आरोग्य विभागाने भावी कर्मचाऱ्यांच्या बिघडवल्या तब्येती

30

आरोग्य विभागाच्या गट क आणि ड वर्गातील विविध जागेसाठी दिनांक २५ आणि २६ सप्टेंबर रोजी आरोग्य विभागाची परिक्षा नियोजीत होती. परंतु ऐन वेळेवर म्हणजे उमेदवार परिक्षा केंद्रावर पोहचल्यानंतर सदर परिक्षा रद्द करून सरकारने आपला नाकर्ते पणा सिद्ध करून दिला आहे. परिक्षेचे आवेदन पत्र भरण्यापासुन तर परिक्षा केंद्रावर पोहचे पर्यंत काय मेहनत लागते, कोणकोणत्या अडचणींना सामोरे जावे लागते याची जाणीव वातानुकूलित घरामध्ये बसणाऱ्या लोकांना अजिबात नसते याची जाणीव वारंवार होत आहे. कोरोनाच्या नावाखाली छोटे मोठे व्यवसाय बंद झाले, ग्रामीण भागामध्ये शेतात हंगामी कामे वगळता हाताला कामे नाहीत. घरामध्ये एखादा व्यक्ती मिळले ते काम करतो तेवढ्या पैशात घरखर्च, मुलांचे शिक्षण, ऑनलाइन साठी मोबाईल, त्याचे रिचार्ज, दवाखान्याचा खर्च, वरून महागाईचा भार, आणि हे सर्व करताना घेतलेले कर्ज व ते फेडण्याची चिंता. एवढी मेहनत व बिकट परिस्थिती असताना सुद्धा पोटाला उपाशी ठेऊन, आपल्या ईच्छा मारून उमेदवार आपली परिस्थिती सुधारण्यासाठी एखादी नोकरी मिळेल म्हणून अपेक्षा ठेवतात.

आवेदनपत्र भरण्यापासुन त्या परिक्षेची फी, आवेदन पत्र भरण्याचा खर्च, परिक्षा केंद्रावर जाण्यायेण्यासाठी लागणारा खर्च असे सर्व खर्च जर आपण एकत्रित केले तर एका परिक्षेसाठी एका व्यक्तीच्या पंधरा दिवसाच्या मजुरी एवढा खर्च येतो. आणि सरासरी जर आपण काढली तर एका व्यक्तीला मजुरीचे काम नियमित मिळेलच याची कोणत्याही प्रकारची शाश्वती नाही. तरी सुध्दा एक आशावाद बाळगून अनेक उमेदवार परिक्षेची तयारी करून आपल्याला छोटी मोठी नौकरी मिळते या विश्वावर अनेक संकटावर मात करत असतात. आणि एवढ्या संघर्षातुन, त्यागातून, आणि मेहनत करून आलेल्या उमेदवारांच्या अपेक्षेवर पाणी फिरवून त्यांच्या जिवनाशी खेळणे हे कोणाच्या नितीमत्ते मध्ये बसेल? एका परिक्षा घेणे सरकारला जरी औपचारिकता असेल तरी एका उमेदवारासाठी त्याच्या परिवारासाठी ती परिक्षा आशेचा किरण असतो. आणि हिच परिक्षा रद्द करून आरोग्य विभागाने उमेदवारांची आर्थिक, मानसिक व शारीरिक तब्येत बिघडवून त्यांना कमकुवत करण्याचे काम केल्या गेले आहे. परिक्षा रद्द होण्याचे कारणे सांगुन उमेदवारांची झालेली आर्थिक आणि माणसिक हानी भरून तर निघणार नाही उलट अनेक उमेदवारांचे आर्थिक आणि माणसिक संतुलन बिघडल्याने पुर्व स्थिती मध्ये येण्यासाठी वेळ लागणार आहे. याला जबाबदार कोण? उमेदवारांची काय चुक? सरकार नेमके काय करते? असे अनेक प्रश्न उपस्थित होतात. ऐन वेळेवर परिक्षा रद्द करून सरकारने आपले आपला नाकर्ते पणा सिद्ध केलाच पण विद्यार्थ्यांचे एवढे नुकसान होऊन विद्यार्थी शांतच बसत असतील तर मग शिक्षणावरही प्रश्न चिन्ह उपस्थित राहतो.

आरोग्य मंत्री यांनी परिक्षा रद्द झाल्याबद्दल दिलगिरी व्यक्त करत कंपनीला दोष देत विद्यार्थ्यांना टोपी घातली हे कोणीही नाकारू शकत नाही. पण यामध्ये काही प्रश्न आहेत त्यावर जर विचार केला तर असे जाणवते सरकार परिक्षेविषयी गंभीर नव्हतेच म्हणून हे घडले. आरोग्यमंत्र्यांनी सांगितले सरकारने त्यांच्या कडून योग्य काम केले परंतु कंपनीच्या चुकीमुळे परिक्षा रद्द करावी लागली. मग एक साधा प्रश्न निर्माण होतो कंपनीची चुक होती हे सरकारच्या केव्हा लक्षात आले? परिक्षेच्या दिवशी का अगोदरच? जर अगोदरच लक्षात आले तर उमेदवार परिक्षा केंद्रावर पोहचले तेव्हा परिक्षा का रद्द केली? अगोदर का नाही केली? आणि जर कंपनीने व्यवस्थित काम केले नाही हे जर परिक्षेच्या दिवशी लक्षात येते तर आपण कंपनीला काम दिल्यापासून तर परिक्षेच्या दिवसापर्यंत एकदाही कामाचा आढावा कंपनीकडून घेतला नाही का? जर आपण आढावा घेतला असेल आणि कंपनीने काम केले नसेल तर त्यात कंपनीची चुक कशी? आणि जर आपण आढावाच घेतला नसेल तर विद्यार्थांची दिशाभूल सरकार बरोबर आहे असे बोलताच कसे? कामाचा पाठपुरावा करण्यामागे एक तर सरकार कमी पडले, किंवा कंपनी व्यवस्थित काम करत नाही हे माहीती असुन सुद्धां वैयक्तिक स्वार्थासाठी अगोदरच बोलले नाही.

वरील गोष्टींचा विचार केला तर सरकारचा निष्काळजीपणा, आणि परिक्षे विषयी नसलेली गंभिरताच परिक्षा रद्द होण्यासाठी कारणीभुत आहे. चुकी जरी सरकारची असेल तरी त्याचा परिणाम आणि पश्चिताप मात्र उमेदवारांना होत आहे हे कोणीही नाकारू शकत नाही. दुसरी बाजू बघितली तर, महाराष्ट्रात लाखो तरुण बेरोजगार असताना त्यांना रोजगार देऊन सक्षम न करता कंपनीला जादा पैसे देऊन शासकीय काम का दिले जावे? बेरोजगार सुशिक्षित तरुणांना शासकीय रोजगार उपलब्ध करून देऊन सर्व कामे शासन दरबारी का होऊ नये. कंपन्या व्यवस्थित काम करत नाहीत याची माहीती असताना खाजगीकरणावर भर का दिला जातो? स्वतः चे काम करण्यासाठी सरकार सक्षम नाही? अशा अनेक प्रकारामुळे अनेक प्रश्न निर्माण होतात. आणि याचे उत्तर सरकार देण्यास असक्षम ठरते. सरकार विद्यार्थ्यांचे एवढे नुकसान करून आर्थिक आणि मानसिक खच्चीकरण करते याला नेमके जबाबदार कोण याची जाणीव विद्यार्थ्यांना/उमेदवारांना खरचं आहे का? हा सुद्धां अभ्यास करण्याचा विषयी आहे.

सरकार विद्यार्थ्यांच्या हिताचे नाही याची प्रचीती अनेक परिक्षा व विद्यार्थ्यांच्या सुख सुविधा विषयी आलेली आहेच. अनेक परीक्षेमध्ये, निकालामध्ये, नियोजनामध्ये कीतीतरी गोंधळ झाल्याचे सर्वांना माहिती आहे तरी सुध्दा विद्यार्थी आवश्यक ती भूमिका घेत नाही. साधारता आपण बघतो की प्रत्येक जन विशिष्ट पक्ष, नेता, यांच्या शी जुळलेला असतो कोणाचाही झेंडा हातात घेऊन मिरवतो, जेव्हा नेता अडचणीमध्ये असतो, परिस्थिती कशीही असली तरी स्वतः ला सुशिक्षित समजणारे उमेदवार सुद्धा कोणाचे ना कोणाचे भक्त झालेले असतात. एकदा भक्त झाले की नेता बोललेल तिच पुर्वदिशा. विद्यार्थ्यांनी अराजकीय राष्ट्रव्यापी, राज्य व्यापी संघटन बनवले नाही, प्रस्थापित नेत्यांच्या इशाऱ्यावर नाचून स्वतः चे समाधान करून घेतात. पण समस्येच काय? कोणताही पक्ष , नेता सर्वसामान्य लोकांची व हक्क न्यायाची बाजू कधीच उचलून धरत नाही म्हणून सर्वसामान्य लोकांना लोकांना न्याय आणि हक्क मिळत नाही, ज्यांना न्याय हक्क मिळत नाही असेच लोक नेत्यांच्या चटया उचलायला मग्न असतात. विद्यार्थी कागदोपत्री शिकत आहेत परंतु जागृत झाले नाहीत. परिक्षा रद्द होऊन सुद्धां आपले हक्क अधिकार विद्यार्थ्यांना माहिती नाहीत.

परिक्षा रद्द झाली म्हणून रात्री परतत असलेल्या विद्यार्थ्यांना सहज म्हणून विचारले नुकसान भरपाई मिळायला पाहिजे तेव्हा त्यांचे उत्तर आले सर्वांना मिळाली तर आम्हाला मिळेल याचा अर्थ विद्यार्थी आजही जागृत झालेले नाहीत, आपले हक्क अधिकाराची जाणिव नाही, त्रास मला एकट्याला च नाही तर सर्वांना झाला म्हणून मीच का बोलु? मिच का नेतृत्व घेऊ? मी एकटाच आहे का? या प्रकारचे विचार विद्यार्थ्यांना संकुचित तर बनवतात पण शिकलेली.विद्यार्थी जागृत कधी होतील ही खंत तशीच राहते. परिक्षा रद्द करून सरकारने आपल्याला नाकर्ते पणा जरी सिद्ध केला असेल तरी सुद्धा उमेदवारांनी कोणत्याही प्रकारचा आवाज न उठवता शांत बसणे म्हणजे जागृत नसते व हळूहळू शिक्षणाकडून गुलामी कडे जाणे होय. सरकारला वठणीवर आणण्यासाठी विद्यार्थ्यांना जागृत असणे आवश्यक आहे. नाहीतर सरकार कोणत्याही प्रकारचा रोजगार वा रोजगाराच्या सुविधा न देता उमासमारीचा आजार जडवून देईल. हे लक्षात सुद्धा येणार नाही. विद्यार्थ्यांना जागृत होऊन अराजकीय छताखाली एकत्र येण्याची लस टोचून घेतली तर भविष्यात विद्यार्थ्यांचे नुकसान हा आजार होणार नाही. या साठी विद्यार्थी एकत्र असणे आवश्यक आहे.
**************************************
✒️लेखक:-विनोद पंजाबराव सदावर्ते(रा.आरेगार,ता.मेहकर)मो:-९१३०९७९३००
**************************************