केसरी वाडा नक्की कुणाचा ?

30

ऑगस्ट महिन्याची सुरुवातच होते ती दोन टोकांचे मतप्रवाह असणा-या दोन व्यक्तींच्या जन्म आणि मृत्यूच्या दिनांनी.या दोघांच्या जन्म आणि मृत्युचे महिने पाहिले तर तो एक विशेष योगायोगच म्हणावे लागेल. त्यापैकी एकाचे अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतही अफाट कर्तृत्व असूनही इथल्या विषमतेवर आधारीत वर्ण,जातीव्यवस्थेकडून जाणीवपूर्वक त्यांचे कर्तृत्व दुर्लक्षित ठेवण्याचा प्रयत्न केला गेला.त्याच्या मृत्युचा महिना हा दुस-याचा जन्म माह आहे आणि दुसऱ्याचे कार्य म्हणजे वैयक्तिक मोजकेच आणि तेही आपल्या विशिष्ट समाजासाठी केलेली धडपड असूनही आभाळाएवढे कर्तृत्व म्हणून लोकांच्या मनावर अगदी बाल वयापासूनच बिंबवले गेले आहे.त्याच्या मृत्युचा महिना हा पहिल्याचा जन्म माह आहे.

एवढ्या माहिती वरुन एव्हाना चाणाक्ष वाचकांच्या या दोन्ही व्यक्ती कोण याचा उलगडा झालेला असेल.असो !
२३ जुलै हा बाळ गंगाधर टिळक यांचा जन्म दिवस. कोन होते बाळ गं.टिळक ? मी शेंगा खाल्ल्या नाहीत म्हणून मी टरफले उचलणार नाही एवढीच माहिती त्यांचा करारीपणा म्हणून बालपणापासून ठासून सांगितली जाते. परंतु पुढे जाऊन त्यांच्या आयुष्यातील कोणतेच महत्वाचे कार्य कुणालाच सांगता येत नाही.कारण जे काही सांगितले जाते ते त्यांचे स्वतःचे असे नाहीच .त्याला अनेक घटना आणि प्रसंग कारणीभूत ठरतात. त्यांच्या एकूणच जीवनप्रवासावर नजर टाकली असता त्यांना राष्ट्रीय स्तरावरील नेते म्हणणे ही थोडी अतिशयोक्ती ठरेल. फारतर ते समाजाचे हित संवर्धन पाहणारे ब्राह्मण पुढारी होते असे म्हणणे योग्य ठरेल.

मात्र लेखणीच्या जोरावर ज्यांना राष्ट्रपिता महात्मा जोतिबा तात्या फुले ‘कलम कसाई’ म्हणत असत त्यांनी अनेक महत्त्वाच्या प्रसंग आणि घटना घडामोडीशी त्यांच्याशी संबंध जोडून त्यांना एक वेगळी ओळख देण्याचा प्रयत्न केला गेला आहे.काँग्रेसची स्थापना डिसेंबर १८८५ मध्ये मुंबई येथे झाली.त्याआधी एकोणतीस वर्षांपूर्वी म्हणजे जुलै १८५६ ला त्यांचा जन्म झाला असला तरीही काँग्रेसच्या स्थापनेत टिळकांचा मुळीच सहभाग नव्हता. इथे एका गोष्टीचा आवर्जून उल्लेख करावा लागेल आणि ती म्हणजे ते ज्या समुहातून येतात त्याचे एक प्रमुख वैशिष्ट्य हे आहे की,एखादा बहुजन स्वकर्तृत्वाने पुढे आला असेल त्याला नावलौकिक प्राप्त झाले असेल तर कुठून तरी सहज संबंध आला असेल तर तो जोडून त्या बहुजनांच्या यशाला आपण कसे कारण आहोत याचा मोठा गवगवा करायचा.कित्येक वेळा काहीही संदर्भ नसतानाही जबरदस्तीने मोठेपणा घ्यायचा. उदा.रामदासांना महापराक्रमी शिवरायांचे गुरु म्हणून पुढे करत त्यांचे कर्तृत्व खुजे करण्याचा प्रयत्न करायचा.

एखादी संस्था संघटना नावारुपाला आली की त्यात घुसखोरी करून ती बळकावयाची.म्हणजे कसे काय होईना कर्तृत्व आपल्याबरोबरच आपल्या जात समुहावर नोंदवायचे. खोटच बोलायचं पण रेटून बोलायचं.त्याला परिणाम कारक हत्यार म्हणजे लेखणी.म्हणूनच तात्यांनी त्यांना ‘कलम कसाई’ म्हणले असावे.याच नीतीने काँग्रेसची वाढती लोकप्रियता व जनाधार पाहून कानोसा घेऊन १८९० मध्ये ते काँग्रेसमध्ये प्रवेश करुन काँग्रेसवर कब्जा करण्याचा त्यांनी प्रयत्न केला. परंतु आधीच अनेक दिग्गज त्यात असल्यामुळे त्यांना यश आले नाही.पुढे अनेक वेळा प्रयत्न करुनही ते कधीच काँग्रेसचे अध्यक्ष होऊ शकले नाही की, एखादे महत्त्वाचे पदही त्यांना दिले गेले नाही.
होमरुल चळवळ डॉ. ऍनी बेझंट व बॅरिस्टर जोसेफ बाप्तिष्टा यांनी सुरू केली.स्वदेशी चळवळ अरविंद घोष, बिपिनचंद्र पाल, लाला लजपतराय, चिदंबरम पिल्ले यांनी सुरू केली. सार्वजनिक गणेशोत्सव भाऊसाहेब रंगारी यांनी सुरू केला.

काही वर्षानंतर त्यात खंड पडला. पुढे महात्मा जोतिबा फुले यांनी सार्वजनिक शिवजयंती सुरू केली.त्याचा परिणाम बहुजनांच्या जागृती आणि ऐक्यात होतोय हे लक्षात येताच त्याला काउंटर करण्यासाठी खंड पडलेला आणि पेठेतील मर्यादित असलेला गणपती शहरभर नेऊन गणेशोत्सवाला सार्वजनिक स्वरूप प्राप्त करून दिले.शाळेतील शेंगा टरफला नंतर आणखी एक किस्सा रंगविला जातो आणि तो म्हणजे “स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे व तो मी मिळवणारच” ही घोषणा वास्तविक बॅरिस्टर जोसेफ बाप्तिष्टा यांनी केली होती ही वस्तुस्थिती असतानाही त्यांचे श्रेय मात्र कलम कसायांनी बाळ गंगाधर यांना दिले आहे.इंग्रजी राजवटीच्या दुष्परिणामांवर Drain of Wealth हा अभ्यासपुर्ण ग्रंथ लिहिणारे व दस्तुरखुद्द इंग्लंडच्या पार्लमेंटमध्ये इंग्रजांच्या राजवटीमुळे भारतात आलेल्या बेरोजगारी, दारिद्र्य आणि विपन्नावस्थेवर अभ्यासपूर्ण सडेतोड व ब्रिटीश सरकारची वाभाडे काढणारी भाषणे करुन इंग्रज सत्ताधा-यांना त्यांच्याच पार्लमेंटमध्ये धारेवर धरणारे दादाभाई नौरोजी हे भारतीय असंतोषाचे जनक असताना ती पावतीही टिळकांच्या नावाने फाडली जाते.अशा प्रकारे अनेक प्रसंगांतून टिळकांना कागदोपत्री मोठे बनविले गेले आहे.

टिळक हे बहुजनांना कायमचे गुलामीत रगडून ठेवू पाहणा-या सनातनी ब्राह्मणांचे सर्वश्रेष्ठ नेते होते.म्हणून तर ब्राह्मण वगळता एकही ब्राह्मणेतर बहुजन नेता त्यांचा सहकारी अथवा अनुयायी नव्हता.शेतक-यांची मुले शिकली तर शेती कोण करणार? कारागिरांची मुले शिकली तर आवश्यक वस्तु कोण बनवणार? कष्टक-यांची मुले शिकली तर श्रमांची कामे कोण करणार? सेवा कोण करणार? असले प्रश्न व भिती टिळकांना पडली होती म्हणून कुणब्यांना विधानमंडळात जाऊन नांगर चालवायचा आहे काय? तेल्यांना विधानमंडळात जाऊन घाणा चालवायचा आहे काय? शिंप्याना विधानमंडळात जाऊन कपडे शिवायचे आहेत काय? लोहाराला भाता, विणकराला हातमाग चालवायचा आहे का? असले प्रश्न टिळकांनी त्यावेळी जाहिरपणे विचारले होते.तरिही टिळकांना तेल्या-ता़ंबोळ्यांचे पुढारी होते ही भलीमोठी लोणकढी थाप मारली जाते.ते कधीच तेल्या-तांबोळ्यांचे पुढारी नव्हते. उलट त्यांनी तेल्या-तांबोळ्यांच्या म्हणजेच मागास लोकांच्या न्याय्य हक्कांना आणि अधिकारांनासतत कर्मठ विरोध केला होता.टिळक हे पक्के व उघड वर्णाश्रमधर्मवादी होते व मनुस्मृतीचे खंदे समर्थक होते. त्यांनी ब्राह्मणेतरांच्या आणि स्त्रियांच्या धार्मिक, शैक्षणिक आणि राजकीय हक्कांना व अधिकारांना शेवटपर्यंत विरोध केला.

शाळा शिकल्यावर मागासवर्गीयांची मुले बिघडतील, शाळा शिकल्यावर मुली चारित्र्यहिन बनतील, कौटुंबिक पावित्र्यभंग होईल, धर्म व संस्कृती भ्रष्ट होईल, अशी त्यांची विचारसरणी होती.त्यांचे तथाकथित “राष्ट्रीय” शिक्षण म्हणजे हिंदुत्ववादी तालिबामनी शिक्षण होते. सामाजिक सुधारणा, जमीन सुधारणा आणि शैक्षणिक सुधारणांना त्यांनी सातत्याने कर्मठ विरोध केला. सरकारच्या सक्तिच्या आणि मोफत प्राथमिक शिक्षणाला त्यांचा तीव्र विरोध होता. कारण त्यामुळे अडाणी मागासवर्गीयाची मुले शिकली असती.ब्राह्मणेतरांच्या विशेषतः मागास जातींच्या शिक्षणाला, स्त्रियांच्या शिक्षणाला, नापिकीमुळे शेतक-यांना सरकारी मदत करण्याच्या, शेती सुधारणा करण्याच्या व शेतीसाठी कृषी बँक स्थापन करण्याच्या सरकारच्या प्रयत्नांना आणि मुंबईतील कामगारांच्या न्याय्य व वाजवी मागण्यांना जन्मसिद्ध चित्पावन “खोत” असलेल्या टिळकांनी सतत प्रखर विरोध केला होता.त्यांनी आयुष्यभर खोत, सावकार,भांडवलदार व ब्राह्मण जातीच्या हितसबंधाच्या रक्षणासाठीच काम केले असल्यामुळे त्यांच्या समाजाला त्यांच्याविषयी आदर असेल तर इतरांना दुःख वाटायचे कारण नाही.

जसे मोहनदास गांधी यांनी आपल्या राजकीय जीवनात अनेक वेळा उपोषणं केली पण स्वातंत्र्यासाठी नव्हे तर ज्या ज्या वेळी इंग्रजांनी समानतेच्या मुद्द्यावरून दलित आणि मुसलमानांना सवलती देण्याचे ठरविले त्याविरोधात ते उपोषण करत अगदी तसेच टिळकांनांही तीन वेळा तुरुंगवासाच्या शिक्षा झालेल्या आहेत. तथापि, त्या स्वातंत्र्य आंदोलनाचे नेतृत्व केल्यामुळे अथवा स्वातंत्र्य चळवळीत भाग घेतल्यामुळे झालेल्या नव्हत्या कारण त्यांची स्वराज्य/होमरुल/स्वातंत्र्याची व्याख्या व संकल्पना ही ब्रिटिश सत्तेत ब्राह्मणांना भागीदारी मिळावी एवढ्या पुरतीच मर्यादित होती.त्यांना झालेल्या तीन शिक्षांपैकी एक बर्वे नावाच्या कोल्हापूरच्या दिवाणाची अब्रूनुकसानी केल्याप्रकरणी, दुसरी शिक्षा ताईमहाराज नावाच्या तरुण विधवेची फसवणूक व बलात्कार प्रकरणी आणि तिसरी शिक्षा पुण्यातील प्लेगच्या साथीत ब्राह्मण जातीच्या व खोट्या धार्मिक भावना भडकावण्यासाठी व चिथावणी देण्यासाठी भडक बातम्या आणि संकुचित व खोट्या सनातनी ब्राह्मणी जात श्रेष्ठत्वाच्या व वैदिक धार्मिक मुजोरीतून लिहीलेल्या “सरकारचे डोके ठिकाणावर आहे काय?” अशा प्रकारच्या अग्रलेख लिहिल्याप्रकरणी झाल्या आहेत. त्यात कुठेही व कसलेही देशप्रेम नाही.

महात्मा फुले,गोपाळ गणेश आगरकर,संतश्रेष्ठ गाडगेबाबा या समाजसुधारकांना आणि गोपाळ कृष्ण गोखले व महादेव गोविंद रानडे या उदारमतवादी काँग्रेस नेत्यांना टिळकांनी सतत विरोधच केला.मात्र त्यांच्यासमोर येण्याचे त्यांनी कधीच धाडस केले नाही.गांधीजींची तर त्यांनी खिल्लीच उडविली होती.योगायोगाने संतश्रेष्ठ गाडगेबाबांची आणि टिळकांची एका कार्यक्रमात भेट झाली.भेट म्हणण्यापेक्षा त्या सभेत एका कोपऱ्यात उभे असलेल्या बाबांवर टिळकांची नजर पडली. बाबा ऐन वेळी काय बोलतील याची मनात भीती असूनही लोक लाजेस्तव त्यांनी बाबांना पुढे येऊन मार्गदर्शन करण्याची विनंती केली. बाबां सरळ एका वाक्यात उत्तर देत म्हणाले,”तुम्ही बुद्धीवंत आम्ही सामान्य माणसं.आम्ही कसे आपल्याला मार्गदर्शन करणार ?फक्त एक विनंती करतो की,पहा जमत असेल तर आम्हालाबी तुमच्यासारखे ‘बामन’ करा” हे ऐकून सभा एकदम स्तब्ध झाली. बाबांनी टिळकांची तर बोलतीच बंद केली.टिळकांनी सन १९१६ मध्ये बॅरिस्टर मोहंमद अली जिना यांच्याबरोबर लखनौ करार करुन मुस्लिमांना त्यांच्या लोकसंख्येच्या प्रमाणापेक्षा कितीही अधिक स्वतंत्र मतदारसंघ देऊन पाकिस्तानच्या निर्मितीची बीजे रोवली. मात्र याच बीजाचे रोपटे होत असताना टिळक हयात नव्हते पण मोहनदास करमचंद गांधी यांना त्यासाठी गोळ्या खाव्या लागल्या हा ताजा इतिहास आहे. तसे पाहिले तर टिळक हे भारतीय राजकिय भ्रष्टाचाराचे जनक असे म्हणावे लागेल.कारण छत्रपती शिवरायांच्या स्मारकासाठी जमवलेल्या सार्वजनिक फंडाचा त्यांनी अपहार केला अशी चर्चा त्यावेळी सर्वत्र झाली होती.

महाराजा सयाजीराव गायकवाड यांनी दिग्गजांच्या बैठकीसाठी आणि सार्वजनिक कामासाठी उपयोगात आणता यावा म्हणून आपला पुण्यातील “गायकवाड वाडा”मोठ्या उदार मनाने दिला होता.तो मोठ्या शिताफीने टिळकांनी कायमचा बळकावला.आज पुण्यात ज्याला ‘केसरी वाडा’ म्हणतात तो टिळकांचा नव्हे तर बडोद्याचे राजे सयाजीराव गायकवाड यांचा “गायकवाड वाडा”आहे.

✒️विठ्ठलराव वठारे(अध्यक्ष,भारतीय जन लेखक संघ,महाराष्ट्र)मो:-8087535296