जोगिणी व देवदासी प्रथा प्रतिबंधक !

29

[छत्रपती शाहू महाराज स्मृती दिन]

छत्रपती शाहू महाराज हे महाराष्ट्रातील करवीर तथा कोल्हापूर संस्थानचे प्रागतिक अधिपती आणि थोर समाजसुधारक होऊन गेले. ते प्राथमिक शिक्षण, जातिभेद निवारण, अस्पृश्यता निवारण आदी सुधारणांचे पुरस्कर्ते होते. त्यांचा जन्म कोल्हापूर येथे दि.२६ जून १८७४ रोजी कागलच्या जहागीरदार घाटगे घराण्यात जयसिंगराव आणि राधाबाई या दांपत्याच्या पोटी झाला. त्यांचे पूर्वाश्रमीचे नाव यशवंतराव होते. चौथ्या शिवाजींच्या अकाली निधनानंतर ते कोल्हापूरच्या गादीवर दत्तक गेले. राजकोट व धारवाड येथे त्यांचे शिक्षण झाले. सर फ्रेझर व रघुनाथराव सबनीस यांसारखे गुरू त्यांना मिळाले. विद्यार्थिदशेत त्यांनी इंग्रजी, संस्कृत, इतिहास, राज्यशास्त्र इ. विषयांचा अभ्यास केला. त्यांना राज्याधिकार दि.२ एप्रिल १८९४ रोजी प्राप्त झाला. तत्पूर्वी बडोद्याच्या गुणाजीराव खानविलकर यांच्या लक्ष्मीबाई या कन्येबरोबर त्यांचा विवाह झाला. त्यांना राजाराम व शिवाजी ही दोन मुले आणि राधाबाई व आऊबाई या दोन कन्या झाल्या.

राजर्षी शाहू हे शिक्षणसम्राट महात्मा फुलेजींच्या सत्यशोधक विचारसरणीकडे आकृष्ट झाले होते. बहुजन समाज शिकून शहाणा झाल्याशिवाय त्यांचे दारिद्र, अज्ञान व अंधश्रद्धा नष्ट होणार नाहीत, हे जाणून राजर्षींनी विशेषतः प्राथमिक शिक्षणाच्या प्रसारावर भर दिला. त्यानुसार त्यांनी आपल्या संस्थानात सन १९१७मध्ये सक्तीच्या मोफत प्राथमिक शिक्षणाचा कायदा केला. प्रत्येक खेड्यात प्राथमिक शाळा सुरू केली. प्राथमिक शिक्षणावर या संस्थानात होणारा खर्च मोठा होता. खेड्यापाड्यांतील मुलांना उच्चशिक्षणाची सुविधा मिळावी, म्हणून शाहूंनी मराठा, जैन, लिंगायत, मुस्लीम, सुतार, नाभिक, महार, चांभार-ढोर इ. जातिजमातींसाठी वसतिगृहे स्थापन केली. शिवाय नासिक, पुणे, नगर, नागपूर व अन्य ठिकाणी त्यांच्या प्रेरणेने व साहाय्याने अनेक वसतिगृहे सुरू झाली. मागास जातींत शिक्षणाबद्दल फारशी आस्था नसल्याने व सरकारी नोकरी मिळण्याची शक्यता नसल्याने त्यांनी दि.२६ जुलै १९०२ रोजी कोल्हापूर संस्थानातील ५० टक्के शासकीय नोकऱ्या मागास वर्गांसाठी राखीव ठेवल्याचा जाहीरनामा काढला.

हे आरक्षणाचे धोरण अमलात आणणारे ते भारतातील पहिले राज्यकर्ते ठरले. संस्थानातील शाळा, पाणवठे, विहिरी, दवाखाने, कचेऱ्या आदी सार्वजनिक ठिकाणी विटाळ पाळण्यास त्यांनी कायद्याने प्रतिबंध केला. त्यासाठी अनेक वटहुकूमही जारी केले होते. कोळी, फासेपारधी, कोरवी, मदारी यांसारख्या भटक्या व विमुक्त जातींना जवळ करून त्यांना आपले रक्षक म्हणून नेमले. सन १९२० साली जोगिणी व देवदासी प्रथेस प्रतिबंधक कायदा जारी केला. याच सुमारास त्यांची विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकरांशी भेट झाली. या महामानवाच्या मूकनायक या वृत्तपत्रास व पुढे त्यांच्या इंग्लंडमधील उच्चशिक्षणास त्यांनी अर्थसाहाय्य केले. याबरोबरच जातिभेदाशी महाराजांनी अखेरपर्यंत संघर्ष केला. आंतरजातीय विवाह हा जातिभेदावर रामबाण उपाय वाटून त्यांनी पुढाकार घेत आंतरजातीय विवाहास कायदेशीर मान्यता दिली.

तसेच बालविवाहास प्रतिबंध करून नोंदणी विवाहाचा कायदा जारी केला. घटस्फोटास व विधवा पुनर्विवाहास कायदेशीर मान्यता दिली. कुटुंबात होणाऱ्या शारीरिक व मानसिक छळांपासून स्त्रीला संरक्षण देणारा कायदाही त्यांनी मंजूर केला. मागास वर्गांतील मुलींना व स्त्रियांना मोफत शिक्षणाची सुविधा निर्माण केली.सामाजिक सुधारणांबरोबरच त्यांनी शेतीस व उद्योगधंद्यांस प्रोत्साहन दिले. अनेक कृषी व औद्योगिक प्रदर्शने भरविली. पन्हाळ्यावर चहा, कॉफी, रबर यांच्या लागवडींचे प्रयोग केले.

त्यामुळे कोल्हापूर ही गुळाची बाजारपेठ म्हणून देशात प्रसिद्ध पावली. ‘शाहू मिल’ची स्थापना करून आधुनिक वस्त्रोद्योगास त्यांनी चालना दिली. छ.शाहूंनी राधानगरीत सर्वांत मोठे धरण बांधून आपले संस्थान सुजलाम-सुफलाम करून टाकले. छ.शाहूंनी संगीत, नाट्य, चित्रकला, मल्लविद्या आदी कलांना राजाश्रय देऊन महाराष्ट्रात कलेच्या क्षेत्रात स्पृहणीय कामगिरी केली. अल्दियाखाँ, हैदरबक्षखाँ, भूर्जीखाँ, सुरश्री केसरबाई, गानचंद्रिका अंजनीबाई मालपेकर अशा अनेक गायक-गायिकांनी त्यांच्या आश्रयाने अखिल भारतीय कीर्ती संपादन केली. त्यांनी अनेक नाटक कंपन्यांना व गुणी कलावंतांना आश्रय दिला. बालगंधर्व व संगीतसूर्य केशवराव भोसले हे थोर कलावंत त्यांनीच महाराष्ट्राला दिले. संगीत व नाट्यकलेच्या जोपासनेसाठी त्यांनी कोल्हापुरात भव्य पॅलेस थिएटर – केशवराव भोसले नाट्यगृह बांधले. त्याच्या शेजारीच खुल्या नाट्यगृहाचीही सोय केली.

राजर्षींच्या दरबारात आबालाल रहिमानसारखा महान चित्रकार कलावंत होऊन गेला. बाबूराव पेंटर, दत्तोबा दळवी अशा प्रभृती चित्रकारांना त्यांचे प्रोत्साहन मिळाले. मल्लविद्येच्या प्रांतात त्यांनी संस्थानासह सर्व देशांतील मल्लांना उदार आश्रय दिला. रोमच्या आखाड्याच्या धर्तीवर कोल्हापुरात कुस्तीचे मैदान बांधले. त्यांच्या कारकीर्दीत कोल्हापूर ही ‘मल्लविद्येची पंढरी’ बनली. खुद्द शाहू महाराज हे मल्लांचे मल्ल म्हणून प्रसिद्ध होते. शिकार तर त्यांचा आवडीचा छंद होता. पट्टीचा शिकारी म्हणून त्यांचा लौकिक होता.छ.शाहूंच्या सामाजिक कार्याचा गौरव म्हणून कानपूर येथे कुर्मी क्षत्रिय सभेने त्यांना सन१९१९मध्ये ‘राजर्षी’ पदवी बहाल केली. त्यांच्या कार्यामुळे दलित-पतितांचा उद्धारक, रयतेचा राजा म्हणून त्यांची प्रतिमा जनसामान्यात निर्माण झाली. अखेरच्या दिवसांत द्वितीय चिरंजीव शिवाजीच्या अपघाती निधनाने ते खचलेले व मधुमेहाने ग्रासले होते. अखेर मुंबई येथे वयाच्या अवघ्या अठ्ठेचाळीसाव्या वर्षी दि.६ मे १९२२ रोजी त्यांचे हृदय विकाराने निधन झाले.

!! पुरोगामी संदेश परिवारातर्फे लाडक्या लोकराजांना व त्यांच्या कार्यकर्तृत्वांना विनम्र अभिवादन !!

✒️संकलन व शब्दांकन:-श्री कृष्णकुमार गोविंदा निकोडे गुरुजी.(साहित्यिक व इतिहासाचे गाढे अभ्यासक.)
मु. रामनगर, गडचिरोली (७७७५०४१०८६).