सुप्रसिद्ध लेखक,कवी राजेंद्र लाड यांना लोकशाहीर अण्णाभाऊ साठे साहित्यरत्न राज्यस्तरीय पुरस्कार जाहीर

98

✒️आष्टी प्रतिनिधी(सौ.सरस्वती लाड)

आष्टी(दि.8ऑक्टोबर):-जिल्हा परिषद कन्या प्रशाला आष्टी,जि.बीड येथे प्राथमिक पदविधर शिक्षक म्हणून कार्यरत असलेले राज्य पुरस्कार प्राप्त शिक्षक तथा सुप्रसिद्ध लेखक,कवी राजेंद्र शाहुराव लाड यांना साहित्यसम्राट अण्णाभाऊ साठे मानव विकास संस्था,फुले पिंपळगाव,ता.माजलगाव,जि.बीड या संस्थेचा लोकशाहीर अण्णाभाऊ साठे साहित्यरत्न राज्यस्तरीय पुरस्कार जाहीर झाला असून त्यासंदर्भात दि.७ आँक्टोबर २०२१ रोजी त्यांना निवडीबाबतचे निवडपत्र संस्थेच्या अध्यक्षा सौ.उषा गायकवाड व संयोजक तथा सचिव सुमंत गायकवाड यांनी पाठविले आहे.

राजेंद्र लाड हे अष्टपैलू व्यक्तीमत्व असून ते स्वतः दिव्यांग आहेत.त्यांनी स्वतःच्या दिव्यांगत्वावर मात करुन शैक्षणिक,सामाजिक,साहित्यिक व राष्ट्रीय क्षेत्रात मोठे योगदान दिलेले आहे.ते कन्या प्रशाला आष्टी येथे शिक्षक म्हणून कार्य करत असून त्यांच्या शैक्षणिक कार्याबद्दल त्यांना सन – २०१६ साली महाराष्ट्र शासनाचा राज्य व जि.प.बीड चा जिल्हा शिक्षक पुरस्कार एकाचवेळी मिळालेला असून सध्या ते शासनमान्य महाराष्ट्र राज्य दिव्यांग कर्मचारी संघटनेचे बीड जिल्हाध्यक्ष म्हणून काम करत आहेत.त्यांनी संघटनेमार्फत अनेक दिव्यांग सुशिक्षित बेरोजगार,दिव्यांग विद्यार्थी,दिव्यांग कर्मचारी व दिव्यांग जेष्ठ नागरिक यांना शासनाच्या सोई – सवलती मिळवून दिलेल्या आहेत.त्यांच्या या दिव्यांगाप्रती कार्यामुळेच त्यांना दिव्यांग मतदार नोंदणी विभाग,जिल्हाधिकारी कार्यालय बीड यांनी बीड जिल्हा राजदूत म्हणून नेमणूक केलेली असून तसेच ते दिव्यांग स्थानिक स्तर समिती,समाजकल्याण कार्यालय बीड चे सदस्य देखील आहेत.

आजतागायत त्यांनी वेगवेगळ्या मासिक,पाक्षिक,साप्ताहिक व दैनिकामधून विविध शैक्षणिक,सामाजिक,साहित्यिक व राष्ट्रीय विषयावर लेख लिहिलेले आहेत.तसेच त्यांच्या अनेक कविता वेगवेगळ्या वृत्तपत्रातून प्रसिद्ध झालेल्या आहेत.तसेच त्यांनी वेगवेगळ्या साहित्य संमेलनातही आपल्या कविंतेचा ठसा उमटविलेला आहे.याच साहित्याची नोंद घेवून साहित्यसम्राट अण्णाभाऊ साठे मानव विकास संस्था माजलगाव,जि.बीड या संस्थेच्या वतीने लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जन्मशताब्दी विशेषांक २०१९ – २० प्रकाशन सोहळा व जयंती निमित्त राज्यस्तरीय लोकशाहीर अण्णाभाऊ साठे साहित्यरत्न पुरस्कारासाठी संस्थेच्या निवड समितीने त्यांची निवड केली आहे.राजेंद्र लाड यांच्या निवडीबद्दल शैक्षणिक,सामाजिक,धार्मिक,राजकीय व साहित्यिक तसेच पत्रकार क्षेत्रातील मान्यवरांनी अभिनंदन केले आहे.