नांदगाव खंडेश्वरच्या कचरा डेपोला वारंवार आग

32

🔸निगरगट्ट नगरपंचायत प्रशासनाने घेतले झोपेचं सोंग

✒️प्रदिप रघुते(अमरावती प्रतिनिधी)मो:-9049587193

अमरावती(दि.23एप्रिल):-नांदगाव खंडेश्वर नगरपंचायतीने नियम धाब्यावर बसवून तयार केलेल्या कचरा डेपोला वारंवार आग लागत असून त्यामुळे मोठा आगीचा विध्वंस होण्याचा धोका निर्माण झाला आहे. काही वर्षांपूर्वी नांदगाव खंडेश्वर येथे कडब्याच्या गंजीला आग लागून त्याची जळती पेंडी वादळाने तत्कालीन टुरिंग टॉकीज वर पडली होती व दोन सिनेमा टॉकीज जळून खाक झाल्या होत्या‌. त्याची पुनरावृत्ती होण्याचा धोका निर्माण झाला आहे.उन्हाळ्यात वादळाचे व हवेचे प्रमाण हे जास्त असते, त्यामुळे ही आग कधीही रौद्ररूप धारण करू शकते.जळत्या प्लास्टिक पिशव्या अथवा कागद हवेने उडून एखाद्या घरावर पडल्यास मोठ्या आगीचा अनर्थ होऊ शकत.
नांदगाव खंडेश्वर नगरपंचायतीने म्हाडाच्या जागेवरच कचरा डेपोची निर्मिती केली आहे. त्यामुळे संपूर्ण गावातील कचरा व घाण ही या ठिकाणी आणून टाकण्यात येते.

नागरिकांच्या आरोग्यास धोका या कचरा डेपोला लागूनच नागरी वस्ती आहे. येथील नागरिकांना या कचरा डेपो चा अतोनात त्रास होत आहे. प्लास्टिकच्या पिशव्या व कागद हवेने उडून नागरी वस्त्यांमध्ये पडत असतात.तसेच या कचरा डेपोची दुर्गंधी सर्वत्र पसरत असते. त्यामुळे येथील नागरिकांच्या आरोग्यास धोका निर्माण झाला आहे.

खंडेश्वर देवस्थानाचे पावित्र्य भंग या कचरा डेपोला लागूनच नांदगाव खंडेश्वर येथे ऐतिहासिक खंडेश्वर देवस्थान आहे. तेथे दरवर्षी मोठी महाशिवरात्रीला यात्रा भरत असते. अनेक भाविक भक्त दर्शनासाठी या मंदिरात येत असतात. अनेक नागरिक सकाळी फेरफटका मारण्यासाठी या परिसरात फिरत असतात. ठाणे याला पर्यटनाचा दर्जा दिला आहे. मात्र अशा पवित्र ठिकाणी परिसरात कचरा डेपो उभा करून पर्यटन स्थळाची शान घालवली आहे.कचरा डेपोला हटवण्यासाठी नांदगाव खंडेश्वर येथील आजी-माजी लोकप्रतिनिधी जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत आहे. त्यामुळे सर्वसामान्य जनतेत असंतोष पसरला आहे.

अग्निशमन दलाची गाडी प्रतीक्षेतच नांदगाव खंडेश्वर नगरपंचायत ला अग्निशामन दलाची ची गाडी मिळाली अशी जाहिरात बाजी काही राजकीय पक्ष संघटनांनी व नेत्यांनी केली होती. या गाडीचे श्रेय घेण्याची स्पर्धादेखील लागली होती. अद्यापही ही गाडी नगरपंचायत ला मिळाली नाही. काही एखादी मोठी आग लागली तर इतर ठिकाणावरून अग्निशमन गाडी पाचारण केल्याशिवाय पर्याय नाही.नांदगाव खंडेश्वर च्या कचरा डेपो ची आज विजवण्यासाठी चांदूर रेल्वेच्या अग्निशमन दलाच्या गाडीला पाचारण करावे लागले. त्यामुळे जिल्ह्यातील सर्वाधिक उपेक्षित तालुका म्हणून नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील नोंद होत आहे. याबाबत नागरिकात असंतोष धुमसत असून याचे रूपांतर भविष्यात मोठ्या जनआंदोलनात होण्याची शक्यता आहे.