पोलीस कर्मचाऱ्याला कंटाळून पुण्यात महिला पोलिसाची आत्महत्या!

31

✒️पुणे प्रतिनिधी(चक्रधर मेश्राम)

पुणे(दि.13 नोव्हेंबर):-वसई पोलिस ठाण्यामधील पोलीस कर्मचाऱ्याच्या त्रासाला कंटाळून एका 26 वर्षीय महिला पोलीस कर्मचाऱ्याने आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. संबंधित महिलेने पुण्याच्या दौंड तालुक्यातील देलवडी गावच्या राहत्या घरी गळफास लावून आत्महत्या केली. दीपाली बापूराव कदम असे आत्महत्या केलेल्या महिला पोलीस कर्मचाऱ्याचे नाव आहे. यासंदर्भात तिच्या भावाने यवत पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यानंतर वाल्मिक आहिरे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संबंधित महिलेने आत्महत्येपूर्वी तिने भावाला पोलीस कर्मचारी त्रास देत असल्याचे मेसेज केले होते. या घटनेमुळे पोलीस दलात मोठी खळबळ उडाली आहे.

वाल्मिक आहिरे हा पालघर पोलीस ठाण्यात पोलीस नाईक म्हणून कार्यरत आहे. मृत दीपालीच्या भावाने यवत पोलीस स्टेशनमध्ये फिर्याद दिली आहे. त्यानुसार, आरोपी वाल्मिक आहिरे विरोधात कलम 306,504,506 नुसार यवत पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.दीपाली ही वसई येथील पोलीस स्टेशनमध्ये पोलीस शिपाई म्हणून कार्यरत होती. तिचे लग्न ठरले असताना देखील या पोलीस कर्मचाऱ्याने मानसिक त्रास देऊन तिचे लग्नही मोडले होते. त्यामुळे या झालेल्या त्रासाला कंटाळून आत्महत्या केली असल्याची फिर्याद आत्महत्या करणाऱ्या महिला पोलिस कर्मचाऱ्यांच्या भावाने दिली आहे.

त्यामुळे आता याप्रकरणात काय कारवाई होणार, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.आरोपी विवाहित, फोन करुन वारंवार त्रास द्यायचा दीपाली या वसई येथील पोलीस स्टेशनमध्ये शिपाई म्हणून कार्यरत होती. दीड महिन्यापूर्वी तिचे लग्न भोसरी येथील तरुणाशी ठरले होते. दरम्यान आरोपी वाल्मिक गजानन आहिरे हा दिपालीला वारंवार फोन करून मानसिक त्रास देत होता. लग्न जमल्यानंतर सासरच्या मंडळींना आरोपी वाल्मिक आहिरे याने फोन करून जीवे मारण्याची धमकी दिली होती. धक्कादायक म्हणजे, आरोपी हा विवाहित होता. तरीही दीपालीला वारंवार त्रास देत होता. दीपालीच्या भावाने त्याची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. पण, त्याने त्यालाही दमबाजी करून जीवे मारण्याची धमकी दिली होती.