१० महिन्यानंतरचे नागपूर- मुंबई विमान भाडे १०हजार८०० रूपये..!

31

🔹क्रेडीट शेल’मुळे मोजावे लागणार चार पट भाडे

🔸लॉकडाऊनपुर्वी तिकीट काढल्यामुळे फसगत झाल्याची ५० प्रवाशांची भावना

✒️नागपुर(पुरोगामी संदेश नेटवर्क)

नागपूर(25 जून):- लॉकडाऊन पूर्वी खरेदी केलेल्या तिकिटांचे पैसे विमान कंपन्यांनी Credit Shell मधे ठेऊन घेतले. हे पैसे प्रवाशांनी पुन्हा वापरतो म्हटले तर नागपूरहून मुंबई करिता चक्क १०हजार८००/- रूपये एका प्रवाशाला मोजावे लागणार आहेत. त्यातीलच एक अनुभव नागपूरचे हरिहर पांडे यांचेसह ५० प्रवाशांना आला आहे.
लॉकडाऊनपूर्वी जुलै महिन्यातील GoAir चे नागपूर ते मुंबई १३,४,७५०/- रूपयांत ५० ग्रुप तिकीट बुक केले होते. कोरोनामुळे प्रवास टाळून पूर्ण परतावा मिळणे संदर्भात वारंवार विनंती केली असता पैसे परत करण्यास टाळाटाळ करीत आहे. त्यातच १३,४,७५०/- या रक्कमेचा Credit Shell तयार करून दिला. आणि ही रक्कम लगेच वापरा, नाहीतर Forfeited होईल असे सांगण्यात आले. रक्कम भविष्यातील बुकींगसाठी उपयोगी यावी, म्हणून १० महिण्यांनी (२ मे २०२१) प्रवास करायचा विचार केल्यास तेव्हा भाडे तब्बल प्रति प्रवासी १०८००/- रूपये म्हणजेच ५० प्रवाशांना ५४००००/- लागणार आहेत. इतके महाग भाडे आतापासून का घ्यावे, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
‘क्रेडीट शेल’मधे पैसे जमा असल्यामुळे ५० प्रवाशांना आपल्याशिवाय पर्याय उपलब्ध नाही, याची जाणीव GoAir ला आहे. मुद्दामहून कोंडी करण्याचा प्रयत्न होत असल्याबद्दल ५० प्रवाशांमध्ये नाराजी आहे. इच्छा नसतानाही पुढील वर्षीच्या तिकीटा काढण्याचा विचार करावा लागला. त्या तिकीटा कमी भाड्यात मिळेल अशी अपेक्षा असताना मात्र, तब्बल चारपट भाडे (१०८००/- रूपये प्रति व्यक्ती) आकारलेले दिसते. हरिहर पांडे यांच्या माहितीप्रमाणे आजपासून १० महिण्यानंतरच्या तिकीटा २५००/- रूपयांत सहज मिळतात. जमा रक्कम पद्धतशीरपणे हडपण्याचा हा प्रकार असून ‘क्रेडीट शेल’च्या नावावर गोरखधंदा सुरू असल्याचा आरोप करीत GoAir च्या भूमिकेबद्दल संताप व्यक्त केला.
भविष्यात गरज नसताना ग्राहकांवर विमानप्रवास थोपविणे, रद्द होत असलेल्या तिकीटांचे पैसे प्रवाशांच्या इच्छेविरुद्ध वर्षभर बिनव्याजी वापरणे, पुन्हा प्रवासाची सक्ती करणे, अशाप्रकारे प्रवाशांची आर्थिक कोंडी करून त्यांची लूबाडणुक करणे, हे उचित नसल्याचे सांगत पांडे यांनी ग्राहकांच्या पैशांची खुलेआम लूट थांबविणे गरजेचे असल्याचे स्पष्ट केले. तर आम्हाला ‘क्रेडीट शेल’ची गरज नसून आमचे पूर्ण पैसे परत द्यावे, अशी मागणी ५० प्रवाशांनी केली आहे.
कोविड १९ मुळे प्रत्येकाला चांगले -वाईट दिवस बघायला मिळत आहेत. या संकटकालीन परिस्थितीतही GoAir प्रवाशांच्या सुविधेचा विचार न करता, स्वतःच्याच फायद्याचा विचार करताना दिसते. चिंताग्रस्तकाळात अशाप्रकारे व्यवहार करणे क्लेशदायक असून सरकारने लक्ष देणे गरजेचे आहे. अशाप्रकारे होणाऱ्या आर्थिक लुबाडणुकीची दखल नागरी हवाई वाहतूक मंत्रालय महासंचालनालयाने घेणे गरजेचे आहे. विमान कंपन्यांनी स्वतःच्या फायद्यासोबत प्रवाशांचेही हित जोपासावे असे आदेश DGCA ने यांना द्यावेत. प्रवाशांना त्वरीत परतावा मिळावा, असा आदेश सरकारने काढावा अशीही मागणी हरिहर पांडे यांनी केली आहे.


(वरील प्रकरण समजून घेन्याकरिता मा.हरिहर पांडे, नागपुर(मो:-9623802020) यांचेशी संपर्क साधू शकता.)