रुग्ण हक्क परिषदेच्या मुंबई महामोर्चात कोकण विभागातून हजारो नागरिक सहभागी होणार- उमेश चव्हाण

22

✒️अंबादास पवार(विशेष प्रतिनिधी)

चिपळूण(दि.27सप्टेंबर):-रुग्णांची होत असलेली लूट, पैसे नाहीत म्हणून वेळेत न मिळणारे उपचार, पैशाअभावी रोखले जाणारे मृतदेह, रुग्णांच्या हक्क अधिकाराची पायमल्ली करून रुग्णांचे हक्क – अधिकारावर गदा आणणार्‍या गंभीर घटना दररोज महाराष्ट्रात घडत असताना इथल्या गरिबांनी पैसे नाहीत म्हणून मरायचं का? असा प्रश्न निर्माण झाला आहे, आणि म्हणून फौजदारी संहीतेचा रुग्ण हक्क संरक्षण कायदा झालाच पाहिजे, या प्रमुख मागणीसह विद्यार्थ्यांचे प्रश्न, दररोज स्त्रियांवर होणारे बलात्कार, शेतीमालाला हमीभाव, डॉक्टरांचे संरक्षणाचे प्रश्न, वैद्यकीय साहित्य यंत्रसामग्रीवर सबसिडी दिली पाहिजे, धर्मदाय रुग्णालय आणि खाजगी रुग्णालयांना चाप लावला पाहिजे.

अशा पद्धतीच्या तेरा प्रमुख मागण्यांसाठी गांधी जयंतीदिनी २ ऑक्टोबर रोजी सेंट झेवियर्स कॉलेज पासून रुग्ण हक्क परिषदेच्यावतीने मंत्रालयावर पीपीई किट घालून हजारोंच्या संख्येने रुग्ण हक्क परिषदेच्या वतीने आक्रोश महामोर्चा काढण्यात येणार आहे, अशी माहिती रुग्णहक्क परिषदेचे संस्थापक अध्यक्ष उमेश चव्हाण यांनी चिपळूण येथे आयोजित कार्यकर्ता संवाद मेळाव्यात दिली.
यावेळी रुग्ण हक्क परिषदेचे कोकण प्रदेशाध्यक्ष सुहास पंचाळ, केंद्रीय कार्यालय सचिव गिरीष घाग, महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष चंद्रकांत सरवदे, कोकण विभाग सचिव संतोष घाग, उदय पवार, ऍड. अशोक निकम प्रमुख उपस्थित होते.
यावेळी बोलताना अध्यक्ष उमेश चव्हाण पुढे म्हणाले की, बेरोजगारी वाढलेली आहे. युवकांना उद्योगधंद्यासाठी कोणत्या बँक कर्ज द्यायला तयार नाहीत. दररोज लहान मुलींपासून महिलांवर अन्याय अत्याचाराच्या सामूहिक बलात्काराच्या मन हेलावून टाकणाऱ्या बातम्या कानावर येत आहेत. ऑनलाइन शिक्षण पद्धतीमुळे शिक्षणाचा दर्जा घसरला असला तरी फी मध्ये कोणत्याही प्रकारची कपात करायला शिक्षण संस्थाचालक तयार नाहीत. शेती मालाला भाव नाही. प्रक्रिया उद्योगाला आणि सर्वसामान्य नागरिकांना एकच भावाने शेतीमाल विकला जात आहे.

हमीभाव मिळत नसल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. माणसाच्या आयुष्यातील सुख हिरावून घेऊन दुःख निर्माण करणारे प्रश्न राज्य आणि केंद्र सरकारने तात्काळ सोडविले पाहिजेत, म्हणून गांधी जयंतीदिनी हजारो नागरिकांच्या संख्येने पीपीई किट घालून मंत्रालयावर काढण्यात येणाऱ्या आक्रोश महामोर्चा मध्ये सर्वसामान्य नागरिकांनीही सहभागी झाले पाहिजे, असे आवाहन त्यांनी कार्यकर्ता संवाद मेळाव्यात केले.