बीड जिल्ह्यातून जाणाऱ्या तीन रेल्वेमार्गाच्या कामाचे केंद्रीय रेल्वे राज्यमंत्र्यांना अमरसिंह पंडित यांनी घातले साकडे

34

✒️नवनाथ आडे(गेवराई प्रतिनिधी)

गेवराई(दि.5ऑगस्ट):-जिल्ह्यातील लोहमार्गाच्या प्रश्नात राष्ट्रवादीचे प्रदेश सरचिटणीस अमरसिंह पंडित यांनी लक्ष घातले आहे. बुधवारी पंडित यांनी नवी दिल्लीत केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांची भेट घेऊन निवेदन दिले.

अहमदनगर – बीड – परळी लोहमार्गाला निधी उपलब्ध करुन देण्यासह सोलापूर – बीड – जळगाव या सर्व्हेक्षण पूर्ण होवून तत्वतः मंजुरी मिळालेल्या रेल्वे मार्गाससही निधी देऊन काम सुरु करावे. बेलापूर – गेवराई – परळी या स्वातंत्र्यपूर्व काळातील प्रस्तावित रेल्वे मार्गाचे सर्व्हेक्षण करून त्यास मंजुरी देण्याची आग्रही मागणी अमरसिंह पंडित यांनी या भेटीत केली.
केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी अतिशय सकारात्मकरितीने प्रतिसाद देवून कार्यवाहीचे आश्‍वासन दिले. मराठवाड्याचे भुमिपूत्र रावसाहेब दानवे यांच्याकडे मंत्रीमंडळ विस्तार व फेरबदलानंतर रेल्वेराज्यमंत्रीपद आल्याने बीड जिल्हावासियांच्याही अपेक्षा उंचावल्या आहेत.

अनेक वर्षांपासून बीड जिल्ह्यातील रेल्वेचे प्रकल्प रखडले आहेत. परिणामी जिल्ह्यात दळणवळणाच्या सुविधा नसल्याने विकासावरही परिणाम झाला आहे. तुमच्या माध्यमातून बीड जिल्हावासियांच्या अपेक्षांची पुर्तता होऊन जिल्ह्याच्या विकासाला चालना मिळेल, असा विश्वास अमरसिंह पंडित यांनी यावेळी व्यक्त केला.

फेब्रुवारी १९९७ मध्ये मंजुरी मिळालेल्या अहमदनगर – बीड – परळी रेल्वे मार्गाचे काम २०१९ पर्यंत पूर्ण करण्याचे आश्‍वासन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी दिल्याची आठवणही अमरसिंह पंडित यांनी यावेळी करून दिली.

या कामासाठी राज्य शासन आपला वाटा देत असून रेल्वे मंत्रालयाने पुढाकार घेवून हा रेल्वे मार्ग पूर्ण करावा. सोलापूर – तुळजापूर – बीड – जालना – जळगाव या रेल्वे मार्गाचे सर्व्हेक्षण झाले असून त्यास मार्च २०१९ मध्ये रेल्वे मंत्रालयाने तत्वतः मान्यता दिली आहे.

पर्यटन आणि तीर्थक्षेत्र विकासाला मदत..

दक्षिण आणि उत्तर भारत जोडणाऱ्या या रेल्वे मार्गामुळे जालना येथील स्टील उद्योगाला मोठा लाभ मिळणार आहे. या रेल्वे मार्गामुळे पर्यटन क्षेत्रालाही चालना मिळणार असल्याचे सांगून या रेल्वे मार्गाचे काम तातडीने सुरु करण्याची मागणीही पंडित यांनी केली.

बेलापूर (श्रीरामपूर) – गेवराई – परळी या रेल्वे मार्गाचे सर्व्हेक्षण स्वातंत्र्यपूर्व काळात करण्यात आले. दोन मोठ्या जंक्शनला जोडणाऱ्या रेल्वे मार्गामुळे ऊस आणि कापूस या पिकावर प्रक्रिया करणारे उद्योग जोडले जाणार आहेत.

पर्यटन आणि तिर्थक्षेत्रांच्या विकासाबरोबरच व्यापार वृध्दीसाठी सुध्दा या रेल्वे मार्गाचा मोठा फायदा होणार असल्याचे सांगून मराठवाडा विभागाचा पृष्ठभाग वाहतुकीच्या राष्ट्रीय प्रवाहात आणण्यासाठी तीनही रेल्वे मार्ग अत्यंत महत्वाचे आहेत.

मराठवाड्याचा सर्वांगिन विकास आणि आर्थिक संपन्नतेबरोबरच सामाजिक जीवन प्रणाली सुध्दा गतिमान होण्यास या रेल्वे मार्गामुळे मदत होणार असल्यामुळे ही कामे तात्काळ मंजुर करण्याची मागणी अमरसिंह पंडित यांनी दानवेंकडे केली.