“क्रांती म्हणजे अन्यायावर आधारलेल्या प्रचलित समाज व्यवस्थेत आमूलाग्र परिवर्तन होय”

27

🔹बुद्धिमान माणसं ज्यांना वेडी पोर म्हणतात, वाट चुकलेले म्हणतात तेच क्रांत्या करत असतात. रक्त फक्त युवकच सांडू शकतो! 

जगातील सर्व क्रांत्या आणि परिवर्तने युवकांनीच केले आहेत.अशी प्रभावी वाक्ये आपल्या वाचनात आणि ऐकण्यात आली की आपल्याला ही भरून संचारून येते..पण ते दीर्घकाळ टिकत नाही!  शेळी होवून शंभर वर्षे जगण्यापेक्षा वाघासारखं एक दिवस जगा,हा मंत्र ज्यांनी जगला ते भगतसिंग होत. साडे तेवीस वर्षाचे आयुष्य लाभलेले भगतसिंग निश्चितच आम्ही सर्वच बाजूने जाणून घेणे आवश्यक आहे.

१.जन्म बालपण:-
  भारताच्या इतिहासामधील प्रचंड प्रिय आणि नावाजलेले नाव म्हणजे भगतसिंग.

भगतसिंग यांचा जन्म 28 सप्टेंबर 1907 ला बंगा जिल्हा रायपुर पंजाब प्रांतात झाला. (सध्या ते गाव प्रांत पाकिस्तान मध्ये आहे) आई विद्यावती व वडील किसनसिंह संधू यांच्या कुटुंबात झाला. बालपणापासून ते प्रचंड तल्लख, बुद्धिमान होते. वयाच्या बाराव्या वर्षी त्यांनी जालियनवालाबाग  संदर्भाने लाहोर ते अमृतसर अठ्ठावीस किलोमीटरचा प्रवास केला होता. त्यांनी इंग्रजी, उर्दू,संस्कृत,बंगाली आणि पंजाबी या भाषा प्रचंड अभ्यास करून अवगत करून घेतल्या. देशसेवेच्या आणि क्रांतिकारक कार्याच्या ओढीने त्यांनी वयाच्या सोळाव्या वर्षी घरदार सोडून कानपूरला गाठले. याबरोबर त्यांनी लग्न न करण्याचा धाडसी निर्णय हिघेतला होता. कानपुरमध्ये  दिवसभर मुख्याध्यापक म्हणून काम करायचे आणि रात्री क्रांतिकार्याला मदत करायची. असा त्यांचा दिनक्रम बनला होता. *प्रताप* या वृत्तपत्राच्या संपादन विभागात त्या काळात ते काम करायचे. 1926 ला म्हणजेच त्यांच्या वयाच्या अठराव्या वर्षी त्यांनी 

*नौजवान भारत सभा* ही संघटना स्थापन केली.या संघटनेचे पहिले अध्यक्ष रामकिसन तर जनरल सेक्रेटरी भगतसिंग होते. नौजवान  भारतसभा स्थापन करतेवेळी शीख धर्मियांना प्रिय असणारी दाढी व पगडी काढून टाकली व स्वतःचे नाव रणजित ठेवले. पुढे त्यांनी हिंदुस्तान सोशल रिपब्लिकन असोसिएशन या संघटनेचे ही काम केले. मॅजिक लँटर्न स्लाईड शो करून ते क्रांतिकारकांचा परिचय आणि कार्य याची माहिती कार्यकर्त्यांना देत. फ्रान्सचा क्रांतिकारक वॉलोचा भगतसिंगवार प्रभाव होता.

“बहिऱ्यांना ऐकू येण्यासाठी मोठ्या आवाजाची गरज असते” हे वॉलोचे मत होते.त्यासाठी त्याने असेंम्बलीत बॉम्ब टाकला होता.त्याच धर्तीवर भगतसिंग यांनी प्रयोग केला होता.ज्यात हिंसा न होता आपला संदेश पोहचविणे हा उद्देश होता.

 म्हणूनच दिल्ली असेंम्बलीच्या  रिकाम्या लॉबीमध्ये 8 एप्रिल 1929 ला बॉम्ब फेकला होता. या प्रकरणानंतर भगतसिंग आणि सहकारी यांना पकडून न्यायालयात खटला चालवला गेला .यावेळी त्यांनी स्वतःचा बचाव करण्यासाठी वकील घेण्यास नकार दिला व स्वतःच स्वतःचे मत मांडले. 1929 ते 1931 या काळात तुरुंगात त्यांनी प्रचंड वाचन व लेखन केले. कारागृहात पुस्तके वाचण्यासाठी मिळावीत म्हणून त्यांनी 114 दिवसाचा अन्नत्याग आंदोलन केले होते. 7 ऑक्टोबर 1930 ला ट्रीब्यूनल चा निकाल आला, ज्यात फाशीची शिक्षा ठोठावण्यात आली. 24 मार्च 1931ही फाशी देण्याची तारीख जाहीर करण्यात आली, परंतु ते 23 तारखेलाच ही कृती करण्यात आली होती. 
*२.) साहित्यिक भगतसिंग*:-

भगतसिंग हे बुद्धिप्रामाण्यवादी होते. त्यांच्या वाचनात जे साहित्य आले.ते त्यांनी चिकित्सकपणे अंगीकृत करून व्यवस्था परिवर्तनाच्या लढाईसाठी त्याचा प्रसार आणि प्रचार केला.चिकित्सक  दृष्टिकोन संदर्भांनी ते म्हणतात,

“अंधानुकरण करण्यासाठी किंवा त्यात जे लिहिले आहे तेच प्रमाण मानण्यासाठी कृपया वाचू नका. ते वाचा, त्याची समीक्षा करा,त्यावर चिंतन करा आणि त्या आधारित तुम्ही तुमची स्वतःची मते बनवा.”

*चिकित्सा का महत्वाची आहे* या संदर्भाने ते म्हणतात,

“माणसाने काल्पनिक देवाचे अस्तित्व निर्माण केले आहे. लोक सर्वसाधारणपणे जीवनाच्या परंपरागत स्थितीना बिलगून राहतात आणि बदलाच्या केवळ विचारांनाही भयभीत होऊन जातात.”

साहित्याचे महत्त्व सांगताना भगतसिंग म्हणतात, 
    “सुसंस्कृत समाज निर्माण करायचा असेल तर अशा समाजाला समर्थ साहित्याची गरज असते. एखाद्या देशाच्या साहित्याचा ओघ ज्या दिशेने प्रवाहित होतो नेमका त्याच दिशेला त्या देशाचा विकास झाल्याचे दिसते. तुमच्या साहित्य विज्ञान असेल तर देशात शास्त्रज्ञ निर्माण होतील, खेळ असेल तर खेळाडू निर्माण होतील ,अंधश्रद्धा असेल तर अंधश्रद्धाळू माणसे निर्माण होतील. *कोणत्याही देशात क्रांती पैलवान करत नसतात तर विचारवंत करत असतात*. साहित्य शिवाय कुठलीही कुठलाही देश किंवा जनसमूह उन्नती करू शकत नाही.

*क्रांती बाबत भगतसिंग म्हणतात*
 “क्रांती म्हणजे अन्यायवर  आधारलेल्या प्रचलित समाजव्यवस्थेत आमूलाग्र परिवर्तन.”

 क्रांती फक्त परकीय शक्ती विरुद्धच नसते तर स्वकीयसुद्धा अन्याय करत असतील तर त्यांच्या विरुद्ध संघर्ष करून व्यवस्था परिवर्तन करणे म्हणजेच क्रांती असते.

फुकट कोणतीही गोष्ट मिळाली तर तिची किंमत कळत नसते. म्हणून क्रांतीसाठी 

*ध्येय,नेता आणि सर्वात महत्वाचे संपूर्ण जनता* सज्ज पाहिजे तरच ती क्रांती यशस्वी होत असते. क्रांतीसाठी जनजागृती, प्रबोधन महत्त्वाचे आहे.तोंडाची आकाशवाणी करा,गावोगावी जा, समाजमन जागृत करा, परिवर्तन निश्चितच होईल.

 *३.) मी नास्तिक म्हणजे बुद्धिप्रामाण्यवादी का आहे?*

    आपल्या पैकी अनेकांनी जो गैरसमज करून घेतला आहे, तो आस्तिक आणि नास्तिक याबाबत. आम्ही या संज्ञाबाबत समजून घेणे महत्वाचे आहे. प्राचीनकाळी थोर चिकित्सक तत्वज्ञ चार्वाक यांनी याबाबत विवेचन केलेले आहे.तसेच संस्कृतचे प्राध्यापक,थोर इतिहास संशोधक,प्राच्च विद्यापंडित डॉ. आ ह साळुंखे यांनी ही आस्तिक आणि नास्तिक  याबाबत सविस्तर माहिती दिलेली आहे. 

  “जो वेदांना, वर्णव्यवस्थेला, यज्ञाला, जातिव्यवस्थेला मानतो तो आस्तिक व जो हे सर्व नाकारतो तो नास्तिक, हा खरा अर्थ आहे.”

 यादृष्टीने आपण प्रत्येकाने स्वतःला तपासून घेणं गरजेचं आहे,असं मला वाटतं!

मी नास्तिक का आहे, या संदर्भाने एक पुस्तिका भगतसिंगांनी प्रसिद्ध केली आहे.

फाशीची शिक्षा सुनावली असतांना तुरुंगात  एका वृद्ध कैद्याने भगतसिंगांना धर्माचा अवलंब कर, असे सुचविले होते.तसे करायला त्यांनी नकार दिला. मी नास्तिक का आहे ? ही पुस्तिका त्यांनी फासावर जाण्याच्या काही दिवस आधी लिहिली.त्यांनी ती गुपचूपपणे आपल्या वडिलांकडे दिली. “द पिपल” या साप्ताहिकात जून 1931 मध्ये ती पुस्तिका प्रसिद्ध झालेली आहे. 1970 ला त्यांच्या वरील साहित्य भारत सरकारने प्रसिद्ध केलेले आहे. त्यातील भगतसिंग यांच्या काही ओळी आपल्या पुढे उद्धृत करण्याचा मी प्रयत्न करीत आहे.

…कठीण प्रसंगी देखील मी माझ्या तत्त्वांना चिकटून राहतो आणि त्याची माझ्यापुरती मला शहानिशा करून घ्यायची होती.बराच विचार केल्यानंतर मी निर्णय घेतला की कोणत्याही प्रकारे ईश्वरावर विश्वास ठेवणार नाही व त्याची प्रार्थनाही करणार नाही. मी तसे कधीच केले नाही. ही ती खरी कसोटीची वेळ होती आणि त्यातून मी यशस्वीपणे बाहेर पडलो.

 वादळाच्या व झंझावताच्या वेळी आपल्या पायावर उभे राहणे हा काही पोरखेळ नाही.
टीका व स्वतंत्रपणे विचार करणे हे क्रांतिकारका जवळ असणारे दोन अनिवार्य गुण आहेत. चार्वाक हा प्राचीन काळातील पुन्हा एक स्वतंत्र तत्त्वज्ञ आहे.प्राचीन काळातही त्यांने ईश्वराच्या अधिकाराला आव्हान दिले होते.

…आपल्या प्रगतीसाठी सज्ज असलेल्या प्रत्येकाने जुन्या श्रद्धेतील प्रत्येक पैलूवर टीका करायला हवी…प्रचलित श्रद्धेचा प्रत्येक कानाकोपरा यांने तर्काच्या आधारे शोधून काढायला हवा…

.. ..कारण विवेक हा त्याच्या जीवनाचा वाटाड्या आहे. पण निव्वळ श्रद्धा व अंधश्रद्धा या धोकादायक आहेत.त्या त्याच्या मेंदूला शैथील्य आणतात आणि माणसाला प्रतिगामी बनवतात.

… निसर्गातील घडामोडींना दिशा दाखवणारी व मार्गदर्शन करणारी कोणतीही सर्वश्रेष्ठ शक्ती अस्तित्वात नाही, याविषयी माझी खात्री पटली आहे.आमचा निसर्गावर विश्वास आहे आणि माणसाच्या सेवेसाठी निसर्गावर प्रभुत्व संपादन करणे, हे संपूर्ण पुरोगामी चळवळीचे ध्येय आहे. याला दिशा देण्यासाठी एखादी चैतन्यशक्ती निसर्गाच्या मागे नाही, हे आमचे तत्त्वज्ञान आहे... पण क्षणभर आपण त्यांना पूर्वजन्मीचे गुन्हेगार मानले तर, ईश्वराचे त्यांना ठोठावणाऱ्या शिक्षेचे स्वरूप काय आहे ? 

ईश्वर त्यांना गाय, मांजर, झाड, झुडूप किंवा पशु म्हणून जन्माला घालतो,असे तुम्ही म्हणता. 

अशा शिक्षेचे 84 लाख प्रकार सांगितले आहेत.. कोणतेतरी पाप केल्यामुळे पूर्वजन्मी आपण गाढव म्हणून जन्माला आलो होतो, असे सांगणारे किती माणसे तुम्हाला भेटले आहेत ?एकही नाही. तुमच्या पुराणातील दाखले देऊ नका. तुमच्या पुराणकथांचा परामर्श घ्यायला मला जराही सवड नाही.

.. धर्मोपदेशक व सत्ताधीश यांच्या युतीनेच तुरुंग,वधस्तंभ फटके मारण्याचा चाबूक व हे सिद्धांत जन्माला घातले आहेत…..जेव्हा एखादा माणूस पाप किंवा गुन्हा करतो तेव्हा तुमचा सर्वशक्तिमान ईश्वर त्याला त्यापासून का परावर्तन करत नाही ? असे मी विचारतो . त्याने युद्धपिपासू सत्ताधीशांना का ठार मारले नाही किंवा त्यांच्यातील ऊर्मी काळ काढून टाकावी टाकली नाही ? … ईश्वर कुठे आहे ? तो काय करत आहे ?मानव जातीला होणाऱ्या यातनांचा तो आनंद उपभोगत आहे ? तो निरो आहे,तो चंगीझखान आहे.त्याचा धिक्कार असो!
*४)अनुयायी की प्रतीयायी* आपण ठरवा !

    भगतसिंग यांच्या जीवन आणि चरित्र आणि त्यांचा संदेश आम्ही तरुणांनी आचरणात आणणे गरजेचे आहे. केवळ पोकळ घोषणाबाजीने त्यांनी सांगितलेले काम पूर्ण होणार नाही! त्यासाठी त्यांचा आदर्श सतत समोर ठेवावा लागेल. त्यानुसार कृतीविचार अंगीकृत करावे लागतील.त्यांनी लिहलेले त्यांचे साहित्य,पत्रे वाचावी लागतील. त्यांच्या कृतीविचाराना प्रचारक बनून ते समाजात रुजवावे लागतील तरच त्यांची जयंती साजरी झाली असे म्हणता येईल..!

✒️लेखक:-मा.रामेश्वर तिरमुखे(राज्यप्रभारी,सत्यशोधक वारकरी महासंघ,महाराष्ट्रल(मो:-9420705653)