चौकीदार आणि 303 खासदार

33

एकविसाव्या शतकात आपली वाटचाल सुरू आहे, दोन हजार एकोणिसाव्या वर्षातुन दोन हजार वीस मध्ये कधी आलो नी गेलो ते अनेक लक्षवेधी कारणाने कोणालाच समजलेच नाही. दोन हजार एकवीस चे स्वागत कशा पद्धतीने करावे यांचे नियोजन कोणा कडेच नाही. केंद्र सरकारने कामगार, कर्मचारी अधिकारी शेतकरी शेतमजूर यांनी कसे जगावे यांचे वीस पंचवीस वर्षांचे नियोजन करून ठेवले आहे.अलिबाबा आणि चाळीस चोर यांची खूप छान जुनी गोष्ट आहे.अलिबाबा सर्वांना माहिती होता, आज आपल्या देशाला अलिबाबा आणि ३०३ चोर दिसत नाही. पण एकच मुख्यचौकीदार सर्वांना दिसतो. आज भारतात आर एस एस प्रणित केंद्र सरकार सत्तेवर आहे,ते एकट्या नरेंद्र मोदीं यांचे आहे असे दिसते, मग तीनशे तीन खासदार कोण आहेत?. एकाही खासदारांचा आवाज ऐकू येत नाही. सर्व चाळीस चोरा सारखे सारखेच दिसतात. आणि चौकीदारांच्या भूमिकेत बरोबर वागत आहेत.

ग्रामीण भागात एक प्रसिद्ध जुनी म्हण आहे, “कुंपणचं शेत खाते” तशीच परिस्थिती आज देशाची झाली आहे, चौकीदार एकटा चोर नाही. तर चौकीदार आणि ३०३ चोर मिळून मिसळून देशाची आर्थिक लूटमार करीत आहेत. गेल्या वर्षात म्हणजेच २०२० ला काय काय पराक्रम चौकीदार आणि ३०३ चोरांनी केले त्यांची यादी नवीन वर्षाच्या २०२१ ला प्रवेशासाठी जातांना आपल्या हातात किंवा मनात असावी म्हणून देत आहे. त्यांनी केलेल्या कामाचा सकारात्मक विचार करावा की नकारात्मक हा देशातील सर्व कट्टरपंथी हिंदूंचा प्रश्न आहे. मी नकारात्मक विचार करून लिहत असेल आणि ते तुम्ही वाचत असाल तर आपण देशद्रोही ठरणार आहोत.म्हणूनच सकारात्मक विचार करूनचं वाचा.

नोट बंदी झाली त्यातुन नवीन नोटा बाजारात आल्या त्यामुळे किती भ्रष्टाचार थांबला असे विचारू नका, पूर्णपणे बंद झाला असे समजा,प्रचंड काळा पैसा बाहेर पडला. अतिरेकी कारवाया पूर्णपणे बंद झाल्या.जी एस टी मुळे देशातील सर्व व्यापारी लघुउद्योग यांच्या धंद्यात तेजी आली. तीन देशभक्त उद्योगपतीनां जी एस टी मध्ये विशेष सूट दिल्या गेली आहे.त्यामुळेच किती करोड युवकांना रोजगार उपलब्ध झाला, बेरोजगारी जवळजवळ संपलीच.जर असती तर विधानसभा, लोकसभा मतदारसंघात आमदार खासदार मतदारासमोर छातीवर करून फिरलेच नसते. थोडा सकारात्मक विचार की राव कुठेही असंतोष दिसतो काय?.

२०१३/१४ ला काँग्रेस पक्षाचे केंद्रात मनमोहन सिंग यांचे सरकार सत्तेवर होते.पेट्रोल,डिझेल,गॅस,कांदा,भाजीपाला किती किती महागाई वाढली होती, भ्रष्टाचार, अतिरेकी कारवाई सीमेवर आपले जवान शहीद होत होते. त्यानामर्द सरकारच्या विरोधात तेव्हाच्या दमदार विरोधी पक्षांनी गल्ली बोळात पार दिल्ली पर्यंत भारतीय जनतेत जनजागृती, जनआंदोलन करून काँग्रेसच्या लोकप्रतिनिधी व पदाधिकारी यांना मोकळ्या हवेत श्वास घेणे सुद्धा अशक्य केले होते.नेते,अभिनेते,अभिनेत्री रस्त्यावर उतरून आंदोलने करीत होती.प्रधानमंत्री, गृहमंत्री, अर्थमंत्री सर्वांना बांगड्या, साड्या भेट दिल्या जात होत्या.असा धडाकेबाज विरोधी पक्ष आणि नेते भविष्यात होणे शक्य नाही.यांचा भारतीय नागरिकांनी देशभक्त म्हणून सकारात्मक विचार करावा.

चौकीदार आणि ३०३ खासदारांनी त्यांच्या मित्र पक्षांच्या खासदारांनी सत्तर वर्षात निर्माण झालेली सर्व घाण स्वच्छ करून टाकली.अनेक महत्वकांक्षी प्रश्न,समस्या कायमच्या सोडविल्या.राम मंदिरांचे भूमी पूजन झाले कारण राम मंदिरासाठी तीस वर्षे चाललेला संघर्ष एकदाचा पूर्णपणे थांबला.सर्व ८५ टक्के मराठा,ओबीसी मागासवर्गीय समाजाच्या कल्याण व विकासासाठी राम मंदिर होणे आवश्यक होते. त्यामुळे त्यांच्या शिक्षण, आरोग्य आणि नोकरीचा प्रश्न आता ऑनलाइन दर्शन घेऊन मोठ्या प्रमाणात सोडवता येईल. नवीन वर्षात देशातील कामगार कर्मचारी यांचे कायमस्वरूपी नोकऱ्या जाणार नाहीत तर त्याला कंत्राटी कामगार म्हणून कष्ट करून मरे पर्यत वयाची बिलकुल अट ठेवली नाही तो काम करू शकतो. आणि शेतकरी हा भूमिहीन शेतमजूर म्हणून कृषिउत्पन्न बाजार समितीच्या बाहेर हमाली करण्यासाठी उभा राहिलेला दिसणार नाही. तर मालक म्हणून व्यापाऱ्यांना अधिकारी लोकप्रतिनिधी यांनी कडक राम राम करतांना दिसेल. “मुळशी पार्टन”

हिंदू धर्मातील सर्व भक्तानां दुःख मुक्त करण्यासाठी अयोध्या येथे राम मंदिर बांधकाम सुरू झाले आहे. त्याला पैशाची चणचण जाणवत असल्यामुळे प्रत्येक जिल्ह्याला दोन कोटी रुपये गोळा करण्याचे उद्धिष्ट दिले आहे.मराठा ओबीसी समाजाच्या लोकांनी सकारत्मक विचार करून आपल्या येणाऱ्या पिढीला हजारो वर्षे कायम सुखरूप ठेवण्यासाठी सढळ हस्ते आर्थिक मदत केली पाहिजे.त्यांचा सरळ लाभ हजारो वर्षे आपल्या येणाऱ्या पिढीला मिळणार आहे. कारण इतिहासात त्यांची सुवर्ण अक्षरात नोंदणी होणार आहे. त्यांची सुरवात देशाच्या सर्वोच्च पदी बसलेल्या आणि माणूस म्हणून मंदिरात प्रवेश नसणाऱ्या दलिताच्या (राष्ट्रपती नव्हे) हस्ते पांच लाख शंभर रुपये चेक देऊन झाली आहे.तो चेक देतांचा फोटोसह बातमी सर्व प्रिंट चॅनल मीडिया द्वारे ८५ टक्के मागासवर्गीय समाजाच्या विशेष मराठा,ओबीसी समाजाच्या घराघरांत पोचविण्याची विशेष व्यवस्था केली जात आहे.त्यासाठी लवकरच छोट्या पुस्तिका, व्हिडीओ,ऑडिओ उपलब्ध करून दिल्या जातील. म्हणूनचं देशहितासाठी सकारत्मक विचार करावा. नकारात्मक विचार करून देशद्रोही होऊ नये.

केंद्र सरकारची आर्थिक परिस्थिती भक्कम आहे. त्यांची काळजी देशभक्तांनी करू नये. त्यांचा विकासासाठी निधी कमी पडू नये म्हणूनच मोदी यांनी काही एयरपोर्ट जमिनिसह विकले आहेत.देशातील सर्वात मोठ्या रेल्वेचे खासगीकरण करून अदानी,अंबानी यांना देशच भारतीय देशभक्ताचा आर्थिक विकासासाठी चालविण्यास दिला आहे.बी.एस.एन.एल मोडीत काढली नाही. तर नकारात्मक विचार करणारे लोक तसे सांगता.बँकांचे एकत्रीकरण करून गरिबांना जास्त पैसा खर्च न करता जमा करता यावा आणि उच्चवर्णीय व्यापाऱ्यांना तो सहज उपलब्ध व्हावा यासाठी खूप महत्वपूर्ण निर्णय मोदी सरकारने घेतला,सत्तर वर्षात गरिबी हटावच्या योजना राबविल्या गेल्या त्यांचा विकास व कल्याण होऊ दिले नाही. त्यामुळेच मोदी आणि ३०३ खासदारांनी गरीब आणि गरीबी नष्ट करणारा सकारात्मक विचार करून निर्णय घेतला आहे.
ओ एन जी सी करीत असलेले सर्व काम रिलायन्सला दिले त्यामुळेच तीनशे रुपयांचे गॅस सिलेंडर आठशे रुपयाला दिला. तरी देशात कुठेही महागाई झाली म्हणून कोणी आंदोलने केली काय?.लोकांनी आनंदाने सर्व सकारात्मक विचार करून स्वीकारले की नाही?. कारण देशात एकशे तीस कोटी हिंदू राहतात.ते देशभक्त असलेल्या पक्षांचे निष्ठावंत भक्त अनुयायी आहेत.

देशात जातिव्यवस्था जास्त डोके वर काढत होती,मराठा, धनगर,गुजर,जाट,ओबीसी,एसी एसटी सर्वच आरक्षण मागत होते त्यासाठी खाजगीकरण करून सर्वांचे तोंड कायमची बंद करण्याचा निर्णय मोदी आणि ३०३ खासदारांनी मोठया धाडसाने घेतला.कुठे मोठा आवाज ऐकू आला काय?. कारण मराठा,गुजर,जाट, धनगर ओबीसी एस सी,एसटी प्रथम कट्टरपंथी हिंदू आहेत नंतर भारतीय. ३०३ खासदारात किती ओबीसी, एस सी,एसटी,आदिवासी, अल्पसंख्याक खासदार आहेत?. त्यांची विचार सारणी सकारात्मक आहे म्हणूनच नां?. तेच जर नकारात्मक विचार सारणी असती तर मोदी सरकार कधीच गडगडले असते.त्यांना शंभर टक्के खात्री आहे. मराठा,गुजर,जाट, धनगर,ओबीसी एस सी,एसटी,आदिवासी प्रथम कट्टरपंथी हिंदू देशभक्त आहेत,आणि ते देशभक्त पक्षाच्या बाजुनेच उभे राहतील.म्हणूनच केंद्र सरकारच्या मालकीच्या कंपन्या विकून मोदींनी स्वतःच्या साठी आठ हजार पाचशे कोटी रुपयांचे विमान खरेदी केले.रेल्वे स्टेशन,मेल एक्सप्रेस गाड्या,विमानतळ विकून भारतीय देशभक्त नागरिकांसाठी बुलेट ट्रेन सुरू करण्यात येणार आहे.

हे असे सर्व धाडसी निर्णय घेण्यासाठी आणि त्यांची अंमलबजावणी करण्यासाठी शेपन्न इंच छाती लागते.गेंड्याची कातडी लागते.मनावर दगड ठेऊन निर्दयी बनावे लागते.अठरा अठरा तास चौकीदारी करावी लागते. कोणतेही परिश्रम न करता देशाची सर्वोच्च सत्ता काबीज करता येत नाही. त्यासाठी रक्तपात,बॉम्ब स्पॉट पुलवामा घडवून आणण्यासाठी विशेष कला कौशल्य लागते.मीडियावर वर जबरदस्त पकड निर्माण करता आली पाहिजे. पक्षातील सर्व वरिष्ठांना बाद करण्यासाठी धक्कादायक निर्णय घेण्याची क्षमता लागते.नकारात्मक विचार करणाऱ्यांनी उगाच चौकीदार चोर है म्हणून नये. पक्षांवर आणि ३०३ खासदारावर नियंत्रण ठेवणे म्हणजे खायाचे काम नाही.

देशात कुठे काय चालले यांचा बिलकुल विचार करू नका.चुपचाप सर्व उगड्या डोळ्याने पहा,कांनाने ऐका, बोलू अथवा लिहू नका,नाहीतर देशद्रोही ठरविल्या जाणार. बहुमताच्या जोरावर राष्ट्रपती, मुख्य न्यायाधीश, पोलीस महासंचालक सुध्दा गुलाम बनविल्या जातो.आणखी काय काय सांगावे,लिहावे.सकारत्मक किंवा नकारात्मक विचार करणेच सोडून द्या.भावनाहीन होऊन जगा तरच तुम्ही राम भक्त,देशभक्त ठरणार आहात.चौकीदार आणि ३०३ खासदार कुठे काय काय करतात चर्चा सुद्धा करू नका. ग्रामीण भागातील शेतकरी शेतमजूर सुध्दा तुम्हाला देशद्रोही ठरवून पोलिसांना कारवाई करण्यासाठी भाग पडतील.हे विचारांचे विडंबनात्मक लिखाण केले आहे, ते सकारात्मक घ्याचे की नकारात्मक ते वाचकांनीच ठरवायचे.

✒️लेखक:-सागर रामभाऊ तायडे,९९२०४०३८५९,
भांडुप मुंबई(अध्यक्ष स्वतंत्र मजदूर युनियन महाराष्ट्र राज्य)