शिक्षकभरती घोटाळ्याची आयोग नेमून चौकशी करा: सामाजिक कार्यकर्त्यांची मागणी

27

✒️पुणे(पुरोगामी न्यूज नेटवर्क)

पुणे(दि.31डिसेंबर):-राज्यात शिक्षक भरती बंद असताना हजारो शिक्षकांची नेमणूक २०१२पूर्वी झालेली दाखवून  अधिकाऱ्यांनी लाच घेऊन नेमणुका दिल्या. विनाअनुदानित वरून अनुदानित वर नेमणुका देत असाच भ्रष्टाचार केला. या शिक्षक भरती घोटाळ्याची  न्यायाधीशांमार्फत चौकशी आयोग स्थापन करून चौकशी करावी अशी मागणी राज्याचे शिक्षण आयुक्त व माध्यमिक शिक्षण संचालक पालकर यांच्याकडे राज्यातील  सामाजिक कार्यकर्त्यांनी केली.

TET पास करण्याचेही पैसे व त्यातून सुटका करून नेमणूक देण्याचेही पैसे असे दुहेरी भ्रष्टाचार राज्याच्या जिल्ह्याजिल्ह्यात घडल्यामुळे त्याची व्याप्ती बघता आता चौकशी आयोगाची गरज असून २०१२ ते २१ या काळातील सर्व नेमणुका तपासण्याची गरज आहे याबाबत सरकारने श्वेतपत्रिका प्रसिद्ध करून समाजासमोर वास्तव मांडावे अशी मागणी या कार्यकर्त्यांनी केली.

या शिष्टमंडळात शिक्षण क्षेत्रातील कार्यकर्ते हेरंब कुलकर्णी एड.असीम सरोदे,आम आदमी पक्षाचे मुकुंद किर्दत,सिसकॉम संस्थेचे अध्यक्ष राजेंद्र धारणकर व वैशाली बाफना,राष्ट्र सेवा दलाचे विलास किरोते, कार्यकर्ते संजय दाभाडे,सुरेश साबळे,प्रकाश टेके,विद्यानंद नायक,सतीश यादव व अनेक कार्यकर्ते सहभागी झाले होते.त्यांनी दिलेल्या निवेदनात २०१२पूर्वी शिक्षकांच्या नेमणुका दाखवून खोटे रेकॉर्ड कसे तयार केले या तपशिलासह या शिक्षकांचे पगार आणि पगारातील फरकसुद्धा काढून शासनाची कोट्यवधी रुपयांची फसवणूक केली आहे.

विनाअनुदानित शिक्षक आत्महत्या करत असताना त्यांची नेमणूक अनुदानित तुकड्यांवर करण्याऐवजी पैसे घेऊन शिक्षकांच्या नेमणुका करण्यात आल्या. अल्पसंख्यांक शाळांमधील भरती ही अशाच प्रकारची संशयास्पद आहे हे सारे बघता आता राज्य सरकारने श्वेतपत्रिका प्रसिद्ध करून या घोटाळ्याची न्यायालयीन चौकशी करावी अशी आग्रही मागणी कार्यकर्त्यांनी केली.