धरणगाव येथे ओबीसी आरक्षण परिषद नियोजन बैठक उत्साहात संपन्न

23

✒️धरणगाव प्रतिनिधी(पी.डी. पाटील सर)

धरणगांव(दि.२२सप्टेंबर):-२०२१ बुधवार रोजी इंदिरा गांधी माध्यमिक विद्यालय येथे ‘ओबीसी आरक्षण हक्क परिषद’ जळगाव व ‘खान्देश स्तरीय सत्यशोधक परिषद’ चाळीसगाव या दोन्ही परिषदेची नियोजन बैठक गावातील सर्व समाजातील ओबीसी बांधवांच्या उपस्थितीत उत्साहात संपन्न झाली.

या दोन्ही परिषदेच्या नियोजन बैठकीचे प्रास्ताविक पी.डी.पाटील यांनी केले. या छोटेखानी ओबीसी नियोजन बैठकीचे अध्यक्ष धरणगावचे नगराध्यक्ष निलेश चौधरी होते. याप्रसंगी काँग्रेसचे जेष्ठ नेते डी.जी.पाटील, लोकसभेचे सहसंपर्कप्रमुख गुलाबराव वाघ, राष्ट्रवादीचे ज्ञानेश्वर महाजन, मोमीन समाजाचे सामाजीक कार्यकर्ते शेख हाफीजोद्दीन तसेच धरणगाव शहरातील सर्व समाजाचे समाज अध्यक्ष, उपाध्यक्ष, सचिव व सर्व सन्माननीय पदाधिकारी उपस्थित होते.

या बैठकीमध्ये लक्ष्मण पाटील, गुलाबराव वाघ, डी. जी.पाटील, ज्ञानेश्वर महाजन, निलेश चौधरी, सुनिल चौधरी यांनी ओबीसी आरक्षण हक्क परिषद, जळगांव व खान्देश स्तरीय सत्यशोधक परिषद चाळीसगाव या दोन्ही परिषदेसंदर्भात विस्तृत अशी माहिती दिली तसेच ओबीसींच्या सर्व समस्या मांडल्या. ओबीसींची जातीनिहाय जनगणना झाली पाहिजे, ओबीसींचे राजकीय – शैक्षणिक आरक्षण जे धोक्यात आले आहे ते टिकले पाहिजे. शिवराय – फुले – शाहू – आंबेडकरांचा वारसा सांगणाऱ्या पुरोगामी महाराष्ट्रात आज मात्र ओबीसींच्या आरक्षणावरच घाला घालण्यात आला आहे, यासाठी सर्व ओबीसी बांधवांनी एकत्र येऊन लढा उभारला पाहिजे. आपल्या न्याय हक्कासाठी सर्व ओबीसी बांधवांनी एकत्र आले पाहिजे अशा सूचना वरील सर्व मान्यवरांनी आपल्या मनोगतात व्यक्त केल्या. लोकनियुक्त नगराध्यक्ष निलेश चौधरी यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात ओबीसी हक्क परिषदेला बहुसंख्येने उपस्थित राहणेबाबत आवाहन केले.

ही प्रथम भव्य ओबीसी आरक्षण हक्क परिषद जळगाव येथे २५ सप्टेंबर, २०२१ शनिवार रोजी सकाळी १० वाजता “छत्रपती संभाजीराजे नाट्यगृह”, जळगांव येथे संपन्न होणार आहे. दुसरी ऐतिहासिक खान्देशस्तरीय सत्यशोधक परिषद दि. २६ सप्टेंबर, २०२१ रोजी सकाळी १० वाजता ” वैभव मंगल कार्यालय “चाळीसगाव येथे संपन्न होणार आहे. या दोन्ही परिषदेचे पत्रक उपस्थित सर्व ओबीसी बांधवांना वाटप करण्यात आले तसेच हे दोन्ही पत्रक सोशल मीडियाच्या माध्यमातून व्हाट्सएपच्या प्रत्येक ग्रुपवर व फेसबुक वर टाकण्याचे आव्हान करण्यात आले. या बैठकीची माहिती समस्त शहर व ग्रामीण भागातील ओबीसी बांधवांपर्यंत पोहोचवावी असेही मान्यवरांनी सांगितले.

या दोन्ही परिषदेचे जळगाव व चाळीसगाव जाण्या – येण्याचे नियोजन करण्यात आले. या नियोजन बैठकीला उपस्थित धरणगाव शहरातील सर्वच समाज अध्यक्ष यांनी स्वतः गाड्या करून आपापल्या समाजातील बांधवांना या दोन्ही परिषदेला आणणार, असे आश्वासन दिले. ज्यांना – ज्यांना शक्य असेल ते ओबीसी बांधव आपापल्या चारचाकी व दुचाकी वाहनांवर किंवा आपापल्या मित्रांच्या गाडीमध्ये येणार आहेत. ज्या – ज्या ओबीसी बांधवांना परिषदेला येण्यासाठी गाडीची अडचण असेल अशा सर्व ओबीसी बांधवांना चारचाकी गाड्यांची सोय डी.जी.पाटील, गुलाबराव वाघ, ज्ञानेश्वर महाजन, निलेश चौधरी हे करणार आहेत. धरणगाव शहर व ग्रामीण भागातून जवळ जवळ २० ते ३० गाड्या या परिषदेला येणार आहेत. या नियोजन बैठकीचे सूत्रसंचलन व्ही.टी.माळी तर आभार कैलास माळी यांनी मानले. याप्रसंगी या नियोजन बैठकीच्या यशस्वीतेसाठी धरणगाव शहरातील सर्व ओबीसी बांधवांनी परिश्रम घेतले.