या सणासाठी शेतकर्यांमध्ये उत्साह असतो.आपला बैल उठून दिसावा यासाठी शेतकरी आपल्या ऐपतीप्रमाणे त्याचा साजशृंगार खरेदी करतात.बैल सजवितात व पोळ्यात भाग घेतात.गावाच्या सीमेजवळ एक मोठे आंब्याच्या पानाचे तोरण करून बांधतात.त्या जवळ गावातल्या सर्व बैलजोड्या,वाजंत्री,सनया,ढोल,ताशे वाजवत एकत्र आणले जातात.या वेळेस सर्जा – राजावर गिते गायली जातात.
त्यानंतर ‘मानवाईक(ज्याला गावात मान आहे तो-गावचा पाटील,श्रीमंत जमीनदार)यांच्यातर्फे तोरण तोडले जाते व पोळा फुटतो.नंतर बैल मारुतीच्या देवळात नेण्यात येतात.देवाला नैवेद्य व नारळ अर्पण करुन मग त्यांना घरी नेऊन ओवाळण्यात येते.असा हा पोळ्याचा सण आहे.पोळ्यास बैलपोळा असे देखील म्हणतात.पोळा श्रावण अमावस्या या तिथीला साजरा करण्यात येतो.बैलांप्रती कृतज्ञता व्यक्त करणारा हा सण आहे.ज्यांच्याकडे शेती नाही ते मातीच्या बैलांची पूजा करतात.शेतीप्रधान या देशात व शेतकर्यांत या सणाला विशेष महत्त्व आहे.
या वेळेस पावसाचा जोर कमी झालेला असतो.शेतात पीकधान्य झुलत – डुलत असते.सगळीकडे हिरवळ असते.श्रावणातले सण संपत आलेले असतात.एकूण सर्वत्र आनंदाचे वातावरण असते.
श्रावण महिन्याची सुरुवातच सणांची उधळण करणारी असते.नागपंचमी,नारळी पौर्णिमा,रक्षाबंधन,गोकुळाष्टमी आटोपलेली असते.या सणांबरोबरच सरत्या श्रावणात पिठोरी अमावास्या येते आणि संपूर्ण महाराष्ट्रात साजरा केला जातो सर्जा-राजाचा सण म्हणजे पोळा.या दिवशी,बैलांचा थाट असतो.या दिवशी त्यांना कामापासून आराम असतो.पोळ्याच्या आदल्या दिवशी बैलांना आमंत्रण(आवतण) देण्यात येते.पोळ्याला त्यांना नदी,ओढयात नेऊन धुण्यात येते.नंतर शेतात चारा चारून घरी आणण्यात येते.या दिवशी बैलाच्या खोंडाला(मान व शरीराचा जोड-खांदा)हळद व तुपाने,तेलाने शेकले जाते.त्यांच्या पाठीवर सुरेख नक्षीकाम केलेली झूल (एक प्रकारचे चादरीसारखे आवरण),सर्वांगावर गेरूचे ठिपके,शिंगांना बेगड,डोक्याला बाशिंग,मटाट्या(एक प्रकारचा श्रुंगार),गळ्यात कवड्या व घुंगुरांच्या माळा,नवी वेसण,नवा कासरा(आवरायची दोरी),पायात चांदीचे वा करदोड्याचे तोडे,खायला गोड पुरणपोळी व सुग्रास अन्नाचा नैवेद्य दिला जातो.बैलाची निगा राखणार्या सालकरी गड्यास नवीन कपडे देण्यात येतात.
पोळ्याचे महत्त्व शेतकरी वर्गात फार आहे.शेतकरी या दिवसाची आतुरतेने वाट पाहत असतो.शेतकर्याचा सखा,मित्र सर्जा – राजाचा आजचा दिवस मानाचा असतो.पोळ्याच्या दिवशी बैलाला गाडीला अथवा नांगराला जुंपले जात नाही तर त्याचे पूजन केले जाते.पोळ्याच्या पहाटे शेतकरी आपल्या बैलांना नदीवर नेऊन त्यांची आंघोळ घालतो.त्यांच्या अंगाला हिंगूळ लावतात.शिंगाला रंग लावून त्याच्या अंगावर झूल टाकली जाते.गळ्यात सुतापासून तयार करण्यात आलेल्या माळा तर पायात घुंगरू बांधतात.अशा नाना तर्हेने सजविण्यात येते.
शेतकर्याच्या घरी बैलांचे स्वागत करण्यासाठी सुवासिनी सडा व रांगोळ्या काढून त्या पाहुण्यांची वाट पाहत असतात.तर घरात चुलीवर लाडक्या पाहुण्यासाठी खरपूस पुरणपोळी तयार होत असते.दुपारी खळ्यात बैलाला आमंत्रित करण्यासाठी शेतकरी सपत्नीक वाजतगाजत जातात व त्याला अतिथी देवो भव: प्रमाणे घरी आणतात.घरातील सुहासिनी बैलांची विधिवत पूजन करून त्यांना पुरणपोळीचा नैवेद्य देतात.
त्यासोबत त्यांच्या पुढे गहू – ज्वारीचे दान मांडतात.या दिवशी गावातील इतर घरातूनही बैलांना जेवणासाठी आमंत्रित केले जाते.शेतकर्याला औक्षण करून त्याला नारळ दिले जाते तर बैलांना पुरणपोळीचे जेवण दिले जाते.महाराष्ट्रातील काही गावामध्ये पूर्वी या दिवशी बैलांच्या शर्यतीचे आयोजन करून तेथे पोळा फोडला जातो.ज्या शेतकर्याचा बैल पोळा फोडेल म्हणजेच शर्यत जिंकेल त्या बैलाच्या अंगावर ग्रामपंचायतीतर्फे झूल टाकली जाते व शेतकर्याच्या डोक्यावर फेटा बांधून त्याचा सन्मान केला जातो.त्यानंतर गावातून बैलांची सवाद्य मिरवणूक काढली जाते.अशा पारंपरिक पद्धतीने मोठ्या उत्साहपूर्ण वातावरणात संपूर्ण महाराष्ट्रात शेतकर्याचा जिव्हाळ्याचा सण पारंपरिक पोळा साजरा केला जातो.
अशा या दिनानिमित्त जगाचा पोशिंदा असलेल्या शेतकरी बांधवांस चांगले दिवस यावेत यासाठी ईश्वरचरणी प्रार्थना व शेतकरी बांधवांस भावी वाटचालीस हार्दिक शुभेच्छा…!!!
✒️राजेंद्र लाड(शिक्षक)आष्टी,जि.बीड(मो.९४२३१७०८८५)