प्राथमिक शिक्षण ठरले कोरोना संकटाचे बळी- दीड वर्षांपासून शाळा कुलूपबंद-भावी पिढी अंधारात

24

✒️भास्कर फरकडे(चामोर्शी,तालूका प्रतीनिधी)मो:-9404071883

चामोर्शी(दि.27 सप्टेंबर):– तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या शासकीय व इतर अनेक खाजगी प्राथमिक शाळा मागील दीड वर्षांपासून कोरोना साथरोगाच्या भीतीने कुलूपबंद असल्याचा मोठा शैक्षणिक फटका चिमुरड्या मुलांना बसत आहे. स्पर्धात्मक जगाचा सामना करण्यासाठी आवश्यक असणारे मजबूत प्राथमिक शिक्षण देण्याची व्यवस्था शासनाकडून करण्यात आलेली आहे.विद्यार्थ्यांचा जीवनाला बहुमुखी आकार देण्याचे आणि भविष्यातील देशाचे आधारस्तंभ असलेले नागरिक घडविण्याचे कार्य प्राथमिक शिक्षणाद्वारा केले जाते. मात्र शासनाने खबरदारी पोटी साथ रोगाचा फैलाव होऊ नये म्हणून पूर्णपणे बंद केले आहे.

प्राथमिक शाळेतील विद्यार्थी कमी वयाचे असल्यामुळे आभासी पद्धतीने या मुलांना प्रभावी पणे अक्षरांची ओळख करून देणे पालकांना जिकरीचे झालेले आहे. शिवाय अँड्रॉइड मोबाईलमुळे मुलांच्या डोळ्यांवर आणि बाल मनोअवस्थेवर घातक विपरीत परिणाम होतात ते वेगळेच. तालुक्यातील नागरिकांना आपल्या मुलांच्या शालेय शिक्षणाची चिंता आता सतवायला लागली आहे.
आपल्या मुलांना शिक्षणापासून वंचित राहावे लागत आहे मागील 18 महिन्यापासून शालेय शिक्षणाचे हे वास्तव चित्र असून, त्यामुळे कधीही न भरून निघणारे नुकसान झालेले आहे. शासन मात्र याकडे सावध पवित्रा घेऊन दुर्लक्ष करीत असल्याचे निदर्शनास येत आहे. विद्यार्थ्यांची अक्षर ओळख पुसून जाऊ नये ,यासाठी ग्रामीण भागातील बरेच जागरूक नागरिक आपापल्या मुलांना आता घरीच पेन्सिल वह्यांच्या माध्यमाने अंक उजळणी आणि बाराखडी शिकविण्यास बाध्य झालेले प्रकषानें निदर्शनास येत आहे