने मानवी वस्तीवर हल्ले करणे चालूच ठेवले आहे.राजुरा तालुक्यातील जंगलाला लागून असलेल्या शेतीवर कामांसाठी जाणे कठीण झालेले आहे.शेतकरी व शेतमजूर दहशतीत वावरत आहेत.

परतीच्या पावसाने झोडपून काढणे चालू केल्याने शेतक-यांचे पीक धोक्यात आले आहे.अकाली वीज पडण्याचे प्रमाण वाढल्याने अनेक शेतकऱ्यांना जीवास मुकावे लागले आहे. चारी बाजूंनी शेतकरी कोंडीत सापडला आहे.याची जाण राज्य सरकारने ठेवून शेतकऱ्यांना योग्य ती मदत करावी.वाघाला मानवी रक्ताची चटक लागल्याने तो नरभक्षक झालेला आहे.या कारणाने सामान्य शेतमजूर, शेतकरी आपला जीव धोक्यात घालून शेती करीत आहे.याची जाणीव ठेवून सरकारने नरभक्षक वाघाला तातडीने जेरबंद करावे किंवा ठार मारावे अशी नागरिकांची मागणी जोर धरत आहे.

लोकांना आश्र्चर्य वाटत आहे की भरदिवसा वाघ माणसांवर हल्ले करून माणसांच्या नरडीचा घोट घेतो आहे. तरी वनाधिकाऱ्यांना वाघ सापडू नये याचे आश्र्चर्य वाटत आहे. वनविभागाने सर्वत्र सापळे लावले असून सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आलेले आहेत अशी उत्तरे लोकांना मिळत आहेत.या उत्तराने लोक समाधानी नसून लोकांना वाघाचा बंदोबस्त झालेला पाहीजे आहे.

आपण स्वत: यात लक्ष घालून वेळीच नरभक्षक वाघाला जेरबंद करून किंवा ठार मारून लोकांना वाघाच्या दहशतीतून मुक्त करावे अशी मागणी आम आदमी पार्टी,राजुरा च्या वतीने तालुका संयोजक रोशन येवले, सहसंयोजक संतोष कुमार तोगर,सुरेश लोखंडे,पवन ताकसांडे,सचिव सुभाष बोरकुटे,स्वप्निल कोहपरे, संदेश वडस्कर,वसंता बावकर, विजय कामपेली श्रीकांत नकलवार, तुळशीराम किन्नाके व जेष्ठ सदस्य मिलिंद गड्डमवार यांनी केलेली आहे.