लस नाही तर, गेवराईत प्रवेश बंद

28

✒️गेवराई प्रतिनिधी(नवनाथ आडे)मो:-9075913114

गेवराई(दि.26नोव्हेंबर):-कोरोनाला हद्दपार करण्यासाठी कोरोना प्रतिबंधात्मक लस हा एकमेव उपाय उपलब्ध आहे. त्यामुळे 100 टक्के लसीकरण करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. त्यासाठी आष्टी शहरातून जाणार्‍या प्रवाशांना थांबवून लस टोचून पुढे प्रवेश दिला जात आहे.लसीकरणासाठी आरोग्य विभागाने कंबर कसली असून आष्टी ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. राहुल टेकाडे रस्त्यावर उतरुन पोलिस प्रशासन व हंबर्डे महाविद्याल-यातील एनएसएसचे विद्यार्थी यांच्या मदतीने ये जा करणा-या प्रवाशांचे लसीकरण सुरू होते.दरम्यान, गेवराई शहरामध्येही लसीविना प्रवेश बंद करण्यात आला आहे.

यासाठी गेवराई शहराबाहेर जातेगाव रोड, मोंढा नाका येथे नाकाबंदी करण्यात आली आहे. याठिकाणी प्रशासनाच्या वतीने तहसीलदार सचिन खाडे, डीवायएसपी स्वप्नील राठोड यांच्यासह प्रशासनाचे अधिकारी, कर्मचार्‍यांनी रस्त्यावर उतरून शहरात येणार्‍यांची तपासणी करत पहिला डोस असलेल्या नागरिकांनाच प्रवेश दिला.ज्यांच्याकडे सर्टिफिकेट नाही त्यांना प्रवेश नाकारला.

कोरोनाविरुद्धच्या लढ्यात नागरिकांच्या व्यापक आरोग्य हितासाठी आष्टी तालुका आरोग्य विभागाने कठोर पाऊल उचलले आहेत.आष्टी शहरातून जाणार्‍या प्रत्येक प्रवाशांचे लसीकरण केल्याचे प्रमाणपत्र दाखवावे, अन्यथा लसीकरण करून घ्यावे तरच पुढे प्रवेश दिला जात आहे. किमान एकतरी डोस दिल्यानंतरच प्रवेश दिला जात आहे.