देऊया, एकच संदेश : करुया, पाणथळ प्रदेश

26

[विश्व पाणथळ जमिन दिवस]

आपला भारतदेश कृषिप्रधान देश आहे. शेतीभातीस पाणथळ जमिनीची फार आवश्यकता असते. अशा जमिनीत रोपे जोमाने वाढतात व पिकसुद्धा भरघोस येते. इराणमधील कॅस्पियन या समुद्राच्या किनाऱ्यावरील रामसर या शहरात ‘पाणथळ प्रदेशाचे महत्त्व‘ या विषयावर परिषद आयोजित करण्यात आली होती. पाणथळ प्रदेशांना मानवी जीवनात असलेले स्थान सर्वांना समजावे, या हेतुने दरवर्षी २ फेब्रुवारी हा दिवस ‘वेटलँड्स डे’ साजरा केला जावा, असा निर्णय या परिषदेत घेतला गेला. असा पहिला दिवस सन १९९७ साली साजरा झाला. बहु उपयोगी पाणथळ प्रदेश : सद्या आपण हातपंप किंवा मोटारपंप बसवून भूगर्भातील पाण्याचा भरपूर वापर करतो. या पाण्याचे पुनर्भरण करण्याचे काम पाणथळ प्रदेश करतात.

अनेकदा आपण प्रदूषित पाणी व इतर हानिकारक द्रव्ये अशा प्रदेशात फेकतो खरे; परंतु पाणथळ जागी वाढणाऱ्या वनस्पतीच या घटकांना गाळण्याचे काम करून पाणी शुद्ध करतात. उदा.कोलकात्यातून बाहेर टाकल्या जाणाऱ्या घाण पाण्याचा काही भाग शुद्ध करण्यासाठी जवळच्या पाणथळ प्रदेशाचा वापर केला जातो. डोंगर उतारालगतच्या जमिनीत कुजलेला काडीकचरा व पालापाचोळा मिश्रीत पाणी झिरपत असतो ती काळी कसदार भूमी, भातखाचरे आणि मत्स्यबीज उत्पादनासाठी बनवलेली तळी हे देखील पाणथळ प्रदेशच आहेत. त्यांमधून जगभरातील ३ अब्ज लोकांना दररोजचे अन्न – भात, पोळी, भाकरी, भाजी, कडधान्य, तेलबिया, मासे आदी मिळते. सागरी किनारपट्टीवर असलेल्या अशा गवतयुक्त पाणथळ प्रदेशांमुळे लाटांनी होणारी किनाऱ्यावरील धूप थांबवली जाऊन वादळांपासून होणारे नुकसानही घटते.

शिवाय समुद्राचे आक्रमण थोपवून किनारी जमीन अतिक्षारयुक्त अर्थात निरुपयोगी खारपड होण्याची क्रियाही तेथील मॅनग्रुव – खारफुटी प्रकारच्या झुडपांमुळे कमी होते. नदीला पूर आल्यास किंवा अतिवृष्टी झाल्यासही हे जास्तीचे पाणी किनारी पाणथळ प्रदेशात मुरते व मानवीवस्ती जलमय होण्याच्या संभाव्य धोक्याचे प्रमाण कमी होते. महाराष्ट्राचा विचार केल्यास असे दिसते की इथले महत्त्वाचे पाणथळ प्रदेश हे दख्खनच्या पठारावरील नद्या-उपनद्या, धरणांमागील जलाशय आणि पाझर तलावांच्या आसपासच्या परिसंस्था आहेत. यामुळे भूजलाचे पुनर्भरण आणि पाझर यात मोलाची मदत होते.
पाणथळ प्रदेश : नदी, तलाव, सागरी किनारे, गावालगत अशा ठिकाणी उथळ पाण्याने झाकलेल्या व अनेकविध प्रकारच्या गवतांनी आणि झुडपांनी भरलेल्या पाणथळ जमिनी आपल्याला आढळतात.

यामध्ये कृत्रिम तलाव व कालवे, मिठागरे, सांडपाण्याचे तलाव, मत्स्यशेती तलाव, शेततळी, भाताची खाचरे अशा मानवनिर्मित स्थळांचाही पाणथळ भूमीत किंवा प्रदेशात समावेश होतो. म्हणून अशाप्रकारची जमिन करण्याकडे तेथील शेतकऱ्यांनी जातीने लक्ष घातले पाहिजेत.
पक्षी आणि पाणथळ प्रदेश : बगळे, बदके, करकोचे, खंड्या तसेच शिकारी प्रजातींच्या व इतरही अनेक पक्ष्यांना पाणथळ प्रदेशांतूनच अधिवास मिळतो. ‘प्लवर’सारख्या विशिष्ट प्रजातींच्या पक्ष्यांची घरटी पाणथळ प्रदेशांत आढळतात. करकोचे, शराटी – इबिस, चमचा, रोहित – फ्लेमिंगो हे पक्षीही पाणथळ जागीच येतात. या जमिनीलगतच्या वृक्षांवर मधुमक्षिका आपले मधपोळे मोठ्या प्रमाणात बांधतात. अगदी सयबेरियासारख्या प्रदेशांतूनही क्रेन आणि बदके येथे येतात. कारण येथे त्यांना अन्न मिळते. हे पक्षी या प्रदेशात अन्नसाखळीतला एक महत्त्वाचा दुवा ठरतात.
आपण काय करू शकतो? : दुर्दैवाने आज पाणथळ प्रदेशांकडे ‘वाया गेलेली जमीन’ म्हणूनच पाहिले जाते, पण जैविक आणि पर्यावरणीय साखळीतील त्यांचे महत्त्वाचे स्थान लक्षात घेऊन ते जतन करून, तिथला कचरा आदी दूर करून त्यांचा सजगतेने वापर करणे गरजेचे आहे. प्रत्येकाने आपली जबाबदारी ओळखून वैयक्तिक पातळीवर सुद्धा पाणथळ प्रदेश वाचविण्याचा प्रयत्न केला तरी या दिशेने एक ठोस पाऊल उचलले जाऊ शकते. आपल्या प्रत्येकाच्या खारीच्या वाट्याने पृथ्वीवरची ही महत्त्वाची समस्या काही प्रमाणात कमी होऊ शकते आणि पर्यावरणाची बूज राखली जाऊ शकते. शेतकरच नाही तर एका कृषिप्रधान देशातील सुजान नागरिक या नात्याने पाणथळ भूमीचे क्षेत्रफळ वाढविण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत.

✒️ शेतकरीपुत्र:-श्री कृष्णकुमार गोविंदा निकोडे गुरुजी.
(मराठी साहित्यिक व संत-लोक साहित्याचे गाढे अभ्यासक)मु. पिसेवडधा, पो. देलनवाडी,
ता. आरमोरी, जि. गडचिरोली.
मधुभाष – ७७७५०४१०८६.
इमेल – nikodekrishnakumar@gmail.com