योग्य शिजवलेले चिकन खाल्ल्याने आजार नव्हे, ‘इम्युनिटी’ वाढते- पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर

28

✒️प्रदीप रघुते(अमरावती प्रतिनिधी)मो:-9049587193

अमरावती(दि.30जानेवारी):- अंडी व चिकन हा प्रथिनसंपृक्त आहार आहे. ते पूर्णपणे उकडून खाणे सुरक्षित असून, बर्ड फ्लूबाबत गैरसमज निर्माण करणा-या अफवा कुणी पसरवल्यास गुन्हे दाखल करण्यात येतील, असा इशारा राज्याच्या महिला व बालविकास मंत्री तथा जिल्ह्याच्या पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांनी आज येथे दिले.

अमरावती पोल्ट्री फार्म असोसिएशनतर्फे दस्तुरनगरातील गुणवंत हॉलमध्ये आयोजित जनजागृतीपर कार्यक्रमात त्या बोलत होत्या. असोसिएशनचे डॉ. शरद भारसाकळे, आकाश खुरद, माजी महापौर विलास इंगोले, सुनील झोंबाडे, सुरेखाताई लुंगारे, बाबासाहेब रावणकर, डॉ. राजेंद्र महल्ले, जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त डॉ. मोहन गोहोत्रे, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. विजय रहाटे, डॉ. सचिन बोंद्रे, राजीव भोजने यांच्यासह अनेक मान्यवर व विविध पोल्ट्रीधारक यावेळी उपस्थित होते.

पालकमंत्री श्रीमती ठाकूर म्हणाल्या की, चिकन- अंडी योग्य पद्धतीने शिजवल्यास पूर्णपणे सुरक्षित आहे. शिवाय, ते खाल्ल्याने इम्युनिटी वाढते. शरीराला प्रथिनांची गरज असते. संसर्गाशी लढण्याशी ताकद अंडी व चिकनमधून मिळते. त्यामुळे अंडी या आहाराचा पोषण आहार योजनेतदेखील शासनाने समावेश केला आहे. या उत्कृष्ट व प्रथिनयुक्त अन्नाबाबत विनाकारण कुणीही गैरसमज पसरवू नयेत.अफवांमुळे पोल्ट्रीधारक बांधवांचे मोठे नुकसान झाले आहे.

त्यांना आवश्यक ती मदत मिळवून देण्यासाठी मी पशुसंवर्धन मंत्र्यांशी चर्चा केली आहे. त्याबाबत पाठपुरावा करून निश्चित तोडगा काढला जाईल, असेही पालकमंत्र्यांनी सांगितले.बर्ड फ्लूबाबत गैरसमज पसरून पोल्ट्रीधारकांचे नुकसान होते. व्यवसाय व रोजगाराची हानी होते. कोरोनाकाळात तर नियमित चिकन अंडी खाऊन प्रतिकारशक्ती वाढविण्याची गरज आहे. दणकट आरोग्यासाठी ते आवश्यक आहे. त्यामुळे कुठलाही गैरसमज न बाळगता तंदुरूस्तीसाठी नियमित अंडी- चिकन खाण्याचे आवाहन श्री. खुरद, श्री. भारसाकळे व विविध पोल्ट्रीधारकांनी केले. निवेदिका क्षिप्रा मानकर यांनी या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.

यानिमित्त आयोजित स्नेहभोजनात अंडी व चिकनच्या प्रथिनयुक्त चवदार पदार्थांचा विविध क्षेत्रातील अनेक मान्यवरांनी आस्वाद घेऊन हे अन्न पूर्णतः सुरक्षित असल्याचा दाखला दिला.
संतोष मेटकर, अभिजित मानकर, अभय बोंडे, श्याम गुल्हाने, संदीप गोळे, मो. हाफीज, इद्रिस सैफी, अतुल पेरसपुरे, गजानन ठाकरे, नरेंद्र सांगोले, सुरेश ठाकूर, गिरीश घाटोळे, विजुभाऊ पुंड, शुभम महल्ले आदी उपस्थित होते.