सांगोला साखर कारखाना येत्या हंगामात पूर्ण क्षमतेने चालू करणार

45

✒️नागेश खूपसे(सोलापूर,जिल्हा प्रतिनिधी)

सोलापूर(दि.14सप्टेंबर):-पिण्याच्या व शेतीच्या पाण्याचा प्रचंड दुष्काळ तसेच ऊस लागवडीखालील अत्यल्प क्षेत्र यामुळे गेल्या काही वर्षांपासून बंद असलेला सांगोला तालुका शेतकरी सहकारी साखर कारखाना अखेर येत्या गळीत हंगामापासून पूर्ण क्षमतेने सुरू होणार असल्याची माहिती कारखान्याचे चेअरमन मा.आम. दिपकआबा साळुंखे पाटील यांनी दिली. धाराशिव साखर कारखाना प्रा.लि.चे प्रमुख अभिजीत पाटील आणि सांगोला तालुका शेतकरी सहकारी साखर कारखाना यांच्यात भाडेतत्त्वावर कारखाना सुरू करण्याचा करार झाल्याने येत्या गळीत हंगामापासून कारखाना सुरू होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. अनेक वर्षांपासून बंद असलेल्या सांगोला सहकारी साखर कारखान्याचे धुराडे अखेर यंदा पेटणार असल्याने सांगोला तालुक्यातील बळीराजा आनंदित झाला आहे.

शेतीच्या व पिण्याच्या पाण्याचा दुष्काळ असणारा तालुका म्हणून सांगोला तालुका राज्यभर ओळखला जात होता. पाण्याचे प्रचंड दुर्भिक्ष असल्याने ऊस लागवडीखालील क्षेत्र हे अत्यल्प होते. त्यामुळे गेल्या काही वर्षांपासून उसाअभावी सांगोला तालुका शेतकरी सहकारी कारखाना बंद अवस्थेत होता. परंतु गेल्या दोन वर्षांत नीरा उजवा कालवा, टेंभू योजना, म्हैसाळ योजना, तसेच सांगोला शाखा कालवा या सिंचन योजनांचे पाणी सांगोला तालुक्याच्या चोहोबाजूंनी फिरल्याने तालुक्‍यात उसाची लागवड प्रचंड प्रमाणात झाली आहे. तालुक्यातील शेतकऱ्यांची भावना लक्षात घेऊन सांगोला तालुका शेतकरी सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन दिपकआबा साळुंखे पाटील यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांना सांगोला कारखाना लवकरात लवकर सुरू करण्याची विनंती केली होती.

यानुसार मुंबई येथे सह्याद्री अतिथीगृह येथे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, सहकारमंत्री बाळासाहेब पाटील, कारखान्याचे चेअरमन मा.आम.दिपकआबा साळुंखे पाटील, सर्व संचालक मंडळ, धाराशिव साखर कारखाना प्रा.लि.चे प्रमुख अभिजित पाटील, महाराष्ट्र राज्य सहकारी बँक (शिखर बँक) चे चेअरमन मा.अनासकर साहेब व कार्यकारी संचालक देशमुख साहेब यांच्यात बैठक पार पडली. या बैठकीत सांगोला तालुका शेतकरी सहकारी साखर कारखाना धाराशिव साखर कारखाना प्रा.लि. चे प्रमुख अभिजीत पाटील यांना भाडेतत्त्वावर चालविण्यास देण्याचे सर्वानुमते ठरले.यानंतर अभिजित पाटील यांनी सांगोला तालुका शेतकरी सहकारी साखर कारखान्याची प्रत्यक्षात संपूर्ण पाहणी करून येत्या गळीत हंगामात पासून पूर्ण क्षमतेने कारखाना सुरू करण्याचा निर्णय घेतला. धाराशिव साखर कारखाना प्राय. लि. चे सांगोला येथील कारखाना हे चौथे युनिट आहे. चालू गळीत हंगामापासून सांगोला तालुका शेतकरी सहकारी साखर कारखाना सुरू होणार असल्याने सांगोला तालुक्यातील ऊस उत्पादक शेतकरी तसेच सर्वच शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.

चालू हंगामापासून कारखाना पूर्ण क्षमतेने चालविणार
गेल्या काही वर्षांपासून बंद अवस्थेत असलेला सांगोला तालुका शेतकरी सहकारी साखर कारखाना आपण भाडेतत्त्वावर चालविण्यास घेतला आहे. धाराशिव साखर कारखाना प्रा.लि. चे हे चौथे युनिट आहे. कारखान्याचे चेअरमन मा.आम.दिपकआबा साळुंखे पाटील तसेच सर्व संचालक मंडळ यांचे सहकार्यातून येत्या गळीत हंगामापासून सांगोला तालुका शेतकरी सहकारी साखर कारखाना आपण पूर्ण क्षमतेने आणि ताकतीने सुरू करणार आहोत .