तालुक्यातील जिव्हाळ्याच्या आष्टी उपसा सिंचन योजनेस जलसंपदामंत्री ना.पाटील यांचा हिरवा कंदील – आ.बाळासाहेब आजबे

27

✒️आष्टी : दि(प्रतिनिधी – सौ.सरस्वती लाड)

आष्टी(दि.1ऑक्टोबर):-पाटोदा,शिरूर मतदार संघातील जनतेच्या जिव्हाळ्याच्या असलेल्या अनेक प्रकल्पाबाबत व पाणी प्रश्नासंदर्भात आपण मागणी केलेल्या अनेक कामांना जलसंपदामंत्री नामदार जयंत पाटील यांनी सकारात्मक प्रतिसाद देत या सर्व कामाबाबत तातडीने सकारात्मक कार्यवाही सुरू करण्याच्या सूचना संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या आहेत.त्यामुळे मतदारसंघातील महत्त्वाचा पाणीप्रश्न सुटण्यास मदत होणार असल्याचे आमदार बाळासाहेब आजबे यांनी सांगितले.

पुढे बोलतांनाआ.आजबे म्हणाले की,महाराष्ट्र राज्याचे जलसंपदा मंत्री ना.जयंत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली व बीड जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार धनंजय मुंडे साहेब,जिल्हाधिकारी राधाबिनोद शर्मा,गोदावरी विकास मराठवाडा पाटबंधारे महामंडळाचे कार्यकारी संचालक किरण कुलकर्णी,मुख्य अभियंता जलसंपदा विभाग औरंगाबादचे विजय घोगरे यांच्या प्रमुख उपस्थितीत बीड येथे जलसंपदा विभागाची बैठक संपन्न झाली.त्यावेळी आपण जलसंपदा मंत्री नामदार जयंत पाटील यांच्याकडे मतदार संघातील विविध प्रश्न मांडले.त्यामध्ये कृष्णा मराठवाडा प्रकल्प अंतर्गत टप्पा क्रमांक ३ आष्टी उपसा सिंचन योजनेची पाईपलाईन निविदा प्रसिद्ध करून काम हाती घ्यावे,तालुक्यातील सर्व प्रकल्पाच्या कॅनॉलची दुरुस्ती विस्तार व सुधारणा कामास मंजुरी द्यावी.

शिरूर तालुक्यातील सिंदफणा मध्यम प्रकल्प या कामास सुधारित प्रशासकीय मान्यता देऊन काम पूर्ण करणे,आष्टी,पाटोदा,शिरूर तालुक्यातील १९६५ पूर्वीच्या धरणात मोठ्या प्रमाणात गाळ साचल्याने साचलेल्या गाळाच्या बदल्यात जुन्या जलसंपदा प्रकल्पाची उंची वाढण्याची कामे हाती घेण्यात यावीत,आष्टी तालुक्यातील सीना,कडी नदीवरील व पाटोदा तालुक्यातील मांजरा नदीवरील व शिरूर तालुक्यातील सिंदफणा नदी येथील केटीवेअरचे रूपांतर लातूर टाईप बॅरीगेजमध्ये करण्याच्या कामास प्रशासकीय मान्यता देण्यात यावी,मेहकरी धरणाच्या पुढील क्षेत्रात जाणाऱ्या पुंडी गावाजवळील पुलाची उंची वाढण्याची निविदा प्रसिद्ध करून मंजुरी देणे.

अशा मागण्या मांडत आपण प्राधान्याने सुधारित थेट पाइपलाइनद्वारे आष्टी उपसा सिंचन योजनेस मंजुरी द्यावी व खुंटेफळ साठवण तलावाचे काम सुरु करण्यास तात्काळ मंजुरी द्यावी तसेच खुंटेफळ व इतर गावचे भूसंपादन आणि पुनर्वसनाचा प्रश्न ही तात्काळ मार्गी लावण्याची आग्रही मागणी केली असता त्यास जलसंपदा मंत्री नामदार जयंत पाटील साहेब यांनी हिरवा कंदील दाखवत गोदावरी विकास मराठवाडा पाटबंधारे महामंडळ औरंगाबादचे कार्यकारी संचालक किरण कुलकर्णी व मुख्य अभियंता जलसंपदा विभाग औरंगाबादचे विजय घोगरे यांना तातडीने सकारात्मक कारवाईच्या सूचना दिल्या.

तसेच खुंटेफळ सह इतर गावचे भूसंपादन करुन पुनर्वसन करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी व मुख्य कार्यकारी अधिकारी यांना दिल्या असून या योजनेस निधी कमी पडू दिला जाणार नसल्याचेही नामदार जयंत पाटील यांनी प्रामुख्याने सांगितले ,त्यामुळे लवकरात लवकर आष्टी उपसा सिंचन योजनेचे थेट पाईप लाईनचे व खुंटेफळ साठवण तलावाचे काम सुरू होणार आहे.लवकरच आष्टी उपसा सिंचन योजना पूर्ण होऊन मराठवाड्याला हक्काचे १.६८ पाणी मिळणार असून मतदारसंघाचा कायमस्वरूपी पाण्याचा प्रश्न मिटणार आहे.या प्रकल्पामुळे ८१४७ हेक्टर क्षेत्र ओलिताखाली येणार असल्याचे आमदार बाळासाहेब आजबे यांनी शेवटी सांगितले.