संन्याशाच्या मुलांमधील ज्येष्ठ व श्रेष्ठही !

89

(संत निवृत्तिनाथ पुण्यस्मरण सप्ताह)

संतश्रेष्ठ निवृत्तिनाथ हे संत ज्ञानेश्वर माऊलींचे मोठे बंधू होत. नाथ संप्रदायातील गहिनीनाथांनी निवृत्तिनाथांना दीक्षा दिली. संतशिरोमणी निवृत्तिनाथांचा जन्म दि.२९ जानेवारी १२७४ रोजी झाला. त्यांची आई रुक्मिणी व वडील विठ्ठलपंत कुलकर्णी हे होत. ते संत ज्ञानेश्वर, संत सोपानदेव व संत मुक्ताई व संत निवृत्तिनाथ या चार भावंडांमध्ये थोरले होते. ते संतश्रेष्ठ ज्ञानेश्वरादी तीनही भावंडांचे सद्गुरू होते. त्यांनी ज्ञानेश्वरांना संस्कृतमध्ये असणारी भगवद्गीता सामान्य लोकांना वाचून समजेल अशा बाळबोध शब्दांत लिहिण्याचे आदेश दिले. त्याप्रमाणे ज्ञानेश्वर माऊलींनी भावार्थदीपिका अर्थात प्रसिद्ध ज्ञानेश्वरी ग्रंथ लिहून काढला.

ग​हिनीनाथ हे ​संतश्रेष्ठ निवृत्तिनाथांचे गुरू होते. “निवृत्तिचे ध्येय कृष्ण हा​चि होय। ग​यिनीनाथे सोय दाख​विली॥” असे संत निवृत्तिनाथ महाराजांनीच आपल्या एका अभंगात कोरून ठे​वले आहे. सुमारे तीनशे चारशे अभंग व एक ह​रिपाठ एवढ्याच रचना ​निश्चितपणे नाथांच्या आहेत असे म्हणता येईल. त्यात योगपर, अद्वैतपर आ​णि कृष्णभ​क्तिपर असे अभंग आहेत. रसवत्तेच्या दृष्टीने ते काहीसे उणे वाटतात; तथा​पि त्यांची ख्याती आ​णि महत्त्व कवी म्हणून नाही तर संतश्रेष्ठ ज्ञानेश्वरांचे मार्गदर्शक ‌म्हणून आहे. त्यांनी आपले संपूर्ण अध्यात्मधन संत ज्ञानेश्वरांना देऊन त्यांना यश ​दिले व आपण त्या यशापासूनही ​निवृत्त झाले, असे नाथांबद्दल म्हटले जाते. संत ज्ञानेश्वरांनी त्यांच्याबद्दलचा आदर अनेक ठिकाणी व्यक्त केला आहे. त्यांनी संतंमंडळींसह केलेल्या अनेक तीर्थांच्या यात्रेतही सद्गुरू निवृत्तिनाथ ‌‌‌त्यांच्या सोबत होते. निवृत्तिदेवी, निवृ​त्तिसार आ​णि उत्तरगीताटीका असे तीन ग्रंथही नाथांनी ​लिहिल्याचे म्हटले जाते.

तथापि ते उपलब्ध नाहीत. रा.म.आठवले यांनी निवृत्तेश्वरी असा एक ग्रंथ संबोधिला आहे. ज्ञानेश्वरीप्रमाणेच हेही गीतेवरील एक भाष्य आहे. तथापि हा ग्रंथ संत निवृत्तिनाथांचाच आहे, असे अद्याप सिद्ध झालेले नाही. धुळ्याच्या श्रीसमर्थ वाग्देवता मंदिरात ‘सटीक भगवद्‌गीता’ आणि ‘समाधिबोध’ अशी दोन हस्तलिखिते नाथांची होत म्हणून जतन करून ठेवली आहेत.
संतशिरोमणी निवृत्तीनाथ महाराज हे संत ज्ञानेश्वर यांचे वडीलबंधू आणि सद्गुरु होते. संसारात मन रमेना म्हणून निवृत्तीनाथांचे वडील विठ्ठलपंत एके दिवशी घरातून बाहेर पडले आणि त्यांनी थेट काशीचा मार्ग धरला. त्या ठिकाणी रामानंद नावाचे सदगुरू रहात होते. विठ्ठलपंतांनी त्यांच्याकडून संन्यासदीक्षा घेतली. त्यांच्यापाशी अध्ययन आणि त्यांची सेवा करत ते तेथे राहू लागले. पुढे गुरूंच्या आज्ञेनुसार विठ्ठलपंत आळंदीस आले आणि त्यांनी परत संसारास प्रारंभ केला. नंतर विठ्ठलपंतांना चार मुले झाली. पहिले निवृत्तीनाथ, दुसरे ज्ञानेश्वर, तिसरे सोपानदेव आणि चौथी मुक्ताबाई. त्यांनी आपल्या मुलांना त्या काळच्या रीतीप्रमाणे सर्व काही शिकवले.

त्यावेळेस विठ्ठलपंत हे पत्नी व मुलांसहित त्र्यंबकेश्वराच्या मागील डोंगरावर गेले. त्या डोंगरावर दाट अरण्य होते. डोंगरात हिंडता-हिंडता एक वाघ धावत आला. त्याला पाहून सर्वांची घाबरगुंडी उडाली. विठ्ठलपंत बायकोमुलांसह पळाले. ते अरण्यातून बाहेर पडले, तेव्हा त्यांचा जीव भांड्यात पडला; पण निवृत्तीनाथ कुठे दिसेनात! पुष्कळ शोध करूनही निवृत्तीनाथ सापडले नाहीत. असे सात दिवस गेले आणि आठव्या दिवशी निवृत्तीनाथ दत्त म्हणून पुढे उभे राहिले. सर्वांना फार आनंद झाला. ते अधिक तेजस्वी दिसत होते. विठ्ठलपंतांनी विचारले, ”अरे इतके दिवस तू होतास कुठे?” संतशिरोमणी निवृत्तीनाथांनी बोलले, “बाबा, वाघाला भिऊन पळतांना मी एका गुहेत शिरलो. त्या ठिकाणी एक स्वामी बसले होते. त्या अंधाऱ्या गुहेतही त्यांची कांती मला स्पष्ट दिसत होती. त्यांचे नाव गहिनीनाथ. त्यांनी मला योग शिकवला आणि ‘आता जगामध्ये गांजलेले जीव आहेत, त्यांना तू सुखी कर’ असे सांगितले.” नंतर मुलांची मुंजीची वेळ आली. मुंज करण्यासाठी त्यांना घेऊन विठ्ठलपंत आळंदीला आले; पण आळंदीच्या निष्ठूर पंचायतीने त्यांना सांगितले, ”तुम्ही संन्यासातून परत गृहस्थाश्रम स्वीकारला आहे.

तुम्हाला देहान्त प्रायश्चित्ताविना दुसरे प्रायश्चित्त नाही. ते तुम्ही घ्याल, तरच मुलांच्या मुंजी होतील.” हे उत्तर ऐकून विठ्ठलपंत घरी गेले. मुले गाढ झोपेत आहेत, हे पाहून विठ्ठलपंत आणि रुक्मिणीबाई यांनी आपल्या घराचा निरोप घेतला. ते थेट प्रयागला गेले आणि त्यांनी गंगेमध्ये जलसमाधी घेतली. दुसऱ्या दिवशी सकाळी मुले उठल्यानंतर त्यांना आपले आईवडील घर सोडून गेल्याचे कळले. तेव्हा त्यांच्या डोक्यावरचे छत्रच नाहीसे झाले. सर्व भार संतश्रेष्ठ निवृत्तीनाथांवर पडला होता. त्यांनी आपली भावंडे ज्ञानदेव, सोपानदेव आणि मुक्ताबाई यांचा माता-पित्याच्या वात्सल्याने सांभाळ केला.आधी संत ज्ञानदेव, संत सोपानदेव व संत मुक्ताई या त्यांच्या भावंडांनी समाधी घेतली. तद्नंतर सद्गुरू निवृत्तीनाथ महाराजांनी शके १२१८ मधील ज्येष्ठ कृष्ण द्वादशी या दिवशी दि.१७ जून १२९७ रोजी त्र्यंबकेश्‍वर येथे नश्वर देह त्यागून संजीवन समाधी घेतली.

!! पुरोगामी संदेशपावन स्मृती दिनी त्यांना विनम्र अभिवादन !!

✒️संकलक:-श्रीकृष्णदास (बापू) निरंकारीc/o. प. पू. गुरूदेव हरदेव कृपानिवास मु. रामनगर वॉर्ड नं.२०, गडचिरोली.जि. गडचिरोली, मोबा. ७७७५०४१०८६.