सत्ताधाऱ्यांकडूनच धनगर समाजाची फसवणूक, भविष्यात शिक्षण व नोकरीतुनही आरक्षण काढून घेतले जाणार – ॲड. प्रकाश आंबेडकर

25

✒️पंढरपूर(पुरोगामी संदेश नेटवर्क)

पंढरपूर(दि.7एप्रिल):- आरक्षणाच्या नावाखाली काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना, भाजप या पक्षांनी धनगर समाजाची केवळ फसवणूक केली आहे. पंढरपूरच्या निवडणुकीत राष्ट्रवादी व भाजप या पक्षांनी धनगर समाजाला उमेदवारी नाकारून प्रस्थापितांना तिकीट दिले आहे. त्यामुळे धनगर समाजाने वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार बिरप्पा मधुकर मोटे यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहून त्यांना निवडून आणावे. बिरप्पा मोटे हे धनगर समाजाचे असून ते निवडून आल्यास धनगरांच्या प्रश्नांना वाचा फोडतील. असे आवाहन वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी केली आहे.

माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या नेतृत्वाखाली धनगर समाजाचा मेळावा पंढरपुरात घेण्यात आला होता. त्या वेळी धनगर समाजाला आरक्षण देण्याचे जाहीर करण्यात आले होते. मात्र आरक्षण न देता धनगर समाजाची फसवणूक करण्यात आली. अशीच फसवणूक काँग्रेस, राष्ट्रवादी व आताचे सत्ताधारी पक्ष करीत आहेत. आरक्षण देतो असे सांगितले. मात्र गेली पाच वर्षे त्याची अंमलबजावणी झालेली नाही. त्यामुळे धनगर समाज आता एकटा पडला आहे. असे वक्तव्य ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी केले. धनगर समाजाला सध्या ओबीसीचे आरक्षण मिळत आहे. मात्र सुप्रीम कोर्टाच्या निर्णयामुळे आता हे आरक्षण काढून घेण्यात आले आहे.

भविष्यात याच सिद्धांतावर शिक्षण तसेच नोकरीचे आरक्षण काढून घेतले जाईल. सत्तेत असलेले काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना तर केंद्रातील बीजेपी सरकार हिंदू धर्माला मानतात. मग धनगर, ओबीसी हा समाज हा हिंदू नाही का? त्यांचे आरक्षण का काढून घेतले जात आहे. त्याचे कारण म्हणजे जुन्या वर्णभेद प्रमाणे हे शूद्र आहेत व त्यांना सत्ताधारी होऊ द्यायचे नाही, त्यामुळे हा सर्व प्रकार चालू असल्याचे प्रकाश आंबेडकर म्हणाले.

धनगर समाजातील काही प्रतिष्ठित मंडळी बीजेपी तसेच राष्ट्रवादीकडे तिकीट मागायला गेले होते. मात्र त्यांनाही तिकीट देण्यात आले नाही. हे तिकीट प्रस्थापितांना देण्यात आले. त्यामुळे अशा फसवणूक करणाऱ्या पक्षा पासून धनगर समाजाने वेळीच सावध व्हावे. असे आवाहन प्रकाश आंबेडकर यांनी केले आहे. पंढरपूर येथील पोटनिवडणुकीत वंचित बहुजन आघाडीचे धनगर समाजाचे उमेदवार वीरप्पा मोटे हे उभे असून त्यांना निवडून द्यावे. अशी विनंती बाळासाहेब आंबेडकर यांनी केली आहे.