नयना अण्णा कोळपे विहिरीवर पाणी आणण्यासाठी गेली असता विहिरीत पाय घसरून पडून तिचा मृत्यू

28

✒️विजय केदारे(विशेष प्रतिनिधी)

मनमाड(दि.5एप्रिल):-शहरापासून काही अंतरावर असलेले- खादगाव येथील नयना अण्णा कोळपे वय-१७ ही मुलगी विहिरीवर पाणी आणण्यासाठी गेली असता विहिरीत पाय घसरून पडून तिचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.सदर घटनेने सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की,खादगाव येथील अण्णा कोळपे शेतात राहत असून ते दुसऱ्याच्या शेतात कांदे काढण्यासाठी गेले होते.घरी कोणीच नसल्याने दुपारी तीन वाजेच्या सुमारास नयना अण्णा कोळपे ही मुलगी पाणी घेण्यासाठी विहीरीवर गेली असताना तिचा पाय घसरून विहिरीत पडल्याने मृत्यू झाला.

जवळच शेतात तिचा चुलत भाऊ भास्कर हा शेतात पाणी भरत असताना मोटर बंद करण्याच्या अनुषंगाने त्याच विहिरीवर गेला असता त्यास विहिरीच्या बाजूला हंडा व चपला दिसून आल्याने त्याने दिनकर यमगार यांना फोन करून याबाबत माहिती दिली.त्यानंतर श्री.यमगार यांनी तात्काळ मनमाड पोलीस स्टेशनला दूरध्वनीवरून माहिती दिली.पोलिस तातडीने घटनास्थळी आल्यानंतर मृतदेह विहिरीच्या बाहेर काढण्यात आला. याबाबत पोलिसांनी अकस्मात अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे