पंडित दीनदयाळ पतसंस्थेच्या रोप्य महोत्सवा निमित्त डॉ.अशोक गांधी यांना पंडित दीनदयाळ जीवन गौरव पुरस्कार जाहीर

30

✒️आष्टी प्रतिनिधी(सौ.सरस्वती लाड)

आष्टी(दि.6ऑक्टोबर):-येथील पंडित दीनदयाल उपाध्याय बिगर शेती ग्रामीण सहकारी पतसंस्था मर्यादित आष्टी या संस्थेच्या २५ व्या रोप्य महोत्सवा निमित्त कडा येथील प्रथितयश वैद्यकीय व्यवसायिक गांधी हॉस्पिटलचे संचालक डॉ.अशोक पन्नालालजी गांधी यांना पंडित दीनदयाळ पतसंस्थेच्या वतीने पंडित दीनदयाळ जीवनगौरव पुरस्कार देऊन गौरवण्यात येणार आहे.

या विषयी सविस्तर वृत्त असे की,आष्टी येथील पंडित दीनदयाळ बिगर शेती ग्रामीण सहकारी पतसंस्था मर्यादित आष्टी या पतसंस्थेस पंचवीस वर्ष पूर्ण होत असून या वर्षात रौप्यमहोत्सवी वर्षामध्ये संस्थेद्वारा अनेक सामाजिक उपक्रम राबवण्यात येत आहेत.रौप्यमहोत्सवी वर्षाचे निमित्ताने यावर्षीपासून दरवर्षी सामाजिक सेवेमध्ये योगदान देणाऱ्या व्यक्तीस जीवन गौरव पुरस्कार देऊन गौरवण्यात येणार आहे.यावर्षी कडा येथील सेवाभावी वृत्तीने वैद्यकीय व्यवसाय करणारे डॉ.अशोक गांधी हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या संपर्कात उशीरा येऊनही प्रभावीपणे घडलेले स्वयंसेवक असून त्यांनी अनेक समाजोपयोगी उपक्रमात सक्रिय सहभाग घेतलेला आहे.

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ अंतर्गत जनकल्याण समिती द्वारे त्यांनी अनेक उपक्रम राबवले आहेत.सुरुवातीच्या काळात प्रत्येक गुरुवारी त्यांनी दुचाकीवर जाऊन दुर्गम भाग असलेल्या गंगादेवी येथे रुग्णांची सेवा मोफत केलेली आहे.स्त्री भ्रूण हत्या मध्ये बीड जिल्ह्याला काळीमा लागल्यामुळे अस्वस्थ झालेल्या डॉ.अशोक गांधी यांनी सन २०१३ पासून गांधी हॉस्पिटलमध्ये प्रसूत झालेल्या महिलेला कन्यारत्न प्राप्त झाल्यास श्री जन्माचे स्वागत म्हणून मोफत प्रसूति करत आहेत.आजपर्यंत २३८ प्रसूती मोफत केलेल्या आहेत.शैक्षणिक क्षेत्रामध्ये त्यांनी भरीव काम केले असून प्रसिद्ध शैक्षणिक संस्था अमोलक जैन या शिक्षण संस्थेचे सचिव म्हणून त्यांनी काही काळ काम पाहिले आहे.राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे तालुका संघचालक म्हणून देखील त्यांनी अनेक काळ काम केले आहे.

डॉ.अशोक गांधी यांनी १९७५ मध्ये एम.बी.बी.एस.ही पदवी प्राप्त केली असून तेव्हापासून आष्टी तालुक्यातील रुग्णांची ते मनोभावे सेवा करत आहेत.आरोग्यसेवा बरोबर त्यांनी शैक्षणिक,आध्यात्मिक आणि सामाजिक क्षेत्रांमधील भरीव काम केले असल्यामुळे त्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार असून अनेक मान्यवरांच्या उपस्थिती मध्ये रौप्य महोत्सव साजरा करण्यात येणार असून लवकरच कार्यक्रमाचे स्वरूप निश्चित होणार आहे.अशी माहिती संस्थेचे अध्यक्ष अॕडव्होकेट बाबूराव अनारसे यांनी दिली.संस्थेचे मानपत्र,सन्मानचिन्ह आणि पंचवीस हजार रुपये रोख रक्कम असे या पुरस्काराचे स्वरूप असेल अशी माहितीही संस्थेचे उपाध्यक्ष सुनील मेहेर यांनी दिली.