दिक्षाभूमी वरील धम्मचक्र अनुवर्तन सोहळ्यास घातलेली बंदी तात्काळ उठवा : ऑल इंडिया पँथर सेना

27

🔸जिल्हाधिकाऱ्यांना दिले निवेदन आंदोलनाचा इशारा

✒️सय्यद शब्बीर जागीरदार(विशेष प्रतिनिधी)

जिवती(दि.8ऑक्टोबर):- देशात मागील वर्षापासून कोरोना महामारी सुरु होती. त्या दरम्यान सर्व धार्मिक स्थळे वा दिक्षाभूमी वर होणाऱ्या धम्मचक्र अनुवर्तन सोहळ्यास सुद्धा बंदी घातली होती. ती परिस्थिती जाणून धम्मबांधवानी शासन प्रशासनास मदतीची भावना ठेवून कोणताही कार्यक्रम हाती घेतला नाही. पंरतु या वर्षी मात्र कोरोनाचे संक्रमण फार कमी आहे. त्यामुळे राज्याचे मुख्यमंत्री यांनी महाराष्ट्रात सर्व धर्माचे धार्मिक उत्सव व कार्यक्रम सोहळ्यास परवानगी दिली असून सर्व मंदिरे सुद्धा खुली केली आहेत. मात्र डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे क्रांती परिवर्तन स्थळ म्हणजेच दिक्षाभूमी येथे होणाऱ्या धम्मचक्र अनुवर्तन सोहळ्यास बंदी घातली आहे.

ही बाब निंदनीय असून बौद्ध अनुयायांत संतापाची लाट पसरली आहे. त्यामुळे सामाजिक भावना लक्षात घेऊन धम्मचक्र अनुवर्तन सोहळ्यास घातलेली बंदी तात्काळ उठवावी याकरिता जिल्हाधिकारी यांना ऑल इंडिया पँथर सेनेच्या वतीने निवेदन देण्यात आले आहे.डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी १९५६ साली नागपूर नंतर चंद्रपूर येथे लाखो अनुयायांना धम्मदिक्षा दिली. या ठिकाणातून धम्म परिवर्तन केले.

त्यामुळे जिल्ह्यातील लाखो भिम अनुयायांच्या या क्रांतीभुमी धम्म दिक्षा सोहळ्यात भावना जुळल्या आहेत. नवतरुणांना या सोहळ्याच्या माध्यमातून एक नवी उर्जा मिळते. त्यामुळे या सर्व बाबींचा विचार करून चंद्रपूर दिक्षाभूमी वर होणाऱ्या धम्मचक्र अनुवर्तन सोहळ्यास घातलेली बंदी तात्काळ उठवावी अन्यथा जिल्ह्यातील भिम सैनिकांना व बौद्ध अनुयायांना घेऊन ऑल इंडिया पँथर सेनेच्या वतीने तिव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा जिल्हाधिकारी यांना दिलेल्या निवेदनातून केला आहे.
निवेदन देतांना ऑल इंडिया पँथर सेनेचे जिल्हाध्यक्ष रुपेश निमसरकार, जिल्हा उपाध्यक्ष त्यागीभाई, जिल्हा युवा अध्यक्ष अजय झलके, जिल्हा सल्लागार संतोष डांगे, मार्गदर्शक सुरेश नारनवरे, भैय्याजी मानकर, आदी पँथर कार्यकर्ते उपस्थित होते.