मी मोठा कि तू मोठा करत भिमसागर प्रकल्पात घालू नका खोडा

27

भिमसागर प्रकल्प समीतीच्या सर्व सभासदांनी हाती घेतलेल्या पवित्र कार्य बद्दल आपण सर्वांचे मन पुर्वक अभिनंदन मित्रांनो मी सुरेश शालिग्राम हिवराळे एक अती सामान्य कार्यकर्तो आहे. माझ्या कार्योचे वर्णन वा गुणगाण करण्या इतपत मी मोठा नाही. पुढारी बनण्याची तर माझ्यात कोणतीच लायकी नाही. मी तर महामानव बोधिसत्व प. पु. विश्ववंदनीय डाँ.बाबासाहेब आंबेडकरांचा कट्टर भिमसैनिक आहे,अन्याय अत्याचाराच्या विरोधात परिणामाची पर्वा न करता लढण्याची हिंमत माझ्यात आहे,कारण तथागत भगवान गौतम बुद्ध आणि डाॅ बाबासाहेब आंबेडकर हेच माझे आयुष्याचे प्रेरणा स्थान व सर्वस्व होत.माझा अल्पसा परिचय देण्यामागचा हेतू म्हणजे भिमसागर प्रकल्प समीतीचे काही सदस्य आप-आपसा मध्येच मतभेद करून मी किती मोठा आहे.हे दाखविण्यात वेळ,बुद्धीखर्च करून समितीत फूट तर पाडत नाही नां?. म्हणूनच मी मोठा की तू मोठा करत भिमसागर प्रकल्पात खोडा तर घालत नाही नां म्हणून असे लिहासे वाटले.

माझी राष्ट्रीय नेत्यांसोबत कसे संबंध आहेत हे सांगण्याचा उहापोह करून भिमसागर प्रकल्प समीतीने उभारलेल्या लक्ष्यापासुन, ध्येयापासुन दुर जात असल्याचे दिसते.त्यांना हे सांगावासं वाटतं की, आपण एखाद्या ध्येयानं प्रेरीत होवुन एकमेकांस सहकार्य केले, तर यश आपल्यापासुन फार काळ दुर राहु शकत नाही. भिमसागर प्रकल्प समन्वय समीतीने हाती घेतलेले कार्य हे काही साधारण नाही, ते एक महान कार्य असून ती एक सामाजीक परीवर्तनाची नांदी आहे, इतिहासाच्या क्रांतीपर्वोची ही एक सुरूवात आहे. जगात कोणतीही क्रांती ही काही सहजा- सहजी घडत नाही. त्यासाठी जिद्धीने कष्ट,आत्मत्याग व बलिदानाची तयारी ठेवावी लागते. तेव्हाच क्रांतीचा जन्म होतो. आपला लढा हा मर्यादित न राहता त्याचे प्रयास करणे फारच जिकरीचे झाले आहे. आपले निश्चित ध्येय गाठायचे असेल तर सर्वप्रथम सर्वांनी संघटित होऊन एकमेकास सहकार्य करणे हे प्रत्येकाचे इति कर्तव्य आहे. त्यासाठी आपण प्राणपणाने लढले पाहिजे.

आपल्यातील अनेकांना मी पणा व अहंकाराची किड लागलेली असल्यामुळेच त्यांना वाटते की, माझ्या सारखा कोणीच नाही, मी जे करतो तेच योग्य असा माणूस स्वतःला पुढारी समजून समाजात वावरतो आणि सहज बोलून दाखवितो की, मीच अमुक- तमुक काम करत आहे. मी समाजासाठी खूप काही केले मी 20 ते 30 वर्षापासून समाजसेवा करीत आहो, पण आपल्या समाज खूपच बोगस आहे सात देत नाही. कुणालाही मोठं होवु देत नाही, समाजाची खेकडा वृत्ती आहे, मला सत्य पाहिजे पण समाजाला सत्य चालत नाही. हे पुढारी महाशय एवढ्यावरच न थांबता राष्ट्रीय ने त्यावरही ते आरोप प्रत्यारोप करून मीच कसा लायक व बाकी नालायक असे भासवतो. राष्ट्रीय नेत्यासोबत किंवा नट- नटी सोबत हा फोटो काढून घेतो व इतरांना माझ्या सोबत त्यांनी फोटो काढले असल्याचे भासवतो.एखादा राष्ट्रीय नेता गावात इतर कार्यक्रमासाठी आला असतो. हे भाऊ त्यांना लग्न मंडपाला किंवा घरातील इतर कार्यक्रमांना धावती भेट घेण्याची आग्रहाचे विनंती करतो. विनंतीला मान देऊन भेट दिली.की मग हे महाशय मी काय साधारण व्यक्ती आहे? माझ्या घरच्या कार्यक्रमांनाच भेट देण्यासाठी अमुक- ढमुक आले होते. असा आव आणून माझे तर राष्ट्रीय स्तरावर खूपच इज्जत आहे असा दिंडोरा पिटतो. अशा स्वयंघोषित पुढाऱ्यांबाबत लिहिणे गरजेचे होतं, कारण हेच लोक समाजाच्या कोणत्याही कार्यक्रमांमध्ये गटबाजी करून श्रेय लाटण्यासाठी वर्चस्वाची लढाई लढून सामाजिक ऐक्याला फार मोठे खिंडार पाडतात.तोच प्रकार मी मोठा कि तू मोठा भिमसागर प्रकल्पात घालू नका खोडा, असा होऊ नये.

अशा लोकांना कुंडारे म्हणजे काय व पुढारी कसा असावा? हे तरी माहित आहे का?धान्य निवडतांना आपण जसा खडे बाजूला फेकतो. त्याप्रमाणेच अशा स्वयंघोषित पुढाऱ्यांना पण बाजूला घेतले पाहिजे. घरोघरी निर्माण भाऊ पाहणाऱ्या असा स्वयंघोषित पुढाऱ्यांनी माझ्या पाच प्रश्नांची उत्तरे अवश्य द्यावीत. १) पुढारी भाऊ तुम्ही म्हणतात ना की मी समाजासाठी खूप काही केले, त्यापैकी काही कार्याचा ठोस पुरावा लेखा- झोका समाजासमोर ठेवाल का? उदाहरण आपण समाजासाठी आतापर्यंत किती व कोणकोणत्या सेवाभावी संस्था निर्माण केल्या? किती व कोणकोणत्या योजना समाजापर्यंत पोहोचविल्या? आपण किती शाळा, कॉलेज,वस्तीगृह, वाचनालय, ग्रंथालय, शैक्षणिक संस्था काढल्या?
२) पुढारी भाऊ आपण ज्या समाजाला सात देत नाही म्हणून बोगस म्हणतात त्या समाजातील किती व कोण कोणत्या अत्याचारित पीडित महिलांना शेतकऱ्यांना, कष्टकऱ्यांना, तुमच्या गावातील गावकऱ्यांना, न्याय मिळून देऊन अन्याय अत्याचारास पायबंध घातला? ३) पुढारी भाऊ तुम्हाला मोठे होवु ना देणाऱ्या खेकडा वृत्तीच्या समाजातील किती बेरोजगार तरुणांना आपण रोजगाराच्या संधी उपलब्ध करून दिल्यात? आपण किती आणि कोणकोणत्या गावात जाऊन जनजागृती सारखे कार्यक्रम राबवून तरुणांना संघटित करून समाज ऐक्य घडविले? ४) पुढारी भाऊ तुमचं वर्चस्व न मानणाऱ्या समाजाच्या न्याय व हक्कासाठी किती व कोणकोणते आंदोलने केली? किती चळवळी उभारळ्यात? किती सत्याग्रह केले? समाजाच्या न्याय व हक्का संबंधीचे विधेयक विधिमंडळात किती वेळा सादर केलेत? ५) पुढारी भाऊ आपल्याला खोटं तर अजिबात फोटो चालत नाही आपण फारच सत्यवादी आहात “मुसा वादा वेरमणी” आपण पालन हार, आपले समाज सेवा ही अतिशय प्रामाणिक निस्वार्थी अशीच आहे आपण श्रद्धा,शील,संपन्न, चारित्र्यवान आहात आपल्याकडून काया वाचा व मनाने ओव्या उभ्या आयुष्यात कोणतेच पाप घडले नसल्याचे सत्य सप्रमाण समाजासमोर ठेवाल का? पुढारी भाऊ वरील प्रश्नांची उत्तरे द्यावीत हीच आपल्याला हात जोडून विनंती आहे?
फक्त असं नका म्हणू की हे काम काय माझे आहे? ते नेत्यांचे आहे सरकारचे आहे? मी काय घरचा करोडपती आहे? की समाजासाठी शाळा,कॉलेज, वस्तीगृह, शैक्षणिक संस्था, वाचनालय, ग्रंथालय खोलू? आपलं व्यक्तिमत्व सर्व गुण संपन्न असेच आहे तर मग आपण खऱ्या अर्थाने पुढारी आहात तुम्ही गौरवास पात्र आहात. तुमचा यथोचित गौरव होणे न्यायोचित आहे आपल्या कार्यानुसार गाव रत्न, तालुका रत्न, जिल्हा रत्न, राज्य रत्न, भारतरत्न, यासारख्या बहुमानास आपण नक्कीच पात्र आहात. मग तुमच्या महान करायचा आलेख लेखाजोखा समाजासमोर ठेवा म्हणजे पात्रतेनुसार बहुमान मिळण्यासाठी भीमसागर प्रकल्प समन्वय समिती व सामाजिक संघटनाच्या माध्यमातून आपल्या बहुमानासाठी प्रयत्न करता येतील. या निमित्तानं मला हे सांगावसं वाटतं की आपण काही विषयात अध्ययन करून ज्ञानप्राप्ती करता येईल.

अनेक पदव्या मिळून आपल्याला गतिमान होता येईल,पण शीला शिवाय नीतिमान होता येणार नाही. हे सत्य आहे म्हणूनच डॉ.बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की, शिला शिवाय शिकले सवरलेले लोक निपजू लागले तर त्यांच्या “शिक्षणातच समाजाचा व राष्ट्रांचा नाश आहे”. शीला शिवाय शिक्षणाची किंमत केवळ शून्य आहे.फळाची अपेक्षा न करता केलेले कार्य माणसाला महान बनवीत असते. वर्चस्वाची व श्रेयाची लढाई लढता. आपल्या समाजाचा स्वाभिमान जागा राहून समाजाची मान नेहमी उंच राहील त्यासाठी प्राण पणाने लढणे हेच खरं भीम सैनिकांचे कर्तव्य आहे.समाजामध्ये समता, स्वतंत्रता, बंधुता, प्रस्तापित करून सर्वांना एकाच छायाछत्राखाली एकाच झेंड्याखाली आणून संघटित करणे व त्यांच्यावरील अन्याय अत्याचाराचे समूळ उच्चाटन करणे. हेच प्रत्येक पुढाऱ्यांचे परम कर्तव्य असले पाहिजे.तरच आपला कोणताही लढा सहज शक्य होईल.मग तो लढा जिगाव प्रकल्पाचा नामकरणाचा का असेना.म्हणूनच त्यात मी मोठा कि तू मोठा करत भिमसागर प्रकल्पात घालू नका खोडा,विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की “शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे.जो ते प्रशान करेल तो गुरगुरल्याशिवाय राहणार नाही”.

आपण बाबासाहेबांचे खरे भीमसैनिक आहात.ना तर मग सर्वांनी एकत्र येऊन आपल्या बाबांना साक्षी म्हणून घ्या.भीम प्रतिज्ञा की शिक्षण हे जर वाघिणीचे दूध आहे, तर ते मी स्वतः प्रशान करेल व माझ्या समाज बांधवांना प्रशान करावयास लावेल हेच माझ्या जीवनाचे अंतिम सत्य आहे.मग पहा सर्वत्र कसे भीम टायगर निर्माण होतात.एकाच डरकाळी एक ना अनेक लढे यशस्वी होऊन जिगाव प्रकल्पाचे रूपांतर भीमसागर प्रकल्पात होईल या इतिहासिक क्रांतीचे आपण साक्षी ठरणार. आपण विवेक,कर्तव्य, त्याग व महतप्रयास यांची सांगड घालून विशिष्ट ध्येयप्राप्तीसाठी झपाटून गेलो तर कोणतीच गोष्ट आपल्यासाठी अशक्य नाही.म्हणूनच मी मोठा कि तू मोठा करत भिमसागर प्रकल्पात खोडा घालू नये हे सर्वच पुढाऱ्यांना हात जोडून सांगणे आहे.

✒️लेखक:-सुरेश शालिग्राम हिवराळे(मु.पो. डीघी,तालुका नांदुरा,जिल्हा बुलढाणा)मो:-9527261559