संविधानाने भारतीयांना सन्मानाने जगण्याचा अधिकार दिला*- विकास कुंभारे

54

🔹कोलाम गुड्यावर संविधान दिन आणि विर शामादादा कोलाम जयंती साजरी

✒️सय्यद शब्बीर जागीरदार(विशेष प्रतिनिधी)

जिवती(दि.27नोव्हेंबर):- महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधानाच्या माध्यमातून सर्वांना स्वाभिमानाने आणि सन्मानाने जगण्याचा अधिकार बहाल केला आहे आणि प्रगतीची समान संधी दिली आहे. मात्र व्यवस्थेत बसलेल्या काही संधीसाधू लोकांमुळे समाजातील अनेक घटक त्या मौलिक अधिकारांपासून वंचित आहे. अशा तळागाळातल्या घटकांपर्यंत बाबासाहेबांचे विचार पोहोचविणे व समाज जागृती करणे यासाठी कोलाम विकास फाऊंडेशन सदैव कार्यरत राहिल व दुर्गम अशा माणिकगड पहाडावरील आदिम कोलामांच्या जिवनातील अंधार दूर करण्याचा प्रयत्न करेल, असे भावोद्गार कोलाम विकास फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष विकास कुंभारे यांनी काढले.

जिवती तालुक्यातील सितागुडा या कोलाम वस्तीत संस्थे व्दारा चालविल्या जाणा-या विर शामादादा कोलाम वाचनालय-अभ्यासकेंद्र येथे भारतीय संविधान दिन व विर शामादादा कोलाम यांची जयंती साजरी करण्यात आली. याप्रसंगी गाव पाटील भिमराव मडावी, ग्रामपंचायत सदस्य बापूराव आत्राम, केंद्र संचालिका कर्णिबाई आत्राम, मारू आत्राम, सुनिता कुंभारे आदि मान्यवर उपस्थित होते.गुलामगिरीच्या काळात विर शामादादा कोलाम यांनी जंगलातील आदिवासींसाठी मोठा संघर्ष केला व कोलामांच्या जिवनातील अंधार दूर करण्याचा प्रयत्न केला.

त्यांच्या कार्याची आठवण म्हणून कोलाम समुदायांनी संपूर्ण समुदायाच्या विकासासाठी प्रयत्न करत राहणे व नव्या पिढी पुढे नवे आदर्श निर्माण करणे गरजेचे आहे, असे मत गाव पाटील भिमराव मडावी यांनी मांडले.या वेळी डॉ बाबासाहेब आंबेडकर व विर शामादादा कोलाम यांच्या प्रतिमांना अभिवादन करण्यात आले. महाराष्ट्र राज्य महसूल कर्मचारी संघटनेतर्फे पाठविण्यात आलेल्या गणवेशाचे विद्यार्थ्यांमध्ये वितरण करण्यात आले. विशेष बाब म्हणजे यावेळी अभ्यासकेंद्रातील स्क्रीन प्रोजेक्टर च्या माध्यमातून ‘जयभीम’ हा हिंदी चित्रपट दाखविण्यात आला. यावेळी कार्यक्रमाला गावकऱ्यांनी मोठी गर्दी केली होती.