भ्रष्टाचारास संरक्षण म्हणजे गैरव्यवहारास वाव देणे ठरते

26

नागपूर येथील डॉ बाबासाहेब आंबेडकर समता प्रतिष्ठान संस्थेतील भ्रष्टाचार उघड होऊनही अजूनही संबंधितांवर काहीच कार्यवाही झाली नाही.

2. समता प्रतिष्ठान मधील गैर व्यवहार-भ्रष्टाचार बाबत वरिष्ठ अधिकाऱ्यांची चौकशी SIT एस आय टी मार्फत करण्याची घोषणा मंत्री सामाजिक न्याय यांनी अधिवेशनात -मार्च 2021 मध्ये – सभागृहात केली होती. दि 3 मार्च 2021 च्या सामना वृत्तपत्रात तसेच समाज माध्यमात, इतर ही वृत्तपत्रात याविषयीची बातमी प्रसिद्ध झाली होती.

3. यानंतर, यासंदर्भात, संविधान फौंडेशन चे वतीने आम्ही दि 21 एप्रिल2021 ला पत्र पाठवून मान. मंत्री सामाजिक न्याय यांना विनंती केली होती की घोषणा केल्यानुसार, एस आय टी ची स्थापना करावी व निःपक्षपाती पणे चौकशी करून दोषींना शिक्षा करावी. अजूनही, एस आय टी स्थापन झाली व चौकशी सुरू केली असे ऐकवीत नाही किंवा समाज माध्यमात कोणतीही बातमी आली नाही. वर्ष झाले म्हणून मंत्री महोदय यांना आम्ही पुन्हा या माध्यमातून आठवण करून देत आहोत की एस आय टी करा आणि कृपया चौकशी पूर्ण करा.

4. विधिमंडळ अधिवेशनात मार्च 2021 ला सभागृहात मंत्री म्हणाले होते की 3 कोटी 67 लक्ष रुपयांचा गैरव्यवहार लक्षात आल्यामुळे काहींवर कार्यवाही करण्यात आली . सभागृहातील भाषण व घोषणा ऐकावे. मात्र निर्णय प्रकियेतील कोनाविरुद्ध काहीच कार्यवाही सुरू झाली नाही. मंत्री म्हणाले होते की समता प्रतिष्ठान मध्ये 14 कोटीचा गैरव्यवहार पुढे येईल अशी शक्यता वर्तवून एस आय टि नेमण्यात येईल अशी घोषणा सभागृहात केली होती.

5. काय झाले एस आय टी चे? कुठे थांबली ही चौकशी ?कोणी थांबविली ? सामाजिक न्याय विभागाचे प्रधान सचिव, आयुक्त समाज कल्याण व महासंचालक बार्टी या तीन अधिकाऱ्यांनी चौकशी केली होती .त्याचे प्राथमिक अहवालावर अधिवेशनात घोषणा झाली अशी माहिती आहे. या तीन अधिकारी यांचा अंतिम अहवाल विभागाकडे आला असणार. काय आहे या अहवालात? जाहीर झाले पाहिजे. पारदर्शक काम होईल. अहवाल आला नसेल तर का आला नाही ते ही विभागाने सांगितले पाहिजे. कोणी थांबविला अहवाल? खाजगीत बोलताना अधिकारी सांगतात की भ्रष्टाचार झाला पण चौकशी करून सत्य सांगण्याची हिम्मत का करीत नाही?. 125व्या जयंती मधील चौकशी 2016 पासून प्रलंबित आहे. अजून किती वर्षे ठेवणार? सत्य कधीपर्यंत लपविले जाईल ? आणि कशासाठी?कधीतरी समोर येईलच.

6. मंत्री महोदय यांनी अधिवेशनात स्वतः सभागृहात घोषणा केली होती की जवळपास 14 कोटींचा गैरव्यवहार-भ्रष्टाचार आहे. तेव्हा जोपर्यंत एस आय टी ची चौकशी पूर्ण होत नाही तोपर्यंत कोणत्याही संस्थेला थकीत निधी देऊ नये .नागपुरात अशी चर्चा सुरू झाली आहे की सर्व फाइल्स परत आल्यात आणि निधी वाटप होणार. असे झाले तर पुन्हा गैरव्यवहार आणि भ्रष्टाचाराला वाव मिळेल. सामाजिक न्यायाचे विभागात न्यायाचे काम व्हावे व तसे होताना दिसले ही पाहिजे. तेव्हा, चौकशी पूर्ण होईपर्यंत , गैरव्यवहारात गुंतलेल्या संबंधित कोणत्याही संस्थेला किंवा व्यक्तीला निधी देऊ नये, पैसे देऊ नये. चौकशी प्रलंबित असताना निधी देणे अनैतिक ठरेल. निधी देण्यास आमचा विरोध यासाठी आहे. पुन्हा असे की जर समता प्रतिष्ठान मध्ये गैरव्यवहार -भ्रष्टाचार झालाच नसेल तर अधिवेशनात केलेल्या घोषणेमुळे सामाजिक न्याय विभाग भ्रष्टाचारी आहे म्हणून बदनाम करण्याचे षडयंत्र कोणी रचले? ह्याचा ही खुलासा झाला पाहिजे.

7. ..दुसरा मुद्धा असा की ,शिष्यवृत्ती गैरप्रकारात एस आय टी नेमली होती. काहींवर कार्यवाही आणि काहींना संरक्षण मिळाल्याचे बोलले जाते. कळतच नाही अंतिमता काय झाले ? मी RTI मध्ये माहिती मागितली होती , मिळाली नाही. बार्टीतील भ्रष्टाचाराची चौकशी नाही, 125 व्या जयंती निमित्त आयोजित सांस्कृतिक कार्यक्रमांवर झालेला खर्च व त्यातील भ्रष्टाचार-गैरव्यवहाराची चौकशी 2016 पासून आयुक्त समाज कल्याण यांचेकडे प्रलंबित आहे. या सर्व प्रकरणात पाठपुरावा करूनही सामाजिक न्याय विभाग लक्ष देत नाही. भ्रष्टाचार -गैरव्यवहार नाही असे जाहीर तरी करून टाकावे. सर्वत्र इमानदारी आहे अशी घोषणा विभागाने करावी. असे करण्यासाठी चौकशी पूर्ण तरी करावी लागेल. इतर ही योजना अमलबजावणी चे ,बजेट चे, scsp/tsp च्या बजेट चा कायदा करण्याचे विषय प्रलंबित आहेत. इकडे ही दुर्लक्ष होत आहे.

8. मंत्री स्वतः च म्हणाले ,समता प्रतिष्ठान मध्ये भ्रष्टाचार झाला आणि आकडा 3.67 कोटीवरून 14 कोटी पर्यंत जाऊ शकतो हे कशाचे आधारावर म्हणाले? का चौकशी पूर्ण केली जात नाही? पारदर्शक कारभार कशाला म्हणतात? शासन – प्रशासनात सचोटी नसलेले , असंवेदनशील ,अकार्यक्षम, लाचार मानसिकतेचे जे अधिकारी आहेत ते लोकशाहीला , संविधानाला, शोषित वंचितांच्या कल्याणाला मारक ठरतात. सामाजिक न्याय नाव असलेल्या विभागाने गैरकारभार, गैरव्यवहार, भ्रष्ट्राचारी – मनमानी कारभार ,करून समाजातील वंचितांना वंचित ठेवण्याचे काम करू नये, शोषितांचे नावाने त्याचेच शोषण करू नये. शासन कर्ती जमात शोषणकर्ती जमात होऊ नये . सामाजिक न्याय विभाग खूप महत्त्वाचा विभाग आहे .या विभागाबद्धल आम्हास खूप आदर आहे कारण हा बाबासाहेबांच्या विचारांचा विभाग आहे. त्यामुळे, चुकीचे ,अन्यायाचे घडत असेल तर त्याविरुद्ध बोललेच पाहिजे, प्रश्न विचारला पाहिजे . हेच काम आम्ही करीत आहोत. कोणीही गैर वाटून घेण्याचे कारणच नाही.

9. सामाजिक न्याय विभाग हा डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रयत्नांची निर्मिती आहे. यामागे एक इतिहास आहे. यापूर्वी आम्ही अनेकदा समाज माध्यमातून हे मांडल आहे. हा विभाग बाबासाहेबांच्या विचारा नुसार, संदेशानुसार चालणारा असेल, कटिबद्ध असेल तर भ्रष्टाचार खपवून घेतला जाता कामा नये.आणि भ्रष्टाचार करणाऱ्यांची गय करू नये. मंत्री महोदय याकडे लक्ष देतील अशी अपेक्षा आहे.

✒️इ झेड खोब्रागडे(भाप्रसे नि,संविधान फौंडेशन,नागपूर)मो:-9923756900