गरीबांची दिवाळी

26

दिवाळी आली म्हणजे आनंदी आनंदच व एक वेगळी मजा.घरात गोडधोड पदार्थ,नवी – नवी खरेदी.फटाक्यांची खूप सारी धूम व मस्ती पण हे सर्व करतांना आर्थिक बजेट मात्र संभाळा.मित्रांनो माझ्याकडून ह्या दिवाळीला आपणा सर्वांना काय भेट द्यावी हा मोठा प्रश्न आहे.तुम्ही सर्व माझी जीवाभावाची माणसं.अस काय देवू की,ज्याने तुम्हां सर्वाना कळेल की,मी ही तुमच्या वर खूप खूप प्रेम करतो म्हणून पैसे देवून भेटवस्तू विकत घेवून तुम्हला द्याव तर ती तुमची पैश्यात तुलना केल्यासारखे होईल.म्हणून मित्रांनो तुम्हाला ह्या दिवाळीला एक आगळी – वेगळी भेट देतोय.ती म्हणजे गरीबांची दिवाळी.या भेटीमध्ये तुम्हांला खूप आशीर्वाद मिळतील तसेच खूप आनंद,सुख आणि समाधान वाटेल असा हा प्रकल्प तुम्हाला भेट देतोय.

मित्रांनो आपण सर्व मध्यम वर्गीय असून या महागाईच्या दुनियेत दिवाळी पार पडत असते.परंतु आपण आजपर्यंत या अगोदर “गरीबांची दिवाळी” कधी बघितली आहे का? ज्या कुटुंबात दिवसभर कष्ट करून जो पैसा मिळविला जातो आणि त्या पैश्याने रात्रीची चूल पेटवली जाते अश्या कुटुंबाची दिवाळी कशी असेल? ज्या कुटुंबात एक वेळा चूल पेटत नसेल त्यांची दिवाळी कशी असेल? या सर्व गोष्टींचा विचार आपण या अगोदर केलाच नसेल मित्रांनो.अशा कुटुंबातील कुटुंबप्रमुखाला दिवाळी म्हणजे मोठे संकट उभे होत असेल.मुलांना कपडे,घरात गोड पदार्थ,फटके तर दूरच आणि त्यात अशी ही मोठी महागाई.मग मला सांगा कशी असेल गरीबांची दिवाळी.म्हणून मित्रांनो आपण ज्यांना कोणाला शक्य होईल त्यंनी परिस्थिती नुसार या वेळेस अस एक कुटुंब शोधू या आणि त्या कुटुंबात जावून आपल्या घरी बनवलेल्या पदार्था पैकी थोडे पदार्थ त्यांना देवू,शक्य होतं असेल तर त्या कुटुंबातील एखाद्या लहान मुलास कपडे घेवू.आपण एक ड्रेस कमी घेवू परंतु ज्याच्या अंगावर कपडे नाहीत त्यांना कपडे घेवू आणि त्या कुटुंबासाठी थोडा आपला किंमती वेळ देवू.जेवढे शक्य होईल तिथपर्यंत हा प्रयत्न करू या.

मित्रांनो संपूर्ण भारतातील एक कुटुंब एक घर असा हा प्रकल्प जरी हाती घेतला तरी माझ्या माहितीनुसार गरीबांची दिवाळी आपल्या सोबत व आपल्या सारखीच होणार.मित्रांनो,हा आनंद खूप वेगळा म्हणजे साक्षात ईश्वराचे आशीर्वाद असणार आहेत.यामुळे हे वर्षच नाही तर येणार प्रत्येक वर्ष व येणारी प्रत्येक दिवाळी सुखी,समाधानी असेल हा माझा आत्मविश्वास सांगतोय….चला तर मग एक घास गरीबांना भरवू या…..!!!
त्यांची रोजच दिवाळी असते,असे शब्द अनेकदा आपण पैसेवाल्या श्रीमंत वर्गाच्या बाबतीत ऐकत असतो.ती शब्दरचना उपरोधिक असली,तरी त्यातच दिवाळी शब्दाचा खरा अर्थ सामावलेला आहे.ज्यांना रोजच दोन वेळा पोटाची आग विझवताना तारांबळ होत असते,त्यांच्यासाठी नित्याच्या गरजांची पुर्ती करण्यातच आयुष्य़ खर्ची पडत असते.मग अशा लोकांना ऐश आराम किंवा चैनीचा विचारही करणे महाग असते.सुख समाधानाच्या सुविधा किंवा साधनांबद्दल त्या गरीब वर्गामध्ये आकर्षण मोठे असते,तरी अशी साधने किंवा वस्तु आपल्याला परवडणार्‍या नाहीत,अशीच एक पक्की धारणा त्या सामान्यजनांच्या मनात रुजलेली असते.

सहाजिकच असा सुखवस्तूपणा म्हणजेच दिवाळी,असे तो वर्ग मानत असतो.म्हणूनच कुणा श्रीमंताची खर्चिक जीवनशैली बघितली मग तो गरीब म्हणतो,त्यांचे काय,त्यांची तर रोजच दिवाळी असते.थोडक्यात दिवाळी म्हणजे आपल्या खिश्याकडे किंवा उत्पन्नाकडे कानाडोळा करून आपापल्या पातळीनुसार उधळपट्टी करण्याचा मोसम.आकर्षण असलेल्या व अशक्य वाटणार्‍या सुखाच्या पुर्तीसाठी उचललेले पाऊल,म्हणून त्याला दिवाळी संबोधले जाते.म्हणून तर सामान्य माणूस त्या दिवाळीची आतुरतेने प्रतिक्षा करीत असतो.अर्थात उधळपट्टी करण्याइतके पैसे त्याच्यापाशी नसतात वा त्यला तितके पैसे मिळण्याचीही शक्यता नसते.पण तरीही थोडा धोका पत्करून किंवा धाडस करून माणूस आपल्या आवाक्याबाहेर वाटणारा आनंद भोगू पहातो,ती असते दिवाळी.अशी की सर्व दु;ख वा समस्यांचा विसर पडून साजरा केलेला विमुक्त आनंद.दिवाळी खरी त्यांच्यासाठी वर्षातून एकदाच येते.तिची महत्ता त्यांनाच कळत असते,कारण त्यांच्यासाठी रोजच दिवाळी नसते.

कुठलाही सण,उत्सव हा एकप्रकारे विरंगुळा असतो.नित्यजीवनातील गांजलेपणातून थोडी सुटका किंवा उसंत काढण्याचा प्रयास,म्हणजे सण असतो.दिवाळी तर वर्षभर प्रतिक्षा केलेला सण असतो.कारण त्या कालखंडात अधिक खर्च व मौज करण्यासाठी माणसे आधीपासून तयारी करीत असतात.सगळ्या गोष्टी व पैशाची जमवाजमव करीत असतात.स्वप्नातला आनंद उपभोगण्याची अतीव इच्छाच माणसाला दिवाळीबद्दल उत्सुक बनवित असते.सहाजिकच प्रत्येकाची दिवाळी वेगवेगळी असते.कुणा पैसेवाल्याची दिवाळी तसे बघितल्यास अधिकच कटकटीची असते.कारण त्याला सुबत्तेमुळे बहुतेक सुखे,सुविधा उपलब्ध झालेल्या असतात.त्यामुळेच अशा वस्तु वा साधनांमुळे मिळणार्‍या आनंदाला श्रीमंत माणूस पारखा झालेला असतो.उलट ज्याच्यापाशी पैशाचा तुटवडा असतो,त्याच्यासाठी चैनीच्या वस्तू म्हणजेच स्वप्न असते.

सहाजिकच अशा वस्तू संपादन करणे,हेच एक स्वप्न असते.पैसेवाल्यांसाठी सहज खरेदी करता येणारी वस्तु सामान्य गरीबासाठी अनमोल असले.म्हणून त्या वस्तुच्या खरेदीतही त्याला दिवाळी अनुभवता येते.त्यासाठी त्याला पैशाचे नियोजन,बचत करावी लागत असते.ते स्वप्न साकार करण्यासाठीची जमवाजमव व केलेली जुळवाजुळव,प्रत्यक्ष दिवाळी साजरी होण्याच्या आनंदापेक्षाही अधिक उत्सुकतेची म्हणून कौतुकाची असते.त्यासाठीचे प्रयास,केलेला विचार व स्वप्न साकारण्याची अतीव इच्छाच;सुखाची जाणिव असते.तितका दिवाळीचा आनंद आधीपासून सुरू होतो आणि दिवाळी संपल्यावरही टिकून रहातो.म्हणूनच कितीही कष्टाची वाटली तरी खरी दिवाळी गरीबाची असते.कारण त्यातून त्याला स्वप्नपुर्तीचा आनंद मिळवता येत असतो.

साध्यासाध्या गोष्टी व वस्तुमधून त्या गरीबाला मिळवता येणारा दिवाळीचा आनंद श्रीमंत पैसेवाल्याला मिळवता येत नाही.कुणाला असे बोलणेच चमत्कारीक वाटेल.पण वास्तवात तीच स्थिती आहे.श्रीमंताला किंवा पैसेवाल्यांना आपल्या आनंद सुखापेक्षा दुसर्‍या कुणासाठी तरी कष्ट उपसावे लागत असतात.अन्य कुणापेक्षा आपल्याकडे काही अजोड आहे,हे दाखवण्यासाठी पैसेवाल्यांना उत्सव सणाच्या निमित्ताने काही वेगळे करावे लागत असते.त्यातून त्यांना इतरांना खिजवायचे असते.आपले वेगळेपण दाखवण्याची खटपट करावी लागत असते.तसेच काही दुसर्‍याकडे असले,मग आपण खरेदी केले वा मिळवले,त्याचाही आनंद असे पैसेवाले उपभोगू शकत नाहीत.थोडक्यात त्यांचा आनंद स्वत:साठीचा असण्यापेक्षा दुसर्‍या कोणाला काही तरी दाखवण्यासाठी वा दुस‍र्‍याला खिजवण्यासाठीच असतो.उलट सामान्य माणसाची स्थिती असते.त्याला आपण आपल्याला अलभ्य दुर्लभ्य वाटणारे काही तरी साध्य केले वा मिळवल्याचा निखळ व्यक्तीगत आनंद उपभोगता येतो.कारण त्यासाठी त्याने नियोजन जुळवाजुळव करून ते उद्दीष्ट गाठलेले असते.आपण आयुष्यात कुठला महत्वाचा टप्पा गाठल्याचे समाधान त्याला आनंदी करीत असते.

तितकेच नाही,तर जे काही घेतले मिळवले,त्याच्या उपयोगात त्याचा आनंद वृद्धींगतच होत जातो.म्हणूनच कुणा पैसेवाल्या श्रीमंताला किरकोळ वाटणार्‍या साध्या गोष्टीतही गरीबाची दिवाळी दडलेली असते.म्हणूनच दिवाळी मनापासून गरीबच साजरी करू शकतो.कारण दिवाळी हा प्रकाशाचा व आनंदाचा सण आहे.आपले जीवन प्रकाशमान झाल्याच्या अनुभुतीचा सण आहे.ज्याला तो पल्ला गाठता येतो,तोच खरी दिवाळी साजरी करू शकतो.दिवाळी खरी व त्यांचीच असते,ज्यांच्या रोजच्या आयुष्यात दिवाळी नसते.अशी दिवाळी तोच आनंद घेऊन प्रत्येकाच्या आयुष्यात यावी व साजरी केली जावी.
“सांग ना आई,दिवाळी काय असते ? आपल्याच घरी दिवाळी का नाही..?” ….लहाणश्या सोनू ने आईला विचारलं.सोनूचे शब्द ऐकताच राधाबाईचे डोळे पानावले.सोनूला उत्तर तरी काय द्यावं राधाबाईला कळेना.कारण गोड –

धोड,पुरणपोळी,चकल्या,चिवडा,
मीठाई,नवी कपडे,फटाके ह्या साऱ्याच्या जमावात येणारी दिवाळी राधाबाईने कधी पहिलीच नव्हती.सोनूने हट्ट धरला, “आई सांग ना ग दिवाळी काय असते.?” सोनूला सांगावं तरी काय हे राधाबाईला सुचत नव्हते.राधाबाईने सोनूला सांगितलं.बाळा,अमावसेचा काळोख दूर व्हाव म्हणुन लोक दिवे लावतात,हीच ती दिवाळी..! पण येवढ्या वाचून सोनूचे समाधान होणार नव्हते.परत सोनूने राधाबाईला प्रश्न विचारायला सुरुवात केली.आई,माझे सर्व मित्र नवीन कापड घालतात,पुरणपोळी पण खातात.मग मलाच का ग जुनी कापड ? माझे मित्र मला हिणवतात,कुणी माझ्याबरोबर खेळत सुद्धा नाही,मला म्हणतात की,तु भिकारी आहेस,घाणेरडे कापड घालतोस.पण आई,माझ्या कडे तर एकच ड्रेस आहे ना ग ? अपेक्षित असलेल्या सोनूला राधाबाई समज घालण्याचा प्रयत्न करत होती,”बाळा आपण गरीब आहोत ना म्हणुन ते तुला हिणवतात.” येव्हढ्यात सोनू भूकेच्या जाणिवेणे राधाबाईला म्हणतो,”आई, मला पुरणपोळी करुन देना ग.” पण साध भाकरीच पीट घरात नसलेल्या राधाबाईने पुरणपोळी कुठून करावी..? सोनू हट्ट करू लागतो,राधाबाई त्याला सांगण्याचा प्रयत करू लागते, “बाळा नाही रे आपल्याकडे पैसे.सोन्या,जेव्हा आपल्याकडे पैसे येतील ना बाबा,तर मी माझ्या सोनू साठी कपडे घेईन.पुरणपोळी करीन… ” सोनू राधाबाईच्या तोंडाकडे केवीलवाणे बघतच असतो.

पण निसर्गाची किमया न्यारी म्हणताना ना ते अगदी बरोबरच आहे,आकाशात उडत असताना एका कावळ्याच्या चोचीतुन योगायोगाने पुरणपोळीचा तुकडा सोनू समोर पडतो.सोनू पुरणपोळीचा तुकडा उचलून आवडीने खायला लागतो.ते पाहून राधाबाईचे अश्रू अनावर होतात आणि ती सोनूच्या मुखाकडे बघतच राहते.आपल्या आजुबाजुला गरीबांची दिवाळी बघा,या गोष्टीपेक्षा फार काही वेगळी नसतेच..! आपल्या छोट्याशा नकळत केलेल्या सहकार्याने जर का त्यांच्या ओठावर हास्य फुलत असेल,तर दिवाळीनिमित्त का होईना नक्की मदत करा…खरचं आई शपथ जेवढी जमेल तेवढी मदत गरीबांना कराच….यामुळे आपणांस नक्कीच ईश्वराचे आर्शिवाद मिळतील.शेवटी सर्वांना दिवाळीच्या मनापासून हार्दिक शुभेच्छा….!!!

✒️राजेंद्र लाड (शिक्षक)आष्टी,जि.बीड(मो.९४२३१७०८८५)