मत देताना विचार पुर्वक

40

भारतामध्ये जातीवाद आणि विसमतावाद पाळल्या मुळे लोकशाही खऱ्या अर्थाने समाजामध्ये रुजलीच नाही. लोकशाही मध्ये खऱ्या अर्थाने शासन हे लोकांचे असते. आणि लोकांच्या हितासाठी व्यवस्था निर्माण केली जाती. परंतु आज आपण बघितलं तर लोकशाहीच्या नावाखाली घराणेशाही सुरू आहे. घराणेशाही जिवंत राहणे म्हणेजच लोकशाहीला दुर लोटणे होय. लोकशाही मनात आणि समाजात रुजण्यासाठी दुसऱ्याचे हित करण्याची नैतिकता माणसाच्या मनामध्ये येणे गरजेचे असते. आज आपण बघितले तर लोकशाहीमध्ये भांडवलदारांचे हीत साध्य होत आहे. आणि सर्व सामान्य लोकांच्या समस्या वाढतच आहे. याचे कारण तेच आहे. लोकशाही कळाली नाही आणि घराणेशाही सोडली नाही. लोकांनी लोकांचे हित साध्य करून घेण्यासाठी आपल्याकडे गुप्तमतदान प्रक्रिया आहे.

गुप्त मतदान प्रक्रिया असुन सुद्धा नागरिकांनी आपल्या मताचा आधार गुणवत्ता, प्रामाणिक पणा, नविन नेतृत्व आणि कामाला न देता घराणेशाही मजबूत केली आणि आज घराणेशाही भांडवलशाही ला मजबूत करत आहे. जेव्हा मताचा वापर करून लोकांचे हित साध्य करता येणे सहज शक्य होते. तेव्हा मताचा वापर योग्य पद्धतीने केला नाही आणि आज तर मताधिकार पण ईव्हीएम ने काढून घेतलेला आहे. फक्त नावाला निवडणूक प्रक्रिया पुर्ण केली जात आहे. आपण निवडणूक आली की जातीचा उमेदवार निवडून कसा येईल यावर भर दिलेला असतो. परंतू जातीचा उमेदवार आज पर्यंत निवडून खुप वेळा आलेले आहेत परंतु समाजाच्या समस्या काही सुटल्या नाही. म्हणून मत देताना काम, गुणवत्ता आणि जातविरहीत कुशल नेतृत्व या गोष्टींचा विचार करून उमेदवार निवडून देणे गरजेचे असते. निवडणूक झाली की उमेदवार आपले घर भरण्यात मग्न असतो. पाच वर्ष जनतेचा विसर पडलेला असतो. निवडणूकीच्या वेळी सर्वांच्या पाया पडणारा उमेदवार निवडून आल्यावर नजरेने सुद्धा बघत नाही, स्वतः ची गजगंड संपती कमाऊन ठेवतो. लोकांना सुद्धां माहिती असते अमुक उमेदवाराने ईतकी संपती कमावली त्याने तितकी कमावली.

जनतेचा पैसा जनतेसमोर लोकप्रतिनिधी च्या घरात जातो. आणि जनतेला कर्जबाजारी करून महागाईचे चटके दिल्या जातात. म्हणून राजा कोण आणि सत्ता कोणासाठी असते याचा विसर सर्व सामान्य जनतेला पडलेला आहे. निवडणूक फक्त लोकप्रतिनिधी च्या कमाईचे साधन म्हणून बघितले जात आहे. म्हणून मताची किंमत प्रत्येकाने लक्षात घेणे गरजेचे आहे.
ग्रामपंचायत निवडणूकीमध्ये आपले मत देताना अशाच लोकांना दिल्या गेले पाहिजे जो खरचं गावाचा विचार करून ग्राम पातळीवर ग्रामीण प्रश्न निष्पक्षतेने सोडवेल, गावात शिक्षण, आरोग्य, पिण्याचे पाणी, रस्ते यावर जास्त लक्ष देऊन काम करेल त्यालाच मत दिल्या गेले पाहिजे. ग्रामपंचायत गावाची संसद आहे. आणि याच संसदेच्या माध्यमातून गावाचे भविष्य व गावाने स्थान ठरत असते. कोणतीही निवडणूक ही द्वेष पसरवून, एकमेकांबद्दल तिरस्कार निर्माण करणारी नसते.

ग्रामपंचायत निवडणुकीत मध्ये बऱ्याच प्रमाणात वैयक्तिक पातळीवर येऊन सुद्धा वाद होत असतात. भाऊ भावा पासून दुरावतो, गावातील चांगले मित्र एकमेकां पासुन दुरावतात, तर अशा पद्धतीने वर्तन न करता निवडणूक ही लोकशाही यशस्वी करण्याची पहली पायरी आहे. तुम्ही गावात सर्वांसोबत खुप चांगले रहाता, तुमच्या सोबत बाकीचे लोक पण चांगले असतात तरी तुम्हाला मते कमी येत असतील तर दोन गोष्टी लक्षात ठेवाव्यात. पहिली म्हणजे ईव्हीएम तुमच्या बाजुने नाही, दुसरी म्हणजे तुम्ही लोकप्रिय आहात परंतु तुम्ही लोकांचे प्रश्न सोडविण्याची कुठेतरी कमी पडत आहात म्हणून लोकांनी नाकारले अस समजून सर्वांसोबत प्रेमाने व आपुलकी ने वागावे. म्हणजे अडीअडचणीमध्ये फक्त आपले संबध कामी येतात लोकप्रतिनिधी कुठे गायब होतात काहीच पत्ता नसतो. निवडणुकिचे दोन दिवस सर्व गोडगोड बोलतात निवडणूक झाली की कोणी तब्येतीची सुध्दा चौकशी करत नाहीत.

म्हणून ग्रामपंचायत निवडणुकिचे परिणाम आपल्या वैयक्तिक जिवनावर होऊन संबंध बिघडू नये याची काळजी घेणे महत्त्वाचे आहे. आपण डोळसपणे बघितले तर दरपाच वर्षांनी निवडणूका होतात, परंतु कोणताही उमेदवार निवडून आला तर सर्वसामान्य लोकांचा काही फायदा झाला असे वाटत नाही. कारण ग्रामपंचायत पासून तर जिल्हा ठिकाणा पर्यंत लोकांना जन्मदाखला काढण्यापासून तर मृत्यू दाखला काढण्यापर्यंत प्रत्येक ठिकाणी पैसे देऊनच काम करुन घ्यावे लागते. लोकप्रतिनिधी लोकांची लुट होताना बघतो पण काही बोलत नाही कारण तो सुद्धा कुठे तरी फसलेला असतो. त्याची बोली बंद झालेली असते. लोकांना मोफत होणारे व हक्काचे असणाऱ्या कामाला सुद्धां मोबदला देऊन पुर्ण करून घ्यावे लागतात तर लोकप्रतिनिधी चा नेमका फायदा काय? म्हणून ग्रामपंचायत निवडणुकिच्या माध्यमातून आपण देशाचा विचार करणे आवश्यक आहे. कारण आपण आता जर जागृत झालो तर आपण लोकशाही रुजविण्यासाठी यशस्वी होऊ शकतो. जागृत लोकांनी जागृतपणे जर जागृती केली तर लोकांना निवडणूक व राजकारण द्वेषाचे नसुन ते विकासासाठी असते याची जाणीव व्हावी.

नागरिकांनी मताधिकाराचे महत्त्व जाणून घेऊन आपला मताधिकार बजावणे आवश्यक असते. कोणत्याही प्रकारचे संबध न बघता योग्य उमेदवारांना निवडून दिले तर आपल्या गावाचा क्षेत्राचा विकास नक्की होतो. परंतु एकच एक एकाच घरातील उमेदवार निवडून देऊन आपण भ्रष्ट लोकांचे हात बळकट करून स्वत:ला कमकुवत सिद्ध करत असतो. समजा एखाद्या उमेदवाराने लोककल्याणाचे कामच केले नाही तर मतदारांच्या हातात असतं पुढचा वेळी त्याला संधी द्यायची कि घरचा रस्ता दाखवायचा. लोकांना निष्क्रीय, कामचुकार भ्रष्ट लोकांना घरचा रस्ता दाखवून नवीन नेतृत्वाला संधी दिली असती तर निवडणूक आणि लोककल्याणाची कामे दोन्ही बाबी दर्जेदार असत्या. आज ग्रामपंचायत सदस्या पासून तर लोकसभा सदस्यांपर्यंत निवडून कोण येणार याचा अंदाज अगोदरच असतो. हा अंदाज त्याच्या जातीचे किती मत मिळतात यावरून बांधला जातो. आजपर्यंत कोणत्याही निवडणूकीचे निकाल हे त्या व्यक्तीच्या कामाचा आडाखडा बघून लागले नाहीत तर पैसा आणि जातीच्या मतावरून निकाल हाती लागले आहेत. याचा अर्थ लोकशाही मध्ये लोकांना स्वतः चे महत्त्व न कळता उमेदवारालाच महत्त्व प्राप्त झालेले आहे.

उमेदवार लोकप्रतिनिधी कितीही भ्रष्ट असला तरी सामाजिक स्थान दिले जाते आणि मतदारांचा फक्त वापर होऊन लोकशाहीची हत्या केली जाते लोकशाही वाचण्यासाठी निघालेले स्वयंघोषित नेते आणि यांचे चले चपाटे निवडणुकीच्या वेळी गटतट निर्माण करून वेगवेगळ्या गटाच्या मोठमोठ्या किमती घेऊन स्वतः च्या च हाताने हत्या करतात. पैसे घेऊन, जात बघून एखाद्या व्यक्तीला मत देणे ही लोकशाहीची हत्या आहे यावर कोणताच नेता जागृती करून लोकशाही वाचवण्या विषयी बोलत नाहीत. जेथे उमेदवारच भ्रष्ट मार्गाने निवडणूक येतो, आणि मतदार लोकशाही मार्गाने उमेदवार निवडून देत नसेल तर तेथे लोकशाही कोणाच्या विश्वासावर जिवंत राहील हा प्रश्न असतो. म्हणून निवडणुक आली की आपण मतदारांना आपल्या मताची आणि लोकशाही ची जाणीव करून योग्य उमेदवार जो लोकांच्या कल्याणाचा विचार करून जातीव्यवस्था मातीत गाडेला, आणि पारदर्शक व्यवहार करेल अशाच लोकांची निवड व्हावी व जागृत लोकांनी त्याविषयी प्रबोधन करून लोकशाहीचे रक्षण करावे. निवडणूक फक्त उमेदवार वाराचे भविष्य ठरवत नाही तर लोकशाही चे अस्तित्व ठरवते याची जाणीव प्रत्येकाला असते गरजेचे आहे.
*************************************
✒️लेेेखक:-विनोद पंजाबराव सदावर्ते
रा. आरेगाव ता मेहकर
मोबा: ९१३०९७९३००
*************************************