बुद्ध तत्त्वज्ञान समजून घेण्याची गरज : भदंत एस. संबोधी

32

✒️कोल्हापूर(पुरोगामी संदेश नेटवर्क)

कोल्हापूर(दि.27मे):-तथागत सिद्धार्थ गौतम बुद्ध यांनी भारतामध्ये खऱ्या अर्थाने मानवमुक्तीचे क्रांतिकारी तत्वज्ञान मांडले असून त्यांच्या विचार व कृतीने भारत देशाने वाटचाल केली तरच भारत महासत्ता बनू शकतो असे प्रतिपादन धम्म चळवळींचे अभ्यासक भदंत एस. संबोधी यांनी केले. कोरोनामुळे काही मोजक्याच लोकांना घेऊन धम्म भवन चॅरिटेबल ट्रस्ट आणि निर्मिती प्रकाशने बुद्ध पौर्णिमेनिमित्त महामानव तथागत गौतम बुद्धांच्या विचाराचा जागर करण्यासाठी ऑनलाइन कार्यक्रम आयोजित केला होता.

त्याप्रसंगी ते बोलत होते. पुढे ते म्हणाले तथागत सिद्धार्थ गौतम बुद्ध हे भारतातील पहिले असे महामानव आहेत की ज्यांनी स्वतः कृतीतून समाज बदलाची सुरुवात केलेली दिसून येते. त्यांनी जातीव्यवस्था व वर्णव्यवस्था याला कडाडून विरोध केल्याचा ही आपणाला दिसून येतो. आज जगभर त्यांचा विचार स्वीकारला गेला असून भारताने ही बुद्धांच्या विचारांचे अनुकरण करणे गरजेचे आहे. तरच भारत महासत्ता बनू शकतो.

सदर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी निर्मिती प्रकाशनचे अनिल म्हमाने उपस्थित होते. अनिल म्हमाने म्हणाले, आज जगाला युद्धाची नव्हे तर बुध्दाची गरज असून भारत बौद्धमय करण्यासाठी तमाम भारतीयांनी बुद्ध तत्वज्ञान व बुद्धांचे विचार समजून घेणे गरजेचे आहे. बुद्धाने आपल्या कृतीतून लोकशाहीची मांडणी केल्याचे दिसून येते. अहिंसेच्या मार्गाने जग बदलता येऊ शकते ही महत्वपूर्ण वैचारिक मांडणी इत देशीय तथागत बुद्धांनी केल्याचे दिसून येते. तथागत बुद्धांनी देशाला प्रज्ञा, शील आणि करणेचा संदेश दिला असून त्यांच्या विचार मार्गाने चालण्याची आज गरज आहे.

यावेळी तथागत गौतम बुद्ध यांच्या मूर्तीच्या अवतीभोवती पुस्तके व फुलांचा वापर करून बुद्धमूर्ती सजविण्यात आली होती. तथागत बुद्धांच्या शेजारी महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर लिखित बुद्ध आणि त्यांचा धम्म हा ग्रंथही ठेवण्यात आला होता. त्यामुळे सदर कार्यक्रमास वेगळे महत्त्व तयार झाले होते. कोरोना काळात घरातच राहून साध्या पद्धतीने विविध कार्यक्रम साजरे कसे करावेत याचा एक नमुना यानिमित्ताने दिसून आला.
यावेळी प्रा. शोभत चाळके, पंकज खोत, सिध्दार्थ कांबळे, गंगाधर म्हमाने उपस्थित होते.