बुलडाण्यात कोविड रूग्णांसाठी जम्बो हॉस्पीटल उभारणार -पालकमंत्री डॉ राजेंद्र शिंगणे

33

🔸चार ठिकाणी ऑक्सीजन टँकची उभारणी करावी

✒️अंबादास पवार(विशेष प्रतिनिधी)

बुलडाणा(दि.18मार्च):- कोविड साथरोग आजाराचे वाढते रूग्ण बघता प्रशासकीय यंत्रणांनी समन्वयाने काम करावे. कोविड साथरोगावर नियत्रण मिळविण्यासाठी व रूग्णांवर प्रभावी उपचार करण्यासाठी बुलडाणा शहरात 500 खाटांचे जम्बो हॉस्पीटल उभारण्यात यावे. त्यासाठी जागा बघून यंत्रणेने प्रस्ताव तातडीने सादर करावा, अशा सूचना जिल्हयाचे पालकमंत्री डॉ राजेंद्र शिंगणे यांनी दिले.

कोविड संसर्ग नियंत्रणासाठी कार्यदलाची आढावा बैठक 18 मार्च रोजी जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात आयोजित करण्यात आली. त्यावेळी पालकमंत्री डॉ शिंगणे आढावा घेताना बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी एस रामामूर्ती, जिल्हा पोलीस अधिक्षक अरविंद चावरीया, अति. जिल्हाधिकारी दिनेश गिते, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ नितीन तडस, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ बाळकृष्ण कांबळे आदी उपस्थित होते.

जिल्ह्यातील दे. राजा, मलकापूर, खामगांव व शेगांव येथे ऑक्सीजन टँक उभारण्याच्या सूचना करीत पालकमंत्री म्हणाले, या ठिकाणी कोविड रूग्णांची संख्या बरीच असते. त्यामुळे या चारही ठिकाणी शासकीय रूग्णांलयामध्ये ऑक्सीजन टँकची उभारणी करण्यात यावी. जेणेकरून तेथील रूग्णांना गरजेनुसार तातडीने ऑक्सीजन उपलब्ध करून देता येईल. त्याचप्रमाणे प्रत्येक तालुक्यामध्ये कॉर्डीयाक रूग्णवाहिकेची व्यवस्था करण्यात यावी. त्यासाठी प्रस्ताव तयार करून मंजूरातीसाठी पाठवावा. कोविड रूग्णांवर प्रभावी असलेले रेमेडेसिवीर इंजेक्शनचे दर नियंत्रणात ठेवावे. या इंजेक्शनचे दर 1100 ते 1200 रूपयादरम्यान नियंत्रणात ठेवावे. जिल्ह्यात पुढील रूग्णसंख्या वाढ लक्षात घेता ऑक्सीजन बेड व अन्य आरोग्यविषयक सुविधा तयार ठेवाव्या. गर्दी होणारे कार्यक्रम, लग्न समारंभावर लक्ष ठेवावे. नियम मोडणाऱ्यांवर कडक कारवाई करावी.

ते पुढे म्हणाले, हिवरा आश्रम येथील ग्रामीण रूग्णालयासाठी मनुष्यबळाचा आकृतीबंध तयार करून पाठवावा. त्याला मंजूरात घेता येईल. सध्या कोविड तपासणीचा वेग चांगला आहे. त्यासाठी कॅम्प घेणे, सुपर स्प्रेडरचा शोध घेणे आदी कारणे महत्वाची आहेत. तपासण्यांचा वेग कमी होवू देवू नका. याच धर्तीवर आता लसीकरणासाठी काम करावे. कोविड संसर्ग सुरक्षा नियमांचा अवलंब करीत शिबरे आयोजित करून लसीकरण करावे. प्राथमिक आरोग्य केंद्र निहाय लसीकरणाचा आढावा नियमितरित्या घेण्यात यावा. तसेच सर्व जनतेने मास्क वापरणे, हात वारंवार धुणे व गर्दीत जाणे टाळणे या त्रिसूत्रींचे काटेकोरपणे पालन करावे. यावेळी पालकमंत्री यांनी तालुकानिहाय आढावा घेतला.