अशोक विजयादशमी- धम्मचक्र प्रवर्तन दिन!

32

(धम्मचक्र प्रवर्तन दिन विशेष)

बौद्ध बांधवांना उत्कट प्रतिक्षा असते ती या दरवर्षी १४ ऑक्टोबर रोजी येणार्‍या जगप्रसिद्ध लोकप्रिय धार्मिक उत्सवाची, ज्याचे मूळनाव ‘धम्मचक्र अनुवर्तन दिन’ असे आहे. त्यास धम्मचक्र प्रवर्तन दिन व धम्मचक्र अनुप्रवर्तन दिन असेही म्हणतात, ते समर्पकच आहेत. परंतु कोणी त्यास धम्मचक्र परिवर्तन दिन म्हणतात, ते योग व संयुक्तिक नाहीच! या लोकप्रिय उत्सवाविषयी थोडक्यात श्रीकृष्णदास (बापू) निरंकारी यांच्या लेखाद्वारे ही माहिती… संपादक.

इ.स.पू.तिसऱ्या शतकात ज्या दिवशी सम्राट अशोकांनी बौद्ध धम्माची दीक्षा घेतली होती, तो दिवस बौद्ध इतिहासात ‘अशोक विजयादशमी’ म्हणून साजरा केला जातो. विश्वसम्राट अशोकाने केलेली ही मोठी धम्मक्रांती होती आणि त्यामुळे बाबासाहेबांनी याच दिवशी धर्मांतर सोहळा करण्याचे ठरवले व दि.१४ ऑक्टोबर १९५६ रोजी नागपूरमध्ये आपल्या पाच लाख अनुयायांसोबत बौद्ध धर्म स्वीकारला. ती धम्मभूमी सध्या दीक्षाभूमी नावाने ओळखली जाते. डॉ.आंबेडकरांनी बौद्ध धर्म स्वीकारून भारतातून लुप्त झालेल्या बौद्ध धर्माचे पुनरुज्जीवन केले. धर्मचक्र अनुप्रवर्तन दिन हा भारतात साजरा केला जाणारा एक प्रमुख बौद्ध सण आहे. बौद्ध धर्मीयांद्वारे हा उत्सव दरवर्षी अशोक विजयादशमी आणि १४ ऑक्टोबर रोजी दीक्षाभूमी नागपूर येथे तसेच स्थानिक बौद्ध स्थळांवर साजरा केला जातो. महाराष्ट्रासह देशाच्या विविध भागातील लक्षावधी बौद्ध अनुयायी धम्मचक्र प्रवर्तनदिनी नागपूरला येतात. या उत्सवाची पार्श्वभूमी एक बौद्ध धर्मांतरण सोहळा आहे. अशोक विजयादशमीला दि.१४ ऑक्टोबर १९५६ रोजी दीक्षाभूमी नागपूर येथे विश्वरत्न महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्या अनुयायांसोबत नवयान बौद्ध धर्मात प्रवेश केला.

भारतभूमीत जवळपास लुप्त झालेल्या बौद्ध धम्माचे चक्र विश्वरत्न महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी गतिमान करत ‘धम्मचक्र प्रवर्तन’ केले. तेव्हापासून हा दिवस उत्सवरुपाने दरवर्षी साजरा केला जातो.ऐतिहासिक पार्श्वभूमीची जोड असल्यामुळे धम्मचक्र प्रवर्तन दिन दीक्षाभूमी नागपूर येथे व्यापक प्रमाणात साजरा केला जातो, ज्यात देशभरातून आलेले लक्षावधी बौद्ध अनुयायी सहभागी होतात. तसेच राज्यातील व देशातील विविध राजकीय नेतेसुद्धा या सोहळ्याला येत असतात. विदेशांतील बौद्ध भिक्खू, उपासक व अन्य राजकीय व्यक्तीसुद्धा उत्सवात सहभागी होतात. दि.२ ऑक्टोबर २००६ रोजी धम्मदीक्षेच्या सुवर्णमहोत्सवी सोहळ्याला देश-विदेशांतील १० लाखांपेक्षा अधिक अनुयायांची उपस्थिती होती. सन १९५७पासून धम्मचक्र प्रवर्तनाच्या प्रत्येक वर्धापन दिनाला दोन दिवस आधीच बौद्ध अनुयायी दीक्षाभूमीला येत असतात. तथापि, महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यात हा उत्सव साजरा करण्याचे केंद्र निर्माण झालेले आहे. दीक्षाभूमीत आलेले आंबेडकर अनुयायी नागपूर जिल्ह्यात बुद्धिस्ट सर्किटला सुद्धा भेटी देतात, ज्यात कामठीचे ड्रॅगन पॅलेस, बुद्धभूमी, नागलोक, चिचोलीचे डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्मृती साहित्य संग्रहालय आदी विविध ठिकाणे समाविष्ट होतात. धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या निमित्ताने दीक्षाभूमीवर दरवर्षी हजारो लोक धर्मांतर करून बौद्ध बनतात. सन २०१८मध्ये ६२व्या धम्मचक्र प्रवर्तन दिनी सुमारे बासष्ट हजार तर सन २०१९ मध्ये त्रेसष्टव्या धम्मचक्र प्रवर्तन दिनी ६७,५४३ अनुयायांनी दीक्षाभूमी येथे बौद्ध धर्म स्वीकारला होता.

नागपूरच्या धम्मदीक्षा सोहळ्याचा कार्यक्रम होऊन अनेक अनुयायी बुलढाणा, वाशीम व मराठवाडा भागात परत जाताना अकोला रेल्वे स्टेशनवर मुक्कामी असत, कारण त्याकाळी फार दळणवळणाची साधने नव्हती. या अनुयायांना राहण्याची सोय होईल, या प्राथमिक उद्देशाने सन १९८६ साली पहिला धम्मचक्र प्रवर्तन दिनाचा कार्यक्रम अशोक वाटिकेसमोरील मैदानावर पोस्ट ऑफीसमागे संपन्न झाला. नागपूरनंतर संपूर्ण महाराष्ट्रात साजरा होणारा हा भव्य सोहळा ठरला आहे. वसंत देसाई स्टेडीयमवर अनेक वर्षे हा कार्यक्रम झाला. मात्र आता मागील १० वर्षापेक्षा अधिक कालावधीपासून अकोला क्रिकेट क्लब मैदानावर हा सोहळा संपन्न होत आहे. सन १९८७पासून अकोला जिल्ह्यात धम्मचक्र प्रवर्तन दिन सोहळा सार्वजनिक पातळीवर सुरु आहे. या सोहळ्याचे नेतृत्व दरवर्षी डॉ.प्रकाश आंबेडकर हे करत असतात. या दिवशी विशाल मिरवणूक, आखाडे, लेझीम पथके, आकर्षक देखावे, विविध झाक्या, हजारों बौद्धांचा सहभाग असतो. भारतीय बौद्ध महासभेचे शिस्तबद्ध आयोजन आणि जाहीर सभा असा दरवर्षीचा शिरस्ता असतो.
चंद्रपूर येथील दीक्षाभूमी हे सुद्धा एक ऐतिहासिक पार्श्वभूमी असलेले ठिकाण आहे. नागपूर येथे धर्मांतर केलेल्यांनी दि.१६ ऑक्टोबर १९५६ रोजी त्यांनी चंद्रपूर येथेही धर्मांतर सोहळा घडवून आणला, ज्यात सुमारे दोन ते तीन लक्ष लोकांनी बौद्ध धम्म स्वीकारला होता. त्यामुळे दरवर्षी येथेही धम्मचक्र अनुवर्तन दिन मोठ्या प्रमाणावर साजरा केला जातो, ज्यात देशभरातून आलेले लक्षावधी बौद्धबांधव सहभागी होतात.औरंगाबाद शहरात डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाजवळ असलेल्या औरंगाबाद लेणी परिसरात धम्मचक्र प्रवर्तन दिन साजरा केला जातो.

येथे शहरासह औरंगाबाद जिल्ह्यातील बौद्ध अनुयायी मोठ्या संख्येने येत असतात. धम्म ध्वजारोहण, अन्नदान, रक्तदान, समुपदेशन, पुस्तक प्रदर्शन यासारखे विविध उपक्रम राबवले जातात. धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त बौद्ध लेणी परिसरात विविध कार्यक्रमसुद्धा घेण्यात येतात. सकाळी धम्म ध्वजारोहण कार्यक्रम होतो. त्यानंतर भिक्खुंच्या उपस्थितीत महापरित्राण पाठ आणि दुपारी भोजनदान करण्यात येतो. देश-विदेशातील भिक्खू संघ धम्म प्रवचन देतात. त्या सोबतच २२ प्रतिज्ञांचे पठण घेतात. तसेच इच्छुक उपासकांना बौद्ध धम्माची दीक्षा देण्यात येते. शहरातील लोकप्रतिनिधी व अधिकारी अभिवादन कार्यक्रमाला उपस्थिती असतात. बुद्धभीम गीतांचे कार्यक्रम सादर होतात. रक्तदान शिबिर राबवण्यात येतात. दिवसभरात लाखो धम्म उपासक-उपासिकांची अभिवादनासाठी गर्दी होते. विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो, नमो बुद्धाय आणि जय भीम आदींचा जयघोष केला जातो. या दिनानिमित्त विद्यापीठ आणि बौद्ध लेणी परिसरात पुस्तकांचे अनेक स्टॉल थाटण्यात येतात.

!! पुरोगामी संदेश परिवारातर्फे सर्व बंधुभगिनींना धम्मचक्र अनुप्रवर्तन दिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा !!

✒️संकलन व शब्दबद्ध:-श्रीकृष्णदास (बापू) निरंकारी.द्वारा- वंद.राष्ट्रसंत तुकडोजी महाराज चौकाजवळ,मु. रामनगर वॉर्ड क्र.२०, गडचिरोली.जी. गडचिरोली, मोबा. ७७७५०४१०८६.
इमेल- krishnadas.nirankari@gmail.com