ऐतिहासिक बौद्ध स्तूपांचे संरक्षण संवर्धन व जतन करण्यासाठी हस्तांतरण करा

25

🔹बुद्धिस्ट इंटरनॅशनल नेटवर्क पुसदचे धरणे प्रदर्शन

✒️बाळासाहेब ढोले(पूसद प्रतिनिधी)मो:-7875157855

पुसद(दि.13ऑक्टोबर):- ऐतिहासिक बौद्ध स्तूपांचे व विहारांचे संरक्षण, संवर्धन व देखभाल करण्यासाठी बुद्धिस्ट इंटरनॅशनल नेटवर्ककडे हस्तांतर करा. या मागणीसाठी बुद्धिस्ट इंटरनॅशनल नेटवर्क पुसद द्वारे तहसील कार्यालयासमोर (दि.12) धरणे प्रदर्शन करण्यात आले.तसेच महामहीम राष्ट्रपतींना या मागणीचे निवेदन देण्यात आले.

भारताची जागतिक स्तरावर बौद्ध जन्मस्थळ व कार्यस्थळ म्हणून ओळख असून बौद्ध संस्कृतीचा देश अशी जागतिक स्वरूपाची मान्यता आहे. सम्राट अशोक व अन्य बौद्ध सम्राटांनी या देशात अनेक स्तूप व विहाराची रचना केलेली आहे. ती आमची ऐतिहासिक धरोवर आहे. महाराष्ट्रात भोन,तेर,अडम, पवनी येथील बौद्ध स्तूप त्रिरश्मी, कारले, सोपारा येथील बौद्ध लेणी व इतर ठिकाणच्या बौद्ध लेणी व स्तूपांचे जतन व संरक्षण करणे ही सरकारची व पुरातत्व विभागाची जबाबदारी आहे.

परंतु सरकार व पुरातत्व विभाग या बाबींकडे अक्षम्य दुर्लक्ष करीत आहे. सदर ठिकाणी इतर लोक अवैध कब्जा करून ऐतिहासिक स्तूपांचे व विहारांचे विद्रुपीकरण करत आहेत. तसेच त्यांना इजा पोहोचवून नष्ट करत आहेत. या ऐतिहासिक बौद्ध स्तूपांचे जतन व संरक्षण होणे ही काळाची गरज आहे. बौद्ध स्तूप ही जगाची ऐतिहासिक बौद्ध विरासत आहे. सरकार व पुरातत्त्व विभाग या ऐतिहासिक विरासतिचे जतन व संरक्षण करत नसेल तर बुद्धीस्ट इंटरनॅशनल नेटवर्कडे हस्तांतरण करावे.

बुद्धिस्ट इंटरनॅशनल नेटवर्क त्यांचे जतन व संरक्षण करेल. या मागणीसाठी बुद्धिस्ट इंटरनेशनल नेटवर्क ने तीन टप्प्यात आंदोलनाची घोषणा केली होती. त्यानुसार पहिला टप्पा दिनांक 5 ऑक्टोबर 2020 रोजी महाराष्ट्रातील 36 जिल्ह्यात धरणे आंदोलन करून पार पडला. दुसरा टप्पा दिनांक 12 ऑक्‍टोबर रोजी महाराष्ट्रातील 366 तालुक्यात एकाच दिवशी तहसील कार्यालयासमोर आंदोलन धरणे आंदोलन करण्यात आले. तिसऱ्या टप्प्याचे आंदोलन दिनांक 30 ऑक्टोबर 2020 रोजी महाराष्ट्रातील सर्व विभागीय पुरातत्व कार्यालयावर धडक मोर्चा काढून करण्यात येणार आहे.

समस्त बौद्ध अनुयायांनी या आंदोलनात तन-मन-धनाने सहभाग घ्यावा असे आवाहन बुद्धिस्ट इंटरनॅशनल नेटवर्क पुसदने केले आहे. निवेदन देताना संतोष पडघणे, अध्यक्ष बुद्धिस्ट इंटरनॅशनल नेटवर्क, लक्ष्मण कांबळे, बंडू गंगावणे, परमेश्वर खंदारे, भारत कांबळे, प्रमोद मुनेश्वर, गणपत गव्हाळे, प्रज्ञा मुनेश्वर, अर्चना खंदारे, वैशाली कांबळे, सखाराम पंडित, दिलीप गायकवाड, रामदास भालेराव, मारोती खंदारे, संदीप कांबळे, पोर्णिमा हनवते, वर्षा सुरवाडे, आकाश गडधने, माया केवटे, ज्योती जोगदंडे, आदी कार्यकर्ते उपस्थित होते.