गोपुरी वर्धा सेवाग्राम खादी कपड्यांच्या प्रदर्शनाचे उद्घाटन

30

✒️माधव शिंदे(नांदेड,जिल्हा प्रतिनिधी)मो:-7757073260

नांदेड(दि.3फेब्रुवारी):- स्वामी प्रत्ययानंद सरस्वती, चिन्मय मिशन नांदेड यांच्या प्रमुख उपस्थितीत व जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांच्या हस्ते खादी प्रदर्शनाचे उद्घाटन स्वानंद स्वदेशी भांडार, अष्टविनायकनगर, कॅनलरोड, भावसार चोकाजवळ नांदेड येथे संपन्न झाले. याप्रसंगी नायब तहसिलदार सुनील माचेवाड, कॉटन फेडरेशनचे मॅनेजर संदिप पाटिल हनवते, एपीआय बालाजी गाजेवार यांची याप्रसंगी विशेष उपस्थिती होती.

यावेळी राजेंद्र देवणीकर यांनी खादी व ग्रामोद्योग याविषयी आपले मनोगत व्यक्त केले. स्वानंद स्वदेशी भांडाराकडून विविध पर्यावरण स्नेही नैसर्गिक कृषिपूरक स्वावलंबी ग्रामोद्योगाच्या दृष्टिकोनातून विविध उपक्रम नांदेड जिल्ह्यात राबवले जातात. नैसर्गिक विषमुक्त धान्य, भाजीपाला, लाकडी घाण्याचे तेल, मातीच्या श्रीगणपतीच्या मूर्ती आणि देशभरातील खादी व हातमाग यांनी तयार केलेली सुती कपडे यांचे प्रदर्शन व प्रचार चालू असतो. ग्रामउद्योगात तयार झालेल्या वस्तू कृषिप्रधान अर्थव्यवस्थेला चालना देतात. या माध्यमातून गावातला पैसा गावात राहतो तद्वतच ग्रामस्वावलंबन होण्यास मदत होते. मेक इन इंडिया म्हणजे खऱ्या अर्थाने ग्राम स्वावलंबन होय.

याप्रसंगी जिल्हाधिकारी नांदेड डॉ. विपीन इटनकर यांनी कापसापासून तयार झालेल्या खादी सुती कपड्यांचा व ग्रामोद्योगातील वस्तूंचा प्रसार जिल्ह्यात सर्वदूर होण्याची गरज आहे. तसा प्रचार सर्वांनी केला पाहिजे असे मत व्यक्त केले व प्रशासनाचे सहकार्य मिळेल असे सांगितले. तसेच त्यांनी ग्रामसेवा मंडळ गोपुरीचे व्यवस्थापक व प्रचारक सुरज विठ्ठल करुले, श्रीकृष्णा मेहेर, अतुल काकडे यांचा सत्कार करुन त्यांना शुभेच्छा दिल्या.

ग्रामसेवा मंडळ गोपुरी वर्धाचा खादी कपडा हा चांगल्या दर्जाचा असून उन्हाळ्यात थंड व हिवाळ्यात गरम व उबदार राहतो, असे सांगितले. पुरुष व महिलासाठी खादी ड्रेस मटेरियल, खादीच्या साडया व खादी बेडशिट उपलब्ध असून नांदेड वाशियांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन ग्रामसेवा मंडळ गोपुरीचे व्यवस्थापक व प्रचारक सुरज विठ्ठल करुले यांनी केले.

याप्रसंगी अॅड. उदय संगारेड्डीकर यांनी कार्यक्रमाची प्रस्तावना व राजेन्द्र देवणीकर यांनी आभार मानले. या प्रदर्शन उद्घाटनाच्या कार्यक्रमास श्रीमती सुधा देशपांडे, सौ. निर्मला खडतकर, श्रीमती विद्या उजळंबे, सौ. मीरा देवणीकर, राजेंद्र उदगीरकर, शरणाप्पा बिराजदार, संतोष देवणीकर, दिलीप कासार, बालाजी सरसे, कामाजी पाटील मरळकर यांची उपस्थिती होती.