भारतात सर्वप्रथम बुद्धवंदना संगीतबद्ध कर्ते!

31

[कृष्णाजी गणेश फुलंब्रीकर स्मृतिदिनी विशेष]

जे पुणे भारत गायन समाजाचे अध्यक्ष व सात भागांचे सरकारमान्य रागसंग्रहमाला लेखक, सुलभ संगीत व्याकरण पद्धतीचे निर्माते, स्वतंत्र संगीतरचना करणारे, अनवट राग, जोड राग व बंदीशींचे निर्माणकर्ते, राष्ट्रगीताकरिता सांगीतिक लढा उभारणारे होते. ज्यांनी भारतात प्रथम बुद्ध वंदना संगीतबद्ध केली, ते होते कृष्णाजी गणेश फुलंब्रीकर ऊर्फ मास्टर वा मास्तर कृष्णराव. ते हिंदुस्तानी संगीत पद्धतीतील गायक, मराठी संगीत नाटकांमधील संगीतकार आणि गायक-अभिनेतेही होते. गायनाचार्य भास्करबुवा बखल्यांचे ते शिष्य होते. त्यांची टोपणनावे मास्तर कृष्णराव, मास्तर कृष्णा, कृष्णा मास्तर किंवा मास्तर अशी होती. त्यांच्या पुण्यस्मरणार्थ श्री.कृष्णकुमार गोविंदा निकोडे गुरुजींचा हा विशेष लेख… संपादक.

मास्टर कृष्णरावांना करवीर व संकेश्वर पीठाचे शंकराचार्य डॉ.कुर्तकोटी यांचे हस्ते संगीत कलानिधी ही पदवी प्रदान, पद्मभूषण पुरस्कार भारत सरकार, संगीत नाटक अकादमी फेलोशिप, बालगंधर्व सुवर्ण पदक, विष्णुदास भावे सुवर्ण पदक देऊन गौरविण्यात आले. पुणे येथील बालगंधर्व रंगमंदिरात त्यांचे स्मरणार्थ पुतळा उभारण्यात आला आहे. जालना येथे एका नाट्यगृहाला त्यांचे नाव देण्यात आले आहे. पुणे भारत गायन समाजातर्फे दरवर्षी त्यांचा जन्मदिन व पुण्यतिथी साजरी केली जाते. मसापतर्फे दर विषम वर्षी एका संगीतविषयक समीक्षकास वा ग्रंथकारास ‘संगीत कलानिधी मास्टर कृष्णराव फुलंब्रीकर स्मृती पुरस्कार’ देण्यात येतो. महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या वतीने ‘मास्टर कृष्णराव फुलंब्रीकर ग्रंथकार पुरस्कार २०१६’ हा विशेष जाहीर केलेला पुरस्कार सरदार आबासाहेब मुजुमदार यांच्यावरील ’स्वरसंगत सरदार’ या ग्रंथास देण्यात आला आहे.मास्तर कृष्णरावांचा जन्म दि.२० जानेवरी १८९८ रोजी पुणे जिल्ह्यात आळंदी येथे आजोळी झाला. ते मूळचे फुलंब्रीचे होते. त्यांचे कुटुंबीय देशस्थ यजुर्वेदी ब्राम्हण होते. त्यांचे वडील गणेशपंत हे वेदपठण करणारे ज्ञानी पंडित होते.

त्यांच्या निधनानंतर गरिबीच्या परिस्थितीत वयाच्या अवघ्या सहाव्या वर्षी त्यांनी नाट्यकला प्रवर्तक मंडळी या नाटक मंडळीत बाल गायकनटाचे काम सुरू केले. त्यांचे प्रकृतीमान नाजूक होते. आवाजातील गोडी व लवचीकपणांमुळे त्यांना काम मिळाले होते. ते संत सखू या नाटकात विठोबाची भूमिका करत असत. याच नाटक मंडळीत त्यांना नाटकातील गाण्यांसाठी सवाई गंधर्वांचे मार्गदर्शन लाभले. त्यांच्या नाटकाच्या फिरत्या दौऱ्याने सवाई गंधर्वांना योग्य प्रकारे शास्त्रोक्त गायनाचे धडे देता येत नव्हते. संगीत शारदा नाटकात कृष्णरावांची भूमिका बघून व गायन ऐकून भास्करबुवा फार खूष होते. इ.स.१९१०मध्ये मास्टर कृष्णरावांनी पंडित भास्करबुवा बखले यांचे शिष्यत्व स्वीकारले. स्वतः सवाई गंधर्वांनी त्यांना बुवांकडे सोपवले होते.आपल्या गुरूंच्या आग्रहास्तव मास्टर कृष्णरावांनी गंधर्व नाटक मंडळींत प्रवेश केला. ते बाल गंधर्वांबरोबर मुख्य भूमिका करत असत. या दरम्यान त्यांनी संगीत शारदा, संगीत सौभद्र, एकच प्याला यांसारख्या अनेक संगीत नाटकांत काही पुरुष- गायकनट भूमिका आणि बऱ्याच स्त्री- गायकनट भूमिकाही केल्या. गुरूंच्या निधनानंतर गंधर्व मंडळींच्या नाटकांसाठी संगीत रचना करण्याचे काम मास्तरांकडे आले. सावित्री, मेनका, आशा-निराशा, नंदकुमार, विधीलिखित, अमृतसिद्धी, संगीत कान्होपात्रा यांसारख्या नाटकांना संगीत देताना ते त्यातील प्रमुख अभिनेत्यांना संगीत तालीम देत असत. बाल गंधर्वही त्यांना गुरुस्थानी मानत असत.

नंतरच्या काळात त्यांनी नाट्य निकेतनसाठी केलेल्या संगीत रचनांमुळे मराठी नाटकांमधील संगीताला एक वेगळी दिशा मिळाली. त्यांनी रचलेली कुलवधू, एक होता म्हातारा, कोणे एके काळी यांमधील गाणी त्यांतील भाव, गेयता व सुमधुरतेसाठी वाखाणली गेली. संगीत जलशांचे कार्यक्रम करण्यासाठी त्यांनी इ.स.१९२२ ते १९५२ दरम्यान भारतभर सातत्याने दौरे केले. त्यांच्या आवाजातील लवचीकता, माधुर्य व आकर्षकपणा यांचा प्रभाव जनमानसावर लगेच पडत असे. त्यांच्या कार्यक्रमांना सर्वसामान्यांसह रसिक, दर्दी श्रोत्यांची विशेष पसंती व उपस्थिती असे. ते दुर्मिळ आणि लोकप्रिय रागांबरोबरच ठुमरी, नाट्यगीत, भजन व चित्रपटगीतेही प्रभावीपणे सादर करत असत. तसेच नव्या शक्यता पडताळून पाहणे, नवे प्रयोग करणे ही त्यांची खासियत होती. त्यांनी रचलेले झिंजोटी रागातील सामूहिकरीत्या गाता येण्यासारखे ‘वंदे मातरम्’ वाहवा मिळवून गेले. प्रसन्न, उठावदार व प्रभावी गायन शैलीने ते श्रोत्यांना मंत्रमुग्ध करत असत. त्यांनी गायलेल्या गाण्यांची व राग संगीताची ७८आरपीएम ध्वनिमुद्रणेही प्रकाशित केली गेली. त्यांनी धर्मात्मा, वहाँ, गोपाळकृष्ण, माणूस, अमरज्योती, शेजारी यांसारख्या चित्रपटांनाही संगीत दिले. त्यांनी संगीत दिलेल्या प्रभात कंपनी निर्मित या व इतर अनेक चित्रपटांतील गाणी खुप गाजली. त्यांनी एकूण १९ चित्रपटांना संगीत दिले. त्यात अत्रे फिल्म्सच्या गाजलेल्या वसंतसेना चित्रपटाचा समावेश आहे. तसेच माणिक चित्रसंस्थेच्या कीचकवध चित्रपटाचा समावेश आहे. त्यांनी भक्तीचा मळा व मेरी अमानत या चित्रपटांत भूमिकाही केल्या.

अखेरच्या कालावधीत त्यांनी बंदिशी व नाट्यगीतांच्या सुरावटींसह रचना असलेली १९ पुस्तके प्रकाशित केली. संगीत रागदारीवरील गायन शिक्षणाबद्दलच्या पुस्तकाचे इ.स. १९४० ते १९७१ या काळात लिहिलेले रागसंग्रहमाला नामक सात खंड त्यात समाविष्ट आहेत. त्यास भारत सरकारची मान्यता लाभलेली आहे. वंदे मातरम् हे गीत बॅन्डवर वाजवता येत नाही, या सबबीखाली राष्ट्रगीत केले नाही. याचे त्यांना फार वाईट वाटले. ते अनेकानेक चाली लावून त्यातल्या काही बॅन्डवर वाजवता येतात, हे दाखवण्यासाठी त्यांनी स्वतंत्र भारताचे तत्कालिन पंतप्रधान पंडित नेहरूजींची भेट घेतली. त्यांच्यासमोर संसदेत प्रात्यक्षिके देऊन त्यांना पटवून देण्याचा प्रयत्‍न केला. नेहरूजींनी आधीच ‘जन-गण-मन’ हे राष्ट्रगीत म्हणून निश्चित केले असल्याने मास्टरजींची सर्व मेहनत फुकट गेली. परंतु वंदे मातरमला पूर्णपणे न वगळता भारत सरकारतर्फे राष्ट्रीय गीत म्हणून अधिकृत दर्जा देण्यात आला. या घटनेनंतर त्यांनी संगीतबद्ध केलेल्या वंदे मातरमची रेकॉर्ड विविध शाळा-महाविद्यालये, अनेक वैयक्तिक व सार्वजनिक संस्था वगैरे ठिकाणी कित्येक वर्षे वाजवली गेली. वीणा चिटको या त्यांच्या कन्येने काही काळ संगीतकार म्हणून कारकीर्द गाजवली.

त्या मराठी भावगीत विश्वातील पहिल्या स्त्री संगीतकार म्हणून ओळखल्या जातात. मधुसूदन कानेटकर, सरस्वती राणे, हरिभाऊ देशपांडे, ए.पी. नारायणगांवकर, बापूराव अष्टेकर, दत्तोपंत भोपे, पित्रे बुवा, डॉ.पाबळकर, जयमाला शिलेदार, मोहन कर्वे, माणिकराव ठाकूरदास, सुरेश हळदणकर, आर.एन.करकरे, राम मराठे, योगिनी जोगळेकर, अंजनीबाई कळगुटकर,जयश्री शांताराम, रामभाऊ भावे, सुहास दातार, सुधाकर जोशी, रवींद्र जोशी, वीणा चिटको हे मास्तर कृष्णरावांच्या शिष्यगणांपैकी काही शिष्य होत.विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या विनंतीवरून त्यांनी संपूर्ण बुद्ध वंदना सांगीतिक मीटरमध्ये बसवली व बाबासाहेबांनी त्याची ध्वनिमुद्रिका काढली. याकरिता त्यांना पाली भाषेचा अभ्यास करावा लागला. आकाशवाणीच्या सल्लागार समितीचे सदस्य व आकाशवाणीवरील प्रमुख संगीत रचनाकार म्हणून देखील मास्तरांनी भरीव कामगिरी केली. पुणे येथे दि.२० ऑक्टोबर १९७४ रोजी त्यांचे स्वतःच्या निवासस्थानी वृद्धापकाळाने निधन झाले.

!! पुरोगामी संदेश परिवारातर्फे मास्टरजींना व त्यांच्या अनेक चिरतरूण स्मृतींना विनम्र अभिवादन !!


✒️शब्दांकन:-श्री. कृष्णकुमार गोविंदा निकोडे गुरुजी.
(म.रा. डि.शै. दै.रयतेचा कैवारीचे लेख विभाग प्रमुख व जिल्हा प्रतिनिधी तथा भारतीय थोर पुरुषांच्या इतिहासाचे गाढे अभ्यासक.)मु. पिसेवडधा, ता. आरमोरी.जि. गडचिरोली. मोबा. ७७७५०४१०८६.
इमेल- nikodekrishnakumar@gmail.co