चिकित्सक विचार आणि वैज्ञानिक दृष्टिकोनातून देशात प्रगती होऊ शकते

24

🔹अर्चना उके यांनी व्यक्त केले विचार

✒️गडचिरोली प्रतिनिधी(चक्रधर मेश्राम)

गडचिरोली(दि.14सप्टेंबर):-अलीकडे भारतीय जनता अंधश्रध्देच्या खाईत पडली असली तरीही अंधश्रध्देचे सोंग करणे सोडत नाही. ही फार मोठी शोकांतिका, लाजीरवाणी बाब असुन देश अधोगतीकडे जात आहे. याबाबत अधिक माहिती समाजात पाहायला मिळते.बाळाला काळे टिके लावून त्याचे संरक्षण झाले असते तर भारतात बालमृत्यूदर शून्य असता. गाडीला लिंबूमिरची लावून गाडीची सुरक्षा झाली असती तर भारतात अपघातांची संख्या शून्य असती. पूजा करून धंद्यात बरकत आली असती तर भारतात सगळेच उद्योजक झाले असते. बुवाबाबा कडे जाऊन दु:ख निवारण झाले असते तर समस्त बुवाबाबा भक्त सुखी दिसले असते. कुंडल्या मिळवून नवरा बायकोची मनं जुळली असती तर सगळी अरेंज मॅरेजेस यशस्वी झाली असती.

यज्ञ करून जिंकता आले असते तर भारत एकही मॅच हरला नसता. चिकित्सक विचार व वैज्ञानिक दृष्टिकोनच आपल्याला प्रगत करेल. मुहूर्ताचे वेड .? ज्या दिवशी आपला जन्म झाला तोच दिवस, तीच वेळ आपल्यासाठी शुभ! जन्माला येताना कधी मुहूर्त पाहत नाही. व मरतानाही पाहत नाहीत.तरी सुद्धा जिंदगी मुहूर्त पाहण्यात जाते.सगळेच दिवस,, सर्वच वेळ शुभ असतात. फक्त इच्छाशक्ती प्रबळ असली की. आपल्यासाठी सर्वच दिवस सर्वच वेळ शुभ ठरतात. कुंडल्या पाहून लग्नांचे मुहूर्त काढले जातात तरी अनेक स्त्रीया विधवा व पुरूष विधूर का होतात ? पत्रिका व कुंडली जुळवून लग्न झालेल्या जोडप्यांचे घटस्फोट का होतात, तर काही अकाली मृत्यू होतात असे का ? ९५ % विवाह हे मुहूर्तानुसार वेळेवर लागत नाहीत तरी मुहूर्ताचा आग्रह का धरावा ? मुहूर्त पाहून निवडणुकीसाठी उभे राहणाऱ्या सर्व उमेद्वारांपैकी एकच निवडून येतो आणि बाकीचे आपटतात.

असे का घडते ? एकालाच मुहूर्त शुभ होता काय ? मंत्रीपद मिळाल्यानंतर मंत्रालयाची जबाबदारी स्वीकारण्यासाठी व खुर्चीवर बसण्यासाठी शुभ मुहूर्त शोधतात तरी त्यांच्या योजना अयशस्वी का होतात ? मंत्रीपद अल्प कालावधीत का जाते ! शुभ मुहूर्तावर मूल जन्माला घातल्यास वैज्ञानिक, राष्ट्रपती, पंतप्रधान होईल काय ? अंबानीच्या जन्म मुहूर्ताला जन्माला आलेली व्यक्ती ती पण अंबानीसारखी झाली का ? उच्च शिक्षित डॉक्टर, इंजिनियर, उद्योजक, आपल्या कार्यालयाचे बांधकाम करतांना, व्यवसायास प्रारंभ करतांना मूहूर्त पाहूनच सर्व करतात. तरी सुद्धा कित्येकांना अपयश येते असे का ? कारण मुहूर्त पाहणारी पेशवाई नष्ट झाली आणि कधीही मुहूर्त न पाहणारी ब्रिटिशशाही अख्खा भारत देश गिळून बसली होती. याचा प्रत्येक भारतीय नागरिकांनी वैज्ञानिक दृष्टिकोन ठेवून विचार करण्याची गरज आहे. स्वतःवर व स्वकर्तृत्वावर विश्वास ठेऊन कार्य केले पाहिजे. जर तुमचं मन साफ असेल व तुमच्यात प्रयत्न करण्याची क्षमता असेल तर तुमच्यासाठी कोणतीही वेळ ही ‘ शुभ मुहूर्तच ‘ असते . म्हणून शुभ-अशुभ या चक्रात न पडता विज्ञानवादी झाले पाहिजे. ..कष्टावर विश्वास ठेवा.
आणि समस्त भारतीय समाज अंधश्रद्धामुक्त करण्यासाठी प्रयत्न करावा. असे मत अर्चना उके यांनी व्यक्त केले.