देशा महायुद्धची खुशी : मग विश्वशांती कशी?

25

(वैश्विक शांती दिवस सप्ताह विशेष)

चित्ताकर्षक जगातील देशादेशांत व राष्ट्रा राष्ट्रांतर्गत होणारी देवाणघेवाण ही सुरूच राहणारी आहे. त्यामुळे विश्वात शांततामय संबंध प्रस्थापित होणे गरजेचे आहे. आज इंटरनेटचे जाळे, खुले आर्थिक धोरण- उदारीकरण, खासगीकरण व जागतिकीकरण आणि स्मार्ट फोन यांमुळे जग छोटे भासू लागले, ‘जग एक खेडे’ बनले की काय असे वाटू लागले आहे. आपल्या देशात एके काळी खेडी स्वयंपूर्ण होती; पण हे जगरूपी खेडे स्वयंपूर्ण होणार नाही. म्हणून २१ सप्टेंबर हा दिवस इ.स.२००१पासून दरवर्षी ‘विश्वशांती दिन’ साजरा करण्यात येऊ लागला आहे. पुढेही जगभर हा दिवस साजरा होत राहील; परंतु शांतीचे काय? यासाठीच संत निरंकारी मिशन झटत आहे. याचा यथोचित मागोवा घेण्याचा प्रयत्न श्री. कृ. गो. निकोडे गुरुजींनी या लेखप्रपंचाद्वारे साधला आहे… – संपादक.

“हे विश्वचि माझे घर! ऐसी मति जयाची स्थिर। किंबहुना चराचर। आपणचि जाहला!!” (संत ज्ञानेश्वर माऊलींनी)
मानवी जीवन समृद्ध होण्यासाठी शांतता अत्यंत महत्त्वाची बाब आहे; परंतु समस्त विश्वाचा विचार करता धर्म आणि वर्चस्ववाद यामुळे संकटांना सामोरे जावे लागत आहे. परिणामी, जागतिक अशांतता निर्माण होऊ पाहत आहे. त्यातील उदाहरणाचा एक भाग म्हणजे आजपर्यंत जगाने पाहिलेली दोन जागतिक महायुद्धं होत. त्या युद्धांमुळे जगातील अनेक राष्ट्रांची अपरिमित हानी झाली. तरीही जग तिसऱ्या महायुद्धासाठी सज्ज असल्याचे दिसते, केवळ क्षुल्लक कारणांवरून! एकीकडे अल्लाह तआ़ला, पैगंबरे इस्लाम, हज़रत मुहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहो अलैहि व सल्लम यांनी फर्मावले- “यह पहेला सबक हैं किताब-ए-हिदा का! के मख़लूक सारी हैं कुनबा खुदा का!!” तरीही कर्म शून्यच. याही परिस्थितीत आज निरंकारी मिशन दूरदेशात भव्यदिव्य स्वरूपात आंतरराष्ट्रीय संतसमागम आयोजित करीत आहे. अफाट संतमांदियाळीत विशाल जनसमुदायात सत्य, अहिंसा, प्रेम, नम्रता, सहनशीलता आदी दैवीगुण पेरत आहे. त्या योगे विश्वबंधुत्व, विश्वशांती आणि मानव एकता रूजून मानवता बहरलेली दिसून येते. त्यामुळेच सर्वत्र आंतरराष्ट्रीय शांतता दिन यशस्वीपणे साजरा होतो, हे नवलच! मात्र हा एक चांगला संदेश असून यास शांततामय जीवनाच्या आशेचा किरण म्हणावा लागेल.

निरंकारी बाबा संतशिरोमणी हरदेवसिंहजी महाराजांनी विश्वातील समस्त मानवांस संदेश दिला- “If peace is the need of new millennium, then spiritual awareness is the only mean to achieve it ! Universal peace is attainable only by universal brotherhood !! Universal brotherhood through fatherhood of God ! Universal brotherhood can be established only by knowing the universal father !!” अर्थात- जर शांतता नव्या युगाची मागणी असेल तर त्यासाठी एकमेव साधन आहे, आध्यात्मिक जागृती. विश्वशांती प्रस्थापित करण्याचा एकमेव मार्ग आहे, विश्वबंधुत्व. विश्वबंधुत्व हे परमपित्याकडून प्रवाहित होत असते. कारण एका परमपिता परमात्म्याला जाणल्याशिवाय विश्वबंधुत्व प्रस्थापित करता येणे शक्य नाही.

खरे तर जागतिक शांतता ही एखाद्या राष्ट्रातील काही घटनांवरून साधता येत नाही. त्यासाठी विश्वव्यापी पुढाकार घेतला पाहिजे. कारण मूलभूत व चिरंतन विकासातून मानवी कल्याण होण्यासाठी शांतता अत्यंत गरजेची आहे. त्यासाठी दोन मार्ग आहेत एक धाक आणि दुसरा अहिंसा; पण खरे तर यातील दुसरा अहिंसेचा मार्गच पत्करणे काळाची गरज आहे. महात्मा तथागत गौतम बुद्धांनी सत्य, शांती, अहिंसा व बंधुत्वाचा संदेश अखिल विश्वाला दिला- “तेरा मंगल, तेरा मंगल, तेरा मंगल होय रे। जग जन मंगल, सब जन मंगल, सबका मंगल होय रे।”
जागतिक शांतता धोक्यात आणण्यात आतंकवाद हा कलंत्री घटक असून त्याची झळ अनेक देशांना बसली आहे व बसत आहे. काही राष्ट्रांना तर आतंकवादी राष्ट्रे म्हणून घोषित करण्याची मागणी जोर धरत आहे. यावरून त्याचे रूप किती भयानक आहे, हे स्पष्ट होते. तो खरी जागतिक समस्या असून त्यामुळे विश्वशांती ढळू लागते. जगातील अनेक देश या किडीने पोखरून निघाली आहेत. आपल्या देशात आतंकवादाने कहरच केला आहे. नेहमी कुठे ना कुठे कारवाया होत असतात. जगाचे लक्ष असलेल्या काश्मीर वादामुळे देशाला मोठी किंमत मोजावी लागत आहे. आपल्या शेजारील देश शेजारधर्म पाळत नसल्याने आपली संरक्षण यंत्रणा नेहमी सज्ज ठेवावी लागते. तसेच वेळोवेळी विविध चाचण्या आणि अणुशक्तीमधून आपली ताकद दाखवून द्यावी लागते. जगामध्ये आशिया खंड हा आतंकवादाचा अड्डा असल्याचे बोलले जाते. काही राष्ट्रे अणुबाँब तयार करून जागतिक करार भंग करत आहेत. त्यांना संत निरंकारी मिशनचा आदर्श अंगीकारण्याची नितांत गरज आहे.

शहंशाह बाबा अवतारसिंहजी महाराजांनी खंत व्यक्त केली-
“एह संसार लड़ाईयां झगड़े दंगे अते फसादां दा।
एह संसार वैर नाल भरया चीकां ते फरयादां दा।
बांस जिवें आपो विच खह के इक दूजे नाल सड़दे ने।
एदां इस संसार दे अन्दर बंदे मरदे लड़दे ने।
सांझे प्यो दा पता जे होवे होवे कदे बखेड़ा ना।
कहे अवतार गुरु दे बाझों हुन्दा एह नबेड़ा ना।

जगाला शांततेचा संदेश देणाऱ्या सद्धर्माचे आचरण होणे गरजेचे आहे. अलीकडे मानवाच्या मूलभूत गरजा आणि भौतिक हव्यास वाढताच असून, भरमसाठ वाढणारी लोकसंख्या व शहरीकरण यातून मानसिक संतुलन बिघडू लागले आहे. परिणामी माणूस आंतकवादाकडे वळू पाहत आहे. त्यासाठी शांततेची गरज असून पहिले, दुसरे महायुद्ध झाले, आता तिसरे महायुद्ध नको. प्रभू येशू ख्रिस्तांनी म्हटले- “Love thy neighbor as thy self !” (पवित्र बायबल) कारण ते या खेडेरूपी जगाला परवडणारे नाही. नाहीतर हे खेडे अलीकडच्या शस्त्रसामुग्रीमुळे बेचिराख होण्यास वेळ लागणार नाही. म्हणून जागतिक शांतता दिनाच्या निमित्ताने आपण सर्वांनी मानवता हाच धर्म मानून जगाला शांततेचा संदेश दिला पाहिजे. संत निरंकारी मिशनच्या विद्यमान सद्गुरू माता सुदीक्षाजींना विश्वशांती स्थापित करण्याच्या मंगलमय कार्यात समर्पित जीवन जगले पाहिजे. जशी स्वदेशात नांदवू तशी जगातही शांतता नांदेल, मानवतेची सत्ता येईल. म्हणजेच मानवी कल्याणाला वाव मिळेल आणि सामाजिक स्वास्थ्य निर्माण होण्यास मदत होईल. म्हणून जिथे शांतता असेल तिथेच मानवताही नांदेल. कारण शांतता हेच मानवी विकासाचे मूळ आहे. आंग्लकवींनी लिहिले आहे- “Everybody will wrangle for Religion. He will write for Religion; he will say about Religion! He will fight for Religion; he will die for Religion!! He will do everything but don’t live for Religion.” अर्थात- मनुष्य धर्मासाठी खटपट करतो.

तो लिहितो, गुण गातो, झगडतो, मरतो, सर्वकाही करतो धर्मासाठीच! मात्र तो धर्माची शिकवण आचरण्यास जगत नाही!!
बहुढंगी दुनियेत शांतता, अहिंसा आणि परस्पर प्रेम या मानवी जीवनातील महत्त्वाच्या किल्ल्या आहेत. जागतिक शांतता दिवस हा संपूर्ण जगात सुव्यवस्था, शांतता आणि अहिंसा प्रस्थापित करण्याच्या हेतुने दरवर्षी २१ सप्टेंबरला साजरा केला जातो. सन १९८१ साली राष्ट्रकुलाच्या सर्वसाधारण बैठकीत संमत झालेल्या ठरावानुसार सप्टेंबर महिन्याचा तिसरा मंगळवार ‘विश्वशांती दिन’ म्हणून घोषित करण्यात आला होता. दि.२१ सप्टेंबर १९८२ हा प्रथम ‘आंतरराष्ट्रीय शांतिदिन’ ठरला. सन २००१ साली या ठरावात बदल करून सप्टेंबरचा तिसरा मंगळवार न धरता तंतोतंत २१ सप्टेंबरवरच ‘विश्वशांती दिन’ म्हणून शिक्कामोर्तब झाले.

“अयं बन्धुश्यं नेति गणना लघुंचेतासाम|| उदार चरितानां तु विगतावरणैव धीः|| गणना लघुंचेतसाम वसुधैव कुटुम्बकम||” (पवित्र योगवशिष्ठ: ५.१८.६१)
अर्थ: हा माझा भाऊ, तो कुणीच नाही. अशी विचारसरणी संकुचित बुद्धीच्या लोकांची असते. तर महापुरुष उदार अंतःकरणाचे असतात. ते हे संपूर्ण जगच आपले कुटूंब समजतात.

!! पुरोगामी संदेश परिवारातर्फे जागतिक शांतता दिन व सप्ताहाच्या सर्वांना मनःपूर्वक शुभेच्छा !!

✒️लेखक:-‘अलककार’- श्री. कृ. गो. निकोडे गुरूजी.
(आध्यात्मिक ज्ञान-विज्ञान तथा संत-लोक साहित्याचे गाढे अभ्यासक)मु. पिसेवडधा, पो. देलनवाडी.त. आरमोरी, जि. गडचिरोली,व्हा. नं. ९४२३७१४८८३.