आझाद हिंद सेनेच्या तडफदार सेनापती !

27

[कॅप्टन लक्ष्मी सहगल स्मृती दिन]

लक्ष्मी एस.स्वामीनाथन ऊर्फ लक्ष्मी सेहगल या पेशाने डॉक्टर होत्या. सन १९४३ साली त्यांनी सुभाषचंद्र बोस यांच्या आझाद हिंद सेनेत राणी लक्ष्मीबाई रेजिमेंटच्या कर्नल म्हणून जबाबदारी सांभाळली. लक्ष्मी सहगल या कॅप्टन लक्ष्मी या नावाने ओळखल्या जातात. त्यांच्या वैद्यकीय व सामाजिक क्षेत्रातील भरीव कामगिरीबद्दल भारत सरकारने इ.स.१९९८मधे पद्मविभूषण पुरस्काराने त्यांना सन्मानित केले होते.
मद्रास उच्च न्यायालयामध्ये फौजदारी कायदा करणारे वकील एस.स्वामिनाथन हे लक्ष्मी सहगल यांचे वडील होत. कॅप्टन लक्ष्मी यांचा जन्म दि.२४ ऑक्टोबर १९१४ रोजी झाला. त्यांनी १९३८साली मद्रास मेडिकल कॉलेजमधून एमबीबीएसची पदवी घेतली. एक वर्षानंतर त्यांना स्त्रीरोगतज्ज्ञ आणि प्रसूतिशास्त्रात पदविका मिळाली. चेन्नई येथे असलेल्या कस्तुरबा गांधी हॉस्पिटलमध्ये त्यांनी डॉक्टर म्हणून काम केले.

कॅप्टन लक्ष्मी या आझाद हिंद सेनेच्याच्या झाशी राणी पथकाच्या प्रमुख कॅप्टन होत्या. सन १९४३च्या ऑक्टोबरमध्ये त्यांना सुभाषचंद्र बोस यांच्या आझाद हिंद सेनेच्या महिला पथकाचे प्रमुख पद देण्यात आले. या पथकात त्या वेळी १८५ स्त्री सैनिक होत्या. हा आकडा नंतर २ हजारवर पोचला. पिस्तूल, बंदूक, मशीनगन्स यासारखी शस्त्रे वापरण्याचे शिक्षण या स्त्रियांना दिले जाई. प्रारंभी या स्त्रियांना शुश्रूषा पथकात काम करण्याची संधी दिली जात असे. पण नंतर कॅप्टन लक्ष्मी यांच्या विनंतीवरून सुभाष बाबू यांनी महिलांच्या दोन पथकांना आघाडीवर जाण्यास संधी दिली. हिंदुस्थान आणि ब्रह्मदेश यांच्यात आघाडीवर झालेल्या युद्धात या स्त्रियांनी विजय मिळविला. नंतर आझाद हिंद सेना माघार घेत असता त्यांच्या फौजेने निकराचा लढा दिला आणि सुभाषबाबू यांना निसटून जाण्याची संधी दिली. मगच त्या ब्रिटिशांच्या स्वाधीन झाल्या. युद्धाच्या अखेरीला त्या जखमी सैनिकांची सेवा करीत होत्या. त्यामुळे त्यांच्यावर खटला न भरता त्यांना सोडून देण्यात आले.

कॅप्टन लक्ष्मी सहगल यांचा त्यानंतर बांगला देशात वैद्यकीय सुविधा आणि बचाव कार्यातही सहभाग राहिला होता. इ.स.१९४७च्या मार्चमध्ये लाहोरच्या प्रेम कुमार यांच्याशी त्यांनी लग्न केले. विवाह झाल्यानंतर ते कानपूर येथे स्थायिक झाले. तिथे त्यांनी आपली वैद्यकीय प्रॅॅक्टिस चालू ठेवली आणि भारताच्या फाळणीनंतर मोठ्या संख्येने आलेल्या शरणार्थींना मदत केली. सुभाषिनी अली व अनिसा पुरी या त्यांच्या दोन मुली होत. त्यांनी सन १९७१ मध्ये कम्युनिस्ट पक्षात प्रवेश केला. त्या भारतीय राज्यसभेच्या सदस्याही होत्या. आझाद हिंद सेनेत काम करण्याबरोबरच वैद्यकीय आणि सामाजिक क्षेत्रात त्यांनी भरीव कामगिरी केली.

हृदय विकाराचा तीव्र झटका आल्याने कॅप्टन लक्ष्मी यांना दि.१९ जुलै २०१२ रोजी कानपूर येथील मेडिकल सेंटर रुग्णालयात दाखल करण्यात आले. प्रकृती अधिक खालावल्याने त्यांना कृत्रिम श्वासोच्छवासावर ठेवण्यात आले. परंतु त्याचा काही एक लाभ झाला नाही. दि.२३ जुलै २०१२ला सकाळी त्यांची प्राणज्योत मालवली.

!! स्मृतीदिनी त्यांना व त्यांच्या जिगरबाज कामगिरीला मानाचा लवून मुजरा !!

✒️संकलक व शब्दयोजक -श्री एन. कृष्णकुमार जी.मु. पोटेगावरोड, पॉवरस्टेशनच्या मागे, गडचिरोली.पो. ता. जि. गडचिरोली. व्हा. नं. ७४१४९८३३३९.