माळशिरस तहसील कार्यालयावर ऊसतोड मजुरांचा ऐतिहासिक मोर्चा

26

🔹गटविकास अधिकाऱ्यांचे 108 गावातील ग्रामसेवकांना ऊसतोड मजुरांचे ओळ्खपत्र तात्काळ देण्याचे आदेश

✒️विशेष प्रतिनिधी(समाधान गायकवाड)

माळशिरस(दि.११आक्टोंबर):-माळशिरस तालुक्याच्या इतिहासात पहिल्यांदाच ऊसतोड मजुरांच्या न्यायहक्कांसाठी व ऊसतोड मजुरांना ओळखपत्र देऊन सोयी सुविधा पुरवाव्यात म्हणून नॅशनल दलित मुव्हमेंट फॉर जस्टीस (एन.डी.एम.जे) या संघटनेच्या वतीने माळशिरस तहसील कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला.हा ऐतिहासिक मोर्चा नॅशनल दलित मुव्हमेंट फॉर जस्टीस या संघटनेचे राज्य महासचिव ऍड.डॉ.केवल उके यांच्या आदेशाने आंबेडकरी चळवळीचे जेष्ठ नेते विकास दादा धाइंजे यांच्या मार्गदर्शनाखाली राज्य सचिव वैभव गिते यांच्या नेतृत्वात निघाला.मोर्चास पंचायत समिती कार्यालयापासून सुरवात होऊन छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून मोर्चा तहसील कार्यालयासमोर आल्यानंतर मोर्चाचे रूपांतर सभेत झाले.

नॅशनल दलित मुव्हमेंट फॉर जस्टीस चे राज्य सचिव वैभव गिते यांनी तालुका प्रशासनाला धारेवर धरून ऊसतोड मजूर ऊसतोडन्यासाठी जाण्याअगोदर त्यांना ओळखपत्र देण्यात यावीत अन्यथा जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढणार असल्याचा इशारा देऊन आंबेडकरी चळवळीत काम करणाऱ्या कार्यकर्त्यांनी ऊसतोड मजुरांना ओळ्खपत्र काढून देण्याच्या सूचना दिल्या.आंबेडकरी चळवळीचे जेष्ठ नेते विकास दादा धाइंजे यांनी ऊसतोड मजुरांच्या योजनां सोबतच असंघटित कामगारांच्या योजना शेवटच्या घटकापर्यंत पोचवण्याचा संदेश कार्यकर्त्यांना दिला.तहसीलदार व पंचायत समितीचे विस्तारअधिकारी यांनी ऊसतोड मजुरांचे 11 मागण्यांचे निवेदन स्वीकारून तात्काळ कार्यवाही करण्यात येईल असे आंदोलनकर्त्यांना सांगितले.

आंदोलनाची दखल घेऊन गटविकास अधिकारी पंचायत समिती यांनी तालुक्यातील सर्व ग्रामसेवक व ग्रामविस्तार अधिकारी यांना सर्व ऊसतोड कामगारांना ओळखपत्र तात्काळ देण्याच्या लेखी सूचना दिल्या.यावेळी सर्व जाती धर्माचे ऊसतोड मजूर व मुकादम उपस्थित होते.राजू शिंदे,भगवान भोसले, वैभव धाइंजे, महेश शिंदे,नाना गायकवाड,शाहीर झेंडे, संघर्ष सोरटे, भाऊ भागवत,डॉ.कुमार लोंढे,रोहित सोरटे, धनाजी शिवपालक,प्रमोद शिंदे यांनी मनोगत व्यक्त केले.मोठ्या प्रमाणावर ऊसतोड मजूर,ऊसतोड मजुरांचे मुकादम आणि वेगवेगळ्या राजकीय सामाजिक पक्षांचे कार्यकर्ते उपस्थित होते.छत्रपती शिवाजी महाराज,महात्मा जोतिबा फुले,राजर्षी शाहू महाराज,डॉ.बाबासाहेब आंबेडकर,साहित्यरत्न आण्णा भाऊ साठे,या महापुरुषांच्या घोषणांनी परिसर दुमदुमून गेला होता.