🔹समाजकार्य पदवीधर कल्याण मंडळाची मागणी
🔸पालकमंत्री ना. विजय वडेट्टीवार यांना निवेदन केले सादर
✒️सुयोग सुरेश डांगे(चिमूर प्रतिनिधी)
चिमूर(दि.28एप्रिल):-सामाजिक न्याय, समाजकल्याण विभागातील पदभरतीसाठी समाजकार्य पदवी, पदवीधर हीच पात्रता ठेवा तसेच राज्य लोकसेवा आयोगामार्फत परीक्षा न घेता सरळसेवा पद्धतीने घ्यावी अशी मागणी समाजकार्य पदवीधर कल्याण मंडळ महाराष्ट्र राज्य जिल्हा शाखेच्या पदाधिका-यांनी राज्याचे मदत व पुनर्वसन, बहुजन कल्याण मंत्री तथा पालकमंत्री ना. विजय वडेट्टीवार यांना सादर केलेल्या निवेदनातुन केली आहे.
महिला व बालविकास विभागातील बालविकास प्रकल्प अधिकारी (नागरी), सहाय्यक आयुक्त, परीविक्षा अधिक्षक, जिल्हा महिला व बालविकास अधिकारी, जिल्हा कार्यक्रम अधिकारी गट- अ या पदभरतीच्या नियमात शासनाने बदल केले आहे. ही सर्व पदे आता महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या मार्फतीने भरण्यात येणार आहे. सरळसेवा व राज्यसेवा या दोन वेगवेगळ्या परीक्षा पद्धती आहेत. या बदलाचा फटका लाखो विद्यार्थांना बसणार आहे. त्यामुळे सदर पदभरतीसाठी शैक्षणिक पात्रता समाजकार्य पदवी व पदव्युत्तर हीच ठेवण्यात यावी. तसेच ही पदभरती सरळसेवेने घ्यावी.
निवेदन सादर करण्या-या शिष्टमंडळात समाजकार्य पदवीधर कल्याण मंडळ महाराष्ट्र राज्य जिल्हा चंद्रपूरचे अध्यक्ष अक्षय लांजेवार, चिमुर शहर अध्यक्ष रोहन नन्नावरे, चिमूर तालुकाध्यक्ष निखील मेश्राम, पवन चिंचूलकर, अमोल पारेकर, अमित राऊत, अखिल दुधनकर, जितेंद्र दडमल, राहुल मडावी आदी उपस्थित होते.
——————————————————————————-
या विभागातील रिक्त पदासाठी २०१४ पासुन गट-अ साठी आणि २०१८ पासुन गट- ब ची जाहिरात आली नाही. आम्ही आमची उमेदीची वर्षे अधिकारी होण्याच्या स्वप्नासाठी खर्ची घातली आहेत. अभ्यासक्रमाचा विचार करता राज्यसेवा आणि या सरळसेवा परीक्षेचा अभ्यासक्रम पूर्णपणे वेगळा आहे. ही परीक्षा राज्यसेवेने घेणे, हा विद्यार्थावरील होणारा मोठा अन्याय आहे.
…… अक्षय लांजेवार, अध्यक्ष, समाजकार्य पदवीधर कल्याण मंडळ महाराष्ट्र राज्य जिल्हा चंद्रपूर