पक्ष,संघटना एकखांबी नेतृत्व नसावे

31

चार पायाच्या जनावरांत आणि जलतळ प्राण्यात संस्था,संघटना,पक्ष नसतात तरी ते संकटात सापडल्यावर एकत्र येऊन संघटीत पणे मुकाबला करतात त्यात कोणी नेता नसतो.पण सामूहिक नेतृत्व मात्र कायम असते.त्यांचे वर्णन लोकशाहीर वामन दादा कर्डक यांनी एका गीतात खूप अर्थपूर्ण केली आहे. “अन्याय अत्याचारांची येतच हाक रे भरुरूरू उडावी पाखरे” चिमणी पाखरे,मध माश्या आणि मुंग्या यांचे संघटन वैचारिक दृष्ट्या खूप मजबूत आणि प्रेरणादायी असते.त्यांना माणसा सारखे बोलता येत नाही,विचार करता येत नाही, किंवा माणसा एवढा स्वार्थी मेंदू त्यांना नसतो.तरी ते वेळोवेळी संघटितपणे शक्ती प्रदर्शन करतात.त्यांच्यात माणसासारखी जनजागृती करावी लागत नाही. ते जन्मापासून जगण्यासाठी संघर्ष कसा करावा ते शिकतात.

माणसांच्या मुलांना जन्मापासून सर्वच शिकवावे लागते.तेव्हाच तो शैक्षणिक,सामाजिक,सांस्कृतिक आर्थिक विकास करतो.वाईट गोष्टीचे आणि व्यसन करण्याचे शिक्षण, प्रशिक्षण दिले जात नाही.ते ज्या मित्रा सोबत मैत्री असते ती मित्रमंडळी आपोआप सर्व शिकवत असतात. यासाठीच संस्था, संघटना पक्षाची गरज असते. अन्याय अत्याचार झाल्यावर एकत्र येणाऱ्यांची संस्था, संघटना पक्ष फार काळ टिकत नाही. कारण त्यांचे एकत्र येण्याची मुख्य उद्धिष्ट,ध्येय धोरण निश्चित नसतात.त्यात कोणतीही जनजागृती नसल्यामुळे ते जेवढे जवळ येतात तेवढ्याच ते लांब जात असतात.जागृती हे जरी समाजाच्या उन्नतीचे मुख्य अंग असले, तरी नुसत्या जागृतीचा उपयोग नाही. समाजाच्या उन्नतीकरिता काही विधायक कार्यक्रमाची आवश्यकता असते.समाजात एखाद्या माणसाने जागृती केली व त्याच्या मृत्यूनंतर समाजाला दिशा दाखविणारा दुसरा एखादा कर्तबगार पुरुष निर्माण झाला नाही तर एकखांबी तंबूप्रमाणे समाज मोडकळीस येतो- असे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी १४ जानेवारी १९५५ ला मुंबईत कार्यकर्त्यांना सांगितले होते. म्हणूनच संस्था, संघटना पक्ष स्थापन करतांना त्यांची लिखित घटना असते, सामाजिक,शैक्षणिक, सांस्कृतिक आर्थिक आणि राजकीय कामकाज कसे करावे?. कोणी करावे?. त्यांची नियमावली बनविली असते.त्यांची काटेकोरपणे अंमलबजावणी झाली तर सुरुवात पासून सर्वांनाच त्यांचे पालन करावे लागते. त्यामुळेच संस्था संघटना पक्षात कधीच एक खांबी नेतृत्व उभे राहत नाही. त्यासाठी जीवनशैलीचे तत्व खूप महत्वाचे असते.

सभासदाला कार्यकर्ता पदाधिकारी नेता बनण्याचे स्वप्न असावे पण ते साकार करण्यासाठी ध्येयवादी गगनभरारीचं वेड असावे लागते.कबुतराला गरुडाचे पंख लावता येतीलही पण गगनभरारीचं वेड हे रक्तातच असावं लागतं. कारण आकाशाची ओढ दत्तक घेता येत नाही. उन्हाळ्यात आणि पावसाळ्यात वादळे जेव्हा येतात तेव्हा आपण आपल्या मातीला घट्ट रुजून राहायचं असतं. ती जितक्या वेगाने येतात तितक्याच वेगाने निघूनही जातात. वादळ महत्त्वाचे नसते. प्रश्न असतो कि आपण त्यांच्याशी कशी झुंज देतो आणि त्यातून कितपत बऱ्या अवस्थेत बाहेर येतो.कार्यकर्त्यांच्या नेत्यांच्या जीवनात अशी वादळ कायम घोंगावत असतात. आकाशात जेव्हा एखादा कृत्रिम उपग्रह सोडतात तेव्हा गुरुत्वाकर्षणाच्या सीमेबाहेर पिटाळून लावेपर्यंत सगळा संघर्ष असतो. त्याने एकदा स्वतः गती घेतली कि उरलेला प्रवास आपोआप होतो. असंच कार्यकर्त्या नेत्यांचे असते. समाजात विशिष्ट उंची गाठेपर्यंत जीवघेणा संघर्ष असतो. पण एकदा अपेक्षित उंचीवर पोहचलात कि आयुष्यात अनेक समस्या ती उंचीच सोडवते.तेव्हा तो कार्यकर्ता नेता संस्था,संघटना पक्षात समाजात मान्यताप्राप्त होतो.

कार्यकर्ता नेताला संस्था,संघटना पक्ष समाजात मान्यताप्राप्त करण्यासाठी तोंडात साखर डोक्यावर बर्फ आणि पायाला भिंगरी लावून घ्यावी लागते. भिंतीवर कॅलेंडर असते त्यातील प्रत्येक महिन्यातील दिवस व तारखेला चौकोनाला लक्षवेधी पेनाने गोल करून दिनांक व वेळेचे नियोजन करून ठेवावे लागते, त्यासाठी त्याची अंमलबजावणी करणारी कमिटी काय करते त्यांचा कायम संपर्क ठेवून माहिती घेऊन चर्चा केली पाहिजे तरच यशस्वी होता येते.आजकाल संस्थापक राष्ट्रीय अध्यक्ष प्रत्येक तालुक्यात निर्माण झाले आहेत, त्यांची संघटना,पक्ष जिल्ह्यातील सर्व तालुख्यात नसली, तरी ते एकखांबी संस्थापक राष्ट्रीय अध्यक्ष असतात. त्यांच्या कार्यालयात कॅलेंडर वर कोणत्याही तारखेला महिन्याला कुठलही चित्र नसते. तरी ते पेपरमध्ये दररोज सरकारच्या विरोधात, तर कधी कोणाच्या विरोधात पत्रकबाजी करीत राहतात. त्यामुळे त्याला प्रसिद्धी मिळते पण संघटना वाढत नाही. त्यांचे अस्तित्व राजकीय उपद्रव मूल्य निर्माण करण्यासाठी सर्व समाजात होत असते.

विचारधारेवर चालणाऱ्या संस्था, संघटना, पक्षाचा कार्यकर्ता, पदाधिकारी या व्यक्तीमत्व घडवणार्‍या माणसांच्या बाबतीत,तारखांचे चौकोन जास्त बोलके असतात. प्रत्येक चौकोनावर वेगळं चित्र निर्माण करण्यासाठी वेगळा विचारपण हवे असतो. समस्या वर अभ्यासपूर्ण उपाय स्वतःजवळ प्रथम असला पाहिजे, सरकारी योजना काय आहेत त्यांची अंमलबजावणी करण्यासाठी शासकीय पातळीवर यंत्रणा कशी काम करते, त्यांची माहिती संघटना पक्षांच्या पदाधिकारी यांना नसेल तर ते प्रशिक्षण देण्याची जबाबदारी नेतृत्वाची असते. नेतृत्व स्वतःला सर्व सर्वश्रेष्ठ समजत असेल तर ते दोन,तीन,चार नंबरचे नेतृत्व तयार होऊ नये यांची दक्षता घेत असते,असे एकखांबी नेतृत्व नेहमीच विचारधारा आणि संघटना,पक्षा पेक्षा स्वतःलाच मोठे समजत असते. ते लोकशाहीला कधीच महत्व देत नाही. जाहीर सभेत त्याला बसायला सिंहासनच पाहिजे.त्यामुळेच दोन नंबरचे नेतृत्व तयार होत नाही,जे असते ते कार्य कर्तृत्व दाखवून झालेलं नसतं तर आशीर्वादाने चमचागिरी करून झालेलं असते.ते पक्षात संघटनेत कोणतेही सत्य मांडण्याचे किंवा चर्चा घडवून आणण्याचे धाडस दाखवू शकत नाही.असे बोलणारे पक्ष संघटनेच्या बाहेर फेकल्या जातात.

त्यामुळेच मग पक्ष संघटनेत प्रामाणिक, इमानदार निर्भीडपणे नेतृत्व कर्तृत्व वक्तृत्व दाखविणाऱ्याला बदनाम करून बाहेर काढला जाते. त्यामुळेच पक्ष संघटना दरवर्षी मजबूत होण्या ऐवजी कमकुवत होत जाते.जुन्यांना काढले जाते नव्यांना जोडल्या जाते. म्हणूनच संघटनेची ताकद ही केवळ सभासदांच्या संख्येवर अवलंबून नसून सभासदांच्या प्रामाणिकपणावर, संघटनेशी एकनिष्ठतेवर आणि शिस्तपालनावर अवलंबून असते.डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी २५/२६ मार्च १९५३ ला दिल्ली येथे सांगितले होते. ते आज पर्यत कोणीच मनावर घेतले नाही, त्यामुळे सामाजीक, शैक्षणिक, सांस्कृतिक, धार्मिक,राजकीय संस्था,पक्ष संघटना एक नां धड भराभर चिंद्या झाल्या आहेत.क्रांतीकारी विचारधारे तोंडात असते आणि आचरणात हुकूमशाही!. यामुळेच पक्ष संघटना वाढत नाही.पक्ष,संघटना एकखांबी नेतृत्व झाल्या आहेत.

✒️लेखक:-सागर रामभाऊ तायडे ९९२०४०३८५९,भांडुप,मुंबई अध्यक्ष सत्यशोधक कामगार संघटना, स्वतंत्र मजदूर युनियन महाराष्ट्र राज्य,