सोबत मरताही नाही आलं, नियतीनं केलं कायमचं वेगळं; प्रेमीयुगुलासोबत घडलं आक्रीत

38

🔸गेवराई तालुक्यातील घटना

✒️नवनाथ आडे(जिल्हा प्रतिनिधी बीड)मो:-9075913114

बीड(दि.19जानेवारी):- जिल्ह्याच्या गेवराई तालुक्यातील भेंड बुद्रुक याठिकाणी एक हृदय पिळवटून टाकणारी घटना समोर आली आहे. सोबत जगता येत नाही म्हणून सोबत मरण्यासाठी गेलेल्या प्रेमीयुगुलासोबत विपरीत घडलं आहे. गळफास घेऊन आत्महत्या करत असताना, दोर तुटल्याने प्रेयसीचा जीव वाचला आहे. तर प्रियकर तरुणाचा मात्र मृत्यू झाला आहे. ही धक्कादायक घटना उघडकीस येताच परिसरात खळबळ उडाली आहे. या घटनेची माहिती तलवाडा पोलीस ठाण्यात देण्यात आली आहे.

या घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहेत. जयपाल लक्ष्मण वाव्हळ असं आत्महत्या केलेल्या 27 वर्षीय युवकाचं नाव आहे. तो गेवराई तालुक्यातील भेंड बुद्रुक येथील रहिवासी होता. मृत जयपाल याचं मागील काही काळापासून कल्याण येथील एका 30 वर्षीय विवाहित महिलेसोबत प्रेमसंबंध सुरू होते.

फेसबुकवरून ओळख झाल्यानंतर, त्यांच्यात प्रेम फुललं होतं. यानंतर त्यांनी प्रत्यक्षात एकमेकांच्या भेटीगाठी घेतल्या. मागील बऱ्याच दिवसांपासून त्यांचं हे गुपचूप प्रेम प्रकरण सुरू होतं.
पण विवाहित महिलेचं आपल्या गावाकडे सारखं येणं जाणं वाढल्याने त्यांच्या प्रेमाची कुणकुण प्रेयसीच्या पतीला लागली.

यातच दोन दिवसांपूर्वी संबंधित विवाहित महिला भेंड बुद्रुक येथे आली होती. दरम्यान तिच्या पतीने दोघांच्या विरोधात पोलिसांत फिर्याद दाखल करण्याची धमकी दिली. त्यामुळे घाबरलेल्या प्रियकर आणि विवाहित प्रेयसीनं सोबत जगता नाही आलं म्हणून काय झालं? सोबत मरू असं म्हणत मृत जयपालच्या राहत्या घरात गळफास लावून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला.पण दोर तुटल्याने विवाहित प्रेयसी वाचली. पण यामध्ये जयपालचा मृत्यू झाला आहे. ही धक्कादायक घटना उघडकीस येताच परिसरात खळबळ उडाली आहे. सोमवारी (17 जानेवारी) पहाटे घरातील आडूला या प्रेमी युगुलानं गळफास घेतला असल्याच गावकऱ्यांनी पाहिलं.यानंतर त्यांनी फोनवरून घटनेची माहिती तलवाडा पोलिसांना दिली. पोलिसांनी घटनास्थळी दाखल होतं घटनास्थळाचा पंचनामा केला आहे. या घटनेची नोंद केली असून या घटनेचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रताप नवघरे यांच्या मार्गदर्शनाखाली एम . डी . कुवारे करत आहेत.